Thursday, 18 April 2019

वाचूया कथा


_*शुद्ध बीजापोटी फळें रसाळ गोमटी-"*_

_*लेखक-मयुरेश डंके.*_

      गोव्याला जाताना वाटेत एक छोटं झोपडीवजा कॅन्टीन दिसलं, म्हणून चहा घेण्यासाठी थांबलो. साधारणपणे विशीच्या वयाचा एक मुलगा ते कॅन्टीन सांभाळत होता.        शेणानं सारवलेली जमीन, झोपडीच्या बाहेर ठिपक्यांची रांगोळी, झोपडीत ज्ञानेश्वर महाराजांचा चांगला फोटो होता. त्याला ताजा फुलांचा हार घातलेला होता.       बाहेरून दिसणारी झोपडी आतून मात्र चांगली स्वच्छ होती. कळकटपणा कुठेही दिसत नव्हता. कामगारही नव्हते. खाण्याचे जिन्नस नव्हते, फक्त चहा आणि कॉफीच होती.       शुभ्र पांढरी बंडी आणि पायजमा अशा स्वच्छ पोशाखात तो मुलगा काम करत होता. सेल्फ सर्व्हिस होती. बिड्या-सिगारेट्स चा वास नव्हता, पान तंबाखूच्या पिचकाऱ्या नव्हत्या. चहाचे कप स्वच्छ होते आणि दर्जाही चांगला होता. पिण्याच्या पाण्याची सोय वेगळी होती.         साधेपणा आणि दारिद्र्य या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगवेगळ्या आहेत. साधेपणाचाही एक वेगळा डौल असतो, रुबाब असतो. बाहेरून चांगली दिसणारी आणि आत गेल्यावर भ्रमाचा भोपळा फोडणारी अनेक हॉटेल्स असतातच. पण काही ठिकाणं आणि तिथली माणसं मनात घर करतात.       मी चहा घेऊन निघालो आणि जाताना मात्र त्या मुलानं मला एक अनपेक्षित आश्चर्याचा धक्का दिला.        त्यानं मला हाक मारली, मी थांबलो. तो मुलगा म्हणाला, "सर, तुम्ही मघाशी ज्या कोर्स विषयी चर्चा करत होतात, तो कोर्स अमेरिकन युनिव्हर्सिटी मध्ये आहे."       मला खूप आश्चर्य वाटलं, हे वेगळं सांगायला नकोच. रस्त्यावरच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या मुलाला परदेशी विद्यापीठाविषयी इतकी अचूक माहिती कशी काय? असा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविकच आहे.       मी त्याला विचारलं, "पण तुला कसं काय माहीत?"      तो म्हणाला," सर, मला तिथं जाऊन शिकायचं आहे, म्हणूनच मी हे काम करतोय."       "वडील शेती करतात, आई घरचा गोठा सांभाळते, मोठ्या बहिणीचं लग्न झालं आहे. मी चहा कॅन्टीन चालवतो. मी बीएससी झालोय सर."        "अरे, पण मग हे काम का करतोस? दुसरं काही तरी चांगलं काम करायचंस ना.."      "सर, साडे तीन रुपये प्रोडक्शन कॉस्ट टाकून साडे अकरा रुपये नफा मिळवतोय मी प्रत्येक कपामागं. घरचं दूध आहे, ही जागाही आमची स्वतःची आहे. एकूण खर्चापैकी ४०% रक्कम तरी मिळवली पाहिजे, नाहीतर बँकेचं कर्ज मिळणार नाही. म्हणून मी हे काम सुरू केलं. रोजची अडीच-तीन हजाराची कमाई होते.       पुढच्या वर्षी एन्ट्रन्स देणार आहे मी. तोवर पैसे जमा होतीलच. एकदा एन्ट्रन्स मध्ये चांगला स्कोअर झाला की बँक कशाला नाही म्हणेल?"        "अरे, पण लोक काय म्हणतील, याचा विचार नाही केलास का तू?"       "सर, लोक बोलतील, पण मला पैसे देणार आहेत का ते? मी प्रॅक्टिकली विचार केला सर. मी स्वतःच्याच जीवावर पैसा उभा करणार आणि शिकणार."      त्यानं मला कॅन्टीनचं काऊंटर आतून दाखवलं. पाहतो तर पुस्तकंच पुस्तकं. त्यात ज्ञानेश्वरी देखील दिसली.        वेळ मिळेल तसा अभ्यास करणारा आणि स्वतःच्या कमाईवरच परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतलेला तो मुलगा खरोखरच हुशार, समजूतदार आणि कर्तव्यात श्रेष्ठ आहे. त्यानं परिस्थिती बरोबरच स्वतःला सुद्धा स्वीकारलं आहे, पण ध्येयाच्या दिशेने करायचा प्रवास सोडला नाही.           अडचणींमध्येदेखील संधी शोधणारा तो मुलगा खरा हाडाचा विद्यार्थी आहे. स्वतःच्या जबाबदाऱ्या तो उत्तम प्रकारे पार पाडतो आहे. त्याच्या समोरच्या कोणत्याही कामाला तो कमीपणाचं मानत नाही, हे सर्वांनीच घेण्यासारखं आहे.      *आजच्या विद्यार्थीच काय पण पालकांमध्येही हा गुण फारसा आढळून येत नाही. असे संस्कार करून आपल्या मुलाला घडवणाऱ्या त्या आईवडिलांचं आणि त्याच्या शिक्षकांचं मला कौतुक वाटलं आणि अभिमानही वाटला.*       *मुलांच्या खोलीत स्वतंत्र एसी, स्वतंत्र टीव्ही, आठवड्याला भक्कम पॉकेटमनी, वायफाय, महागडे स्मार्टफोन्स देणारे पालक मुलांना जगण्याची दृष्टी का बरं देत नाहीत? स्वतःची कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव का करून देऊ शकत नाहीत? असा प्रश्न मला नेहमीच पडतो.*      *आठवड्यातून एकदा तरी महागड्या हॉटेल मध्ये सहकुटुंब जेवायला जाणारी अनेक कुटुंबं मी पाहतो, तेव्हा पैशाच्या नादी लागून जगण्यातला साधेपणाच संपत चाललाय का, असं वाटल्यावाचून राहत नाही.*      लाडावून ठेवलेली आणि प्रमाणाबाहेर सुखवस्तू झालेली तरुण पिढी खरोखरच देशाच्या विकासासाठी बेचैन असेल का हो? समाजातली अनागोंदी परिस्थिती बदलण्याचा ध्यास त्याच्या मनात असेल का?       अत्यंत बुद्धिमान आणि त्याच्यापेक्षा कांकणभर जास्तच सुखासीन, उपभोगवादी, स्वार्थी आणि अर्थातच बेजबाबदार विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.     समंजस, चौकस, डोळस, अभ्यासू, प्रगल्भ, प्रयोगशील, नीतिमान, संतुलित विचार करणारा असा विद्यार्थी शाळा-कॉलेजांना हवा असेल तर तो आधी कुटुंबांमधून घडला पाहिजे.  आईवडीलांनो, तुमची जबाबदारी फार मोठी आहे... _*©मयुरेश डंके.*_मानसतज्ज्ञ, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.(आवडल्यास शेअर करतांना लेखात कुठलाही बदल न करता कृपया मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती- मेघःशाम सोनवणे 9325927222.)

_*C/P.*_





दाढी


मित्रहो!

नमस्कार

लेखन स्वरूपात तुमची माझी बरेच दिवस भेट झाली नाही.

आज जरा निवांत होतो.
म्हणलं चला
ग्रुप वर काहीतरी चांगलं लिहावं.

आज सकाळी बेसिन समोर दाढी करण्यासाठी उभा होतो.

बेसिन वरील आरशात पाहिलं.
चार दिवस दाढी करायचा कंटाळा केला, त्यामुळे दाढीचे खुंट वाढले होते.

दाढीचे खुंटावर हात फिरवत होतो आणि इलेक्ट्रिक शॉक बसावा तशी एक गोष्ट स्मरणात आली.

आपल्या बँकेत अकाऊंटस्ला काम करणारा अधिकारी प्रमोद गाडगीळ याची काही महिन्यांपूर्वी आई वारली म्हणून त्याच्या घरी त्याला भेटायला गेलो होतो.

बोलण्याच्या ओघात काहीतरी वैद्यकीय विषय निघाला.
सध्याचे डॉक्टर्स, त्यांच्याकडे येणारे भरमसाठ पेशंट्स,
त्यामुळे डॉक्टरांची पेशंटच्या बाबतीत होणारी दिरंगाई, निष्काळजीपणा.
पैसे कमवण्यासाठी पेशंटला हॉस्पिटलाईज करून डांबून ठेवण्याची सध्याची वैद्यकीय व्यवसायातील वाढती वृत्ती. वै.

प्रमोदन त्यावेळी एका हॉस्पिटलमध्ये घडलेली
"सत्य घटना" सांगितली होती.

यातील स्थळ-काळ-वेळ, नाव काल्पनिक आहेत.
पण घटना सत्य आहे.

स्थळ
पुण्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टरांचं भलमोठं हॉस्पिटल.
आय. सी. यू. वॉर्ड.

नित्यानंद अठ्ठावीशीचा पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनियर.

त्याचे वडील रामानंद वय वर्षे 68 शासनाच्या पाटबंधारे खात्यातील निवृत्त झालेले अधिकारी.

बी.पी. आणि शुगरचा त्यांना त्रास.
त्यामुळे त्यापाठोपाठ हार्टच दुखणं आलेलं.

छातीत पेन होऊ लागल म्हणून पंधरा दिवसापूर्वी दवाखान्यात ऍडमिट केलं होतं त्यांना.

ऍडमिट केल्यानंतर दोन-तीन दिवसातच लगेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं.

व्हेंटीलेटर लावूनही दहा दिवस होऊन गेले होते.

नित्यानंदाच्या हॉस्पिटलच्या सकाळ-दुपार-संध्याकाळ वाऱ्या चालू होत्या.

नित्यानंदाच्या कुटुंबातील मंडळी आलटून-पालटून सोयीनुसार पाळी लावून दवाखान्यात थांबत होती.

रामानंदांच्या तब्येतीत म्हणावी तशी सुधारणा होत नव्हती.

 नित्यानंदची घालमेल चालू होती.

 वडिलांना लवकर बर वाटाव. त्यांचा वेंटीलेटर काढून टाकला जावा.
आय. सी. यु. मधून जनरल रूम मध्ये लवकरात लवकर वडलांना शिफ्ट केल जाव.
अशी त्याची मानसिकता होती. हीच त्याची मनोमन इच्छा होती.

रोज सकाळ दुपार डॉक्टरांचे राऊंड होत होते.

"पेशंट इज नॉट रेस्पोंडींग दॅट मच.
बट् वी आर ट्राइंग अवर बेस्ट"

एवढच उत्तर नित्यानंदला रोज डॉक्टरांचेकडून मिळत होतं.

रामानंदांच्या शेजारच्या बेडवर खेडेगावातील एक पेशंट ऍडमिट होत.

त्या पेशंट बरोबर त्या पेशंटच्या
नात्यातीलच एक सत्तरीला आलेले म्हातारे गृहस्थ अटेंडंट म्हणून आले होते.

वडीलांसाठी नित्यानंदाचा तुटणारा जीव आणि त्याची घालमेल,
हे आजोबा रोज न्याहाळत होते.

व्हेंटिलेटर लावून दहा दिवस होऊन गेले, तरीही वडिलांच्या तब्येतीत फरक पडत नाही म्हणून नित्यानंद हताश झाला होता.

आणि वडिलांच्या पायाशी बेडवर बसला होता.

शेजारच्या पेशंट जवळ खुर्चीवर बसलेले ते खेडेगावातील आजोबा नित्यानंदच्या जवळ गेले.

ते नित्यानंदला म्हणाले.
"बाळा आपल्या वडीलासाठी खूप करतोयस तू.
गेले आठ दिवस मी बघतोय रोज तुला.
वडिलाची एवढी काळजी करणारी पोरं, या जमान्यात मिळन लै कठीन होऊन बसलय बग.
तसा तुझा बा लय भाग्यवानच म्हनायचा.
मी जरा बोलू का तुझ्या संगट तुझ्या बापाच्या तब्येतीविषयी".

नित्यानंद म्हणाला
"बिनधास्त बोला आजोबा"

आजोबा म्हणाले
"पोरा,  तुझ्या बा ला ऍडमिट करून बारा पंधरा दिवस झाले का?

नित्यानंद
"हो,    बारा दिवस झाले"

आजोबा
"हयो वेंटीलेटर लावून दहा दिवस होऊन गेल न्हव"

नित्यानंदं
"हो दहा दिवस होऊन गेले.
आज अकरावा दिवस".

आजोबा
"मग या धा  दिसात तुझ्या बा ची दाडी वाढाया पायजे न्हव.

नित्यानंद
"हो वाढायला पाहिजे"

आजोबा
"मग तुझ्या बा ची दाडी धा दिसात वाढल्या का?"

नित्यानंद
"नाही,
अजिबात वाढलेली नाही

त्यांना ॲडमिट करताना जेवढी दाढी होती त्यामध्ये वाढ झालेली नाहीये"

आजोबा

"नित्यानंद बाळा,
मला जेवढं कळतं तेवढ मी बोलतुया.
आम्ही खेड्या गावची आडगी, अशिक्षीत मानसं हाय.
विस्वास ठेव अगर ठेवू नगस.
मानुस जित्ता असला तरच त्याची दाडी वाडतीया.
प्रेताची दाडी वाढत न्हाय, बाळा"

नित्यानंद डोक्याला हात लावून मटकन खाली बसला.

काही क्षण तसेच निघून गेले.

आजोबांनी प्रेमानी नित्यानंदच्या पाठीवरून हात फिरवत त्याला धीर दिला.

नित्यानंद उठला त्यांन आजोबांच्या कडं विलक्षण नजरेन पाहिलं.

त्या नजरेत
आजोबांच्या अगाध ज्ञानाबद्दल आदर होता.

स्वतःबद्दल कीव होती.

 डॉक्टरांच्या बद्दल प्रचंड राग होता.

नित्यानंदच्या त्या नजरेत या सगळ्या संमिश्र भावना आजोबांना जाणवत होत्या.

नित्यानंदच्या मनात सरकन एक विचार येऊन गेला.

"काय भुललासी वरलिया रंगा"

नित्यानंदं क्षणाचाही विलंब न लावता ड्युटीवर असलेल्या सिस्टरला जोरात हाक मारली.

 त्याच्या आवाजातील जोर ऐकून सिस्टर धावतच नित्यानंद समोर येऊन उभी राहिली.

सिस्टर
"येस सर"

नित्यानंद
"रिमूव्ह द व्हेंटीलेटर"

----------------------------------------

मित्रहो
वैज्ञानिक दृष्ट्या या कथेतील भावार्थ "योग्य की आयोग्य" याबाबत मला खरंच काही कल्पना नाही.
पण जी गोष्ट मला भावली, ती मी तुमच्या समोर मांडली. एवढच.

कथालेखनाचा हा एक यथा मती प्रयत्न केला आहे.

कथा आवडली तरी कळवा.

कथा आवडली नाही तरी कळवा.

 कथेमध्ये काही सुधारणा हवी असेल तर जरुर कळवा.

पण कळवा.

वाचनाचा आनंद घेत रहा. वाचनाचा आनंद देत ही रहा.

हेमंत जोशी
90 28 89 26 27
🙏

एका ग्रॅमचा आनंद
लेखाचे शीर्षक वाचून थोडेसे आश्चर्य वाटलं असेल नाही? पण घटनाच अशी आहे की जी खूप साधी आहे पण विचार करायला भाग पाडते.
काल संध्याकाळी शाळेतून घरी जाताना अर्धा किलो सफरचंद आणि अर्धा किलो चिक्कू घेतले. शेजारीच कांदे विकणाऱ्याकडून एक किलो कांदे घेतले.सर्व खरेदी करताना खूप घाईत होते. कांदे घेतले आणि फळवाल्या काकांकडे पैसे देण्यासाठी मोर्चा वळवला. मी कांदे घेईपर्यंत चिकू तसेच वजन काट्यावर होते. पैसे देण्यासाठी हात पुढे केला तेवढ्यात फळं विकणारे वयस्कर काका म्हणाले," ताई, चिकू 499 ग्रॅम आहेत , 1 ग्रॅम कमी आहे." मी सहजच म्हणाले,"असू द्या हो काका, त्यात काय एवढे."माझे हे शब्द ऐकल्यावर त्या काकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य हे दोन्ही भाव उमटले. ते म्हणाले," ताई, मी इथे 6 महिन्यांपासून फळं विकत आहे; पण 1 ग्रॅम साठी भांडणारी अनेक लोक पाहिली. तुम्ही पहिलेच असं गिऱ्हाईक आहात ज्यांनी आहे ते वजन स्वीकारलं आहे. 1 ग्रॅमसाठी भांडले नाही." मला थोडं आश्चर्यच वाटलं; पण त्याहून जास्त फळवाल्या काकांच्या चेहऱ्यावरचा आनन्द आणि समाधान मला सुखद अनुभव देऊन गेला. घटना खूप साधी; पण विचार करायला लावणारी. एखाद्याला आंनद देण्यासाठी खूप काही करण्याची गरजच नसते, असंच काहीसं पटवून देणारी घटना.नाही का?
©शिल्पा पाटील उल्हासनगर-४.



*!!!... "क्षमा"...!!!*

एक हृदयस्पर्शी खरी गोष्ट संपूर्ण वाचा🙏🏻

पुण्याच्या आसपासचं गाव. कुटुंब ठिकठाक. एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन. साहजीकच सुनेवर सर्व भार. आधी किरकोळ कुरबुर. मग बाचाबाची. त्यानंतर कडाक्याची भांडणं. सुनेचं म्हणणं. घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका. काम करुन हातभार लावा संसाराला. पण बाबा थकलेले. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं. मुलानेही अडवलं नाही.

*आले पुण्यात. कुणी म्हातारा म्हणुन काम देईना आणि भूक जगू देईना. भीक मागण्या वाचून पर्याय उरला नाही.*

बाहेरच मुलाला भेटुन, लाज टाकून ,बाबा विचारायचे, *"येवु का रे बाळा घरी रहायला?"*

"बाळ" म्हणायचे, *"मला काही त्रास नाही बाबा, पण "हिला" विचारुन सांगतो."*

पण, *"या बाबा घरी, "असा निरोप बाळाकडून कधी आलाच नाही !*

आता बाबा अट्टल भिकारी झाले.
झाले , कि त्यांना केलं गेलं?

अशीच भीक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली.

बोलताना बाबा म्हणायचे, *"डाॕक्टर म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो. वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं. वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते. कुणाचाच आधार नसतो म्हणून. तसंच हे म्हातारपण. झुकलेलं आणि वाकलेलं. निष्प्राण वेलीसारखं.!*

बाबांची वाक्य ऐकून काटा यायचा अंगावर माझ्याही!

*"नाव, पत्ता, पिनकोड सहित टाकून पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं. नाहितर वर्षानुवर्षे पडून राहतं धुळ खात पोस्टातच. तसंच आमचं आयुष्य! नाव पत्ता सग्गळं बरोबर ! पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणून आम्ही इथं पडलेले."*

असं बोलून ते हसायला लागतात.

त्यांचं ते कळवळणारं हसू आपल्यालाच पीळ पाडून जातं.

मी म्हणायचो, "बाबा हसताय तुम्ही. पण हे हसू खोटं आहे तुमचं."
 तर म्हणायचे. "आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं. हसण्याचं नाटकच केलं. आता या वयात तरी खरं हसू कुठुन उसनं आणू ?"

मी निरुत्तर !

वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं आयुष्य झालंय. कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं. टोपलीत ठेवतं. वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली. नंतर कळतं कि सुकलेले आहोत म्हणुन जाळण्यासाठी,  शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय. सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा ?

बाबांच बोलणं ऐकून, मीच आतून तुटून जायचो.

काहीतरी काम करा बाबा, असं सांगून मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती. बाबा कामाला तयार नव्हते.!

म्हणायचे, "आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं. किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही, पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवुन पाया पडतील. श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील."

*नाटक असतं हो सगळं आयुष्यच. प्रत्येकजण आपापली भूमिका पार पाडत असतं इतकंच !*

इतकं असुनही , एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच. बॕटऱ्या विकण्यासाठी त्यांना मदत केली. शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता. भिक  मागत नाहीत.

मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता !

आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕटऱ्या विकताना रस्त्यावर भेटले. मला जरा बाजुला घेऊन गेले. म्हणाले, एक गंमत सांगायचीय डाॕक्टर !

सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो. तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, "हिने" तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जावु दे म्हणते. पाया पडुन माफी मागायला तयार आहे. बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळुन करु."

मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला/सासऱ्याला  भिक मागायला लावली. आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली.?

डाॕक्टर काय करु ? सल्ला द्या.

साहजीकच मी बोललो, ज्यांनी तुमच्यावर ही वेळ आणली , त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही , पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु !

बाबा म्हणाले, "डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगू? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भीक मागताना ! चालेल तुम्हाला ?"

मी माझ्या माघारी, त्याला भिकारी बनवून जाईन का?
*अहो, चुकतात तीच पोरं असतात. माफ करतो तोच *"बाप"* असतो.

अहो, लहानपणापासुन *प्रेम म्हणजे काय. माया म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो.* त्यातून तो किती शिकला , माहिती नाही. बहुतेक नाहीच शिकला, नाहीतर , ही वेळ नसती आली माझ्यावर. असो !

पण आता आयुष्याच्या शेवटच्या  वळणावर तरी ,
*"क्षमा"* म्हणजे काय हे मला त्याला शिकवू   द्या डाॕक्टर.

"आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही, आणि कधीच कोणाला *"क्षमा"* करणार नाही. "

"काही नाही ,काही नाही,  तर जाता जाता एवढं तरी , शिकवू द्या मला , डाॕक्टर.

असं म्हणाले ते, आणि हसत हसत चालायला लागले आणि मी बसलो मागे डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत !

*डाॕ. अभिजीत सोनवणे*
*डाॕक्टर फाॕर बेगर्स*
हे डॉक्टर फार छान काम करतात आणि त्यांचे अनुभव छान मांडतातही.



🙏  *साक्षात्कार*🙏

*मोठ्या धावपळीनंतर तो कार्यालयात पोहचला त्यांची आज पहीली मुलाखत होती*

*तो घराबाहेर निघतांना विचार करीत होता व त्याची इच्छा होती !*
*जर आज माझी मुलाखत यशस्वी झाली तर माझ्या पूर्वजांची हवेली सोडून येथे शहरात स्थाईक होईल .*

*सकाळी झोपेतून उठल्यापासून ते परत झोपेपर्यंत आईवडिलांच्या रोजच्या कटकटीपासुन मुक्तता मीळेल.*

*सकाळी झोपेतून उठलो कि अगोदर अंथरूण आवरा .*
*मग बाथरूममध्ये जा ,*
*बाथरूमच्या बाहेर निघत नाही कि मातोश्रीचे फर्मान "नळ बंद केला का  ?"*
*टाँवेल जागेवर ठेवला की दिला फेकुन ?*

*नाश्ता करून घराबाहेर निघालो कि लगेच वडिलांचा आवाज*
*"पंखा बंद केला की चालुच आहे ?"*
*काय काय ऐकावे नुसता वैताग आला यार...*
*नौकरी मिळाली की घर सोडून देईल व शहरात राहील......*

*आँफीसमध्ये भरपूर उमेदवार बसलेले होते , बॉसची वाट पाहत होते, दहा वाजलेले होते तरीपण ऱ्हरांड्यात अजूनही लाईट चालुच होता , लगेच आईची आठवण आली लाईट बंद केला का ?*
*अन उठून मी  ऱ्हरांड्यातील लाईट बंद केला...*

*ऑफिसच्या  दरवाज़्याजवळ कोणीच नव्हते , बाजूला ठेवलेल्या वाटर कूलर मधून पानी टपकत होते ,*
*ते पाहून वडीलांचे रागावणे आठवले , म्हणून वाँटर कुलरचा नळ व्यवस्थित बंद केला गळणारे पाणी बंद केले ,*
*समोर बोर्ड वर लीहलेले होते तुमचा इंटरव्यू दूसऱ्या मजल्यावर आहे....*

*जीन्यातील लाइट चालुच होता तो बंद करून पुढे सरकलो तर रस्त्यात एक खुर्ची पडलेली होती ती जागेवर व्यवस्थित उभी केली व वरच्या मजल्यावर पोहोचलो व पाहीले की आपल्या अगोदर बसलेले उमेदवार बाँसच्या कँबिनमध्ये जात होते व लगेच बाहेर पडत होते....*
*........तेथे मुलाखत देऊन बाहेर आलेल्या उमेदवारास विचारल्यावर कळले की , बॉस फाइल पाहुन काहीच प्रश्न वीचारत नाहीत आणि परत पाठवुन देत आहेत . असे समजले*

*माझा नंबर आला व मला मुलाखतीसाठी बोलावले  मी दरवाजा वाजवून वीचारले , आत येऊ का सर ?*
*" एस कम इन " आतुन आवाज आला . बसण्यासाठी सुचना मीळाल्यानतंर खुर्चीवर बसलो आणि माझी फाईल पुढे केली ,*
*.......फाईल मधिल माझ्या कागदपत्रावर नज़र मारत असतांना कोणताही प्रश्न न विचारता बाँसने विचारले  "केव्हा ज्वाइन करत आहात ?"*

*बाँसच्या या प्रश्नाने मी चक्रावलो मला वाटले ते माझी गंमत करत आहेत , माझा चेहरा पाहून ते म्हणाले मी गंमत करीत नाही ही वास्तविकता आहे .*

*आजच्या इंटरव्यूत कोणालाही कोणताच प्रश्न विचारला नाही, फक्त सीसीटीव्हीमध्ये इंटरव्यूमध्ये आलेल्या उमेदवारांच्या हालचाली मध्ये सर्व काही पाहिले, मुलाखतीसाठी बरेचजण आले,*
*वाँटर कुलरचे गळणारे पाणी सर्वानी पाहीले पण दुर्लक्ष केले ,*
*ऱ्हरांड्यातील जळणारा लाईट कोणीच बंद केला नाही तो लाईट तुम्ही बंद केला .*
*मध्येच रसत्यात पडलेली खुर्ची सर्वानी पाहीली पण दुर्लक्ष केले  परंतु ती खुर्ची तुम्ही उचलली .*

*धन्य तुमच्या पालकांना , ज्यांनी तुम्हाला चांगले व उत्तम संस्कार केले.*

*ज्यांच्याजवळ Self Discipline नाही तो कितीही हूशार असला , चतुर असला तरी ती व्यक्ती मैनेजमेंट आणि  जीवनातील घौडदौडीत यशस्वी होऊ शकत नाही*

*घरी जाऊन आई वडीलांच्या गळ्यातच पडलो आणि त्यांची माफी मागून त्यांना सर्व काही सांगितले तुम्ही केलेल्या संस्कारामुळेच आज मला ही नौकरी मीळाली .*

*आपल्या जीवनात रोज रोज लहान सहान बाबीवर बोलणारे ,नेहमी सुचना देणाऱ्या आई वडीलाकडुन मला जी शिस्त मीळाली ती अनमोल आहे . या संस्कारक्षम शिस्तप्रीय संस्कारापुढे मी मीळवलेली पदवीची काहीच हैसियत नाहीं*
*जीवनात फक्त शिक्षणच महत्त्वाचे नाही तर त्यासोबत आई वडीलांची शिकवण व संस्कार महत्त्वाचे आहेत...*

*जीवनात संस्कार महत्त्वाचे आहेत*

*या संस्कारासाठी आई वडिलांचा सम्मान  जरूरी है ।*


🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹



परत आज तेच....दिवसभर कोणाची तरी वाट पहायची आणि संध्याकाळी हिरमोड होऊन दिवस संपवायचा. कोणीच नसायचं बोलायला तिच्याशी...चेन्नईला गेल्यापासून रोजच झालं होत हे!भाषेचा एक मोठा प्रश्न आणि आपल्या माणसांची आठवण....तीला खूप कंटाळा आला होता.

वेद सकाळी ऑफीसला जायचा तो जवळ जवळ जीया झोपल्यावर परत यायचा. त्याला काही कुरकुरत म्हणलं की तो म्हणायचा, “मला काम तर करावंच लागेल. मी नोकरी सोडून देऊ का तुला घरात कंटाळा येतो म्हणून ?”

जीया तशी घरांत रमायची.एम ए. झाल्यावर लगेच काकूने वेदच स्थळ आणलं होतं... वेदला तर फ़ोटो पाहुनच जीया खूप आवडली होती.

पहिल्यांदा भेटल्यावर वेदने सांगितले होते की,मला नोकरी वगैरे करणारी बायको नको आहे. जीयाला नोकरी करण्यात विशेष रस नव्हताच तर तिलाही ते पटलं होतं.

वर्षभरानंतर वेदच काम खूप वाढायला लागलं आणि त्याला जीयाशी बोलणं,तिच्याबरोबर वेळ घालवणं ह्यासाठी वेळ उरणंच संपून गेलं आणि हळू हळू त्याला त्याच्या कामाची अक्षरशः नशा चढत चालली होती.

जीया खंगत चालली होती.

जरा मला कंटाळा आला म्हणालं की वेद अंगावर ओरडायचा काहीतरी घर बसल्या उद्योग कर हे सांगायचा.

बाहेर जाऊन नोकरी करायची तर नाही,मग तीला कळायचंच नाही की आता काय घरबसल्या उद्योग शोधायचा ?

तिचे आई बाबा भावाकडे अमेरीकेला असायचे,त्यामुळे दिवसातून त्यांना एक फोन ह्याशिवाय काही विरंगुळा नसायचा तीला. वेदचे आई बाबा पुण्यात मुलीच्या बाळंतपणासाठी रहात होते.त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा फारसं बोलणं व्हायचंच नाही .

हळू हळू तीचा एकाकीपणा वाढत गेला.

तीला वेदचा खूप राग यायला लागला होता.रोजची भांडण आणि वादावादी सुरु झाली.

मन मोकळं करायला आणि बोलायला कोणी म्हणजे कोणीच नाही.सतत बोलायची सवय असणारी जीया आतल्या आत खंगत चालली होती.

आता घर बसल्या काय करावं ह्या विचारांनी तीच डोकं चालेनास झालं होतं.

तीला अचानक आईच ते वाक्य आठवलं, “आपल्याला कोणी एकटं पाडू शकत नाही,जोपर्यंत आपण आपल्यासाठी एकटेपणा निवडत नाही. ”

सायकॉलॉजीची पदवी घेतली नसली तरी आई मुलांना वेगवेगळे लाईफ लेसन सतत देत असायची.

आज रविवार होता आणि इतके दिवसांनी वेद घरी थांबणार होता.आज परत जीया काहीतरी भांडण काढणारच अशी मानसिक तयारी त्याने केलीच होती.

तीच्या एकलकोंडेपणाची जबाबदारी कधीच त्याला त्याची वाटायची नाही. ऑफीसमध्ये मिळणारा मान आणि पैसा त्याला उन्मत्त बनवत चालला होता.

कदाचीत हीच ती वेळ असते जेव्हा नात्यांमधे भेग पडायला लागते.. आपली जवळची प्रेमाची माणसं आपण गृहीत धरायला लागतो आणि वाढवत जातो ती भेग.

पण आज जीया सकाळपासून फोनवर बोलत होती.

बराच वेळ वाट पाहून आपलं कायम वेळ देत नाही म्हणून डोकं खाणारी बायको,आज का येत नाहीये हे बघायला त्याने तीला विचारलं कोणाशी बोलतीयेस जीया ?

ती हसून म्हणाली ‘रॉंग नंबर’....

नाश्ता वगैरे तीने आणून दिला.परत जीयाचा फोन सुरु...

आता मात्र वेदमधला संशयी नवरा जागा झाला. काही झालं तरी पाहताक्षणी आवडलेली होती जीया त्याला पण त्याच्या यशाच्या धुंदीमुळे तो उगाचच तीला दूर करत चालला होता.

जेवणाच्या टेबलवर त्याने वैतागून जीयाला म्हणले काय चालू आहे तुझं?

ती परत म्हणाली काही नाहीरे ‘रॉंग नंबर’

तो खूप भडकला, “जीया ,आज तब्बल ३ आठवड्यानंतर मला निवांत वेळ मिळाला आहे आणि तू रॉंग नंबरवर बोलत बसलीयेस ?”

“वेद,आता मी ठरवलं आहे मी तुझ्या प्रगतीच्या मध्ये येणार नाही. उगाच माझ्याशी बोल म्हणून तुला त्रासही देणार नाही. मी रॉंग नंबर वर बोलत राहणं खूप एन्जॉय करतीये.

बरं झालं ना तुझाही मनस्ताप संपेल आणि माझा एकटेपणाही!.... ”

वेदला वाटल घरांत एकटं बसून वेड लागलं आपल्या बायकोला.आज तीने कटकट,भांडण केलं नाही तर तो आनंदी व्हायच्या ऐवजी आतून चांगलाच घाबरला...

काय बोलावं तीला ?त्याला कळेनासं झालं.

आज नवऱ्याने एवढी दखल घेतल्याने जीया मनातून खूप खूष झाली.

आता हे रोजचंच व्हायला लागलं होतं.घरातली सगळी कामं करून जीया फोनवरच असायची.

३ महीने झाले. वेदला वाटलं जीयाला डॉक्टर कडे न्यायची गरज आहे.

तेवढ्यात लँडलाईन वाजला. मोबाईल मुळे आजकाल लँडलाईन च्या आवाजाची सवयच गेली होती.वेदने फोन उचलला तर सोसायटीच्या गार्डचा फोन होता. काही मराठी पत्रकार आणि चॅनेलवाले वेदच्या घरी यायचं म्हणत होते.

नुकताच वेदने एक खूप मोठा प्रोजेक्ट यशस्वी करून कंपनीला मोठा फायदा करून दिला होता. त्याला खूप आनंद झाला. कंपनी आपली मुलाखत घ्यायला वगैरे पत्रकार पाठवेल हयाची अजिबातच कल्पना नव्हती त्याला. पण चेन्नई मधे मराठी पत्रकार कसे पाठवले हा प्रश्न पडला त्याला....

गार्डला त्याने त्यांना घरी पाठवायला सांगीतले.

ते लोक घरात आले आणि त्यांनी वेदला सांगीतले ‘रॉंग नंबर’ वाल्या जीया मॅडमना भेटायचं आहे.

तेवढ्यात जीया बाहेर आली. सगळ्या पत्रकारांनी तिला फुलांचे गुच्छ दिले. सगळे खूप कौतुक करत होते.

मॅडम तुम्हाला कशी काय सुचली ही कल्पना ?

तसं जीया म्हणाली, “मी दोन वर्षांपूर्वी इथे आले.. भाषेचा प्रश्न आणि नोकरी न करणे ह्यामुळे मला माझा एकटेपणा खायला लागला होता.अचानक मला एकदिवस एक फोन आला एक मराठी बोलणाऱ्या बाई बोलत होत्या.समीरा आहेका ?

मी म्हणलं नाही तुमचा रॉंग नंबर लागला आहे बहुतेक.. हा समीराचा नंबर नाही..

त्या बाई थोड्या दुःखी झाल्या आणि म्हणाल्या सकाळपासून बहिणीचा फोन लावायचा प्रयत्न करत आहे पण काय माहीत रॉंग नंबर लागतोय.”

मी सहज त्यांना म्हणाले, “काही अडचण आहेका ?मी मदत करू शकतेका काही ?”

तसं त्या म्हणाल्या, “कोणी कोणाची मदत नाही करू शकत,आपली दुःख आपल्यालाच सोडवावी लागतात. बहीणीशी बोलल्यावर हलकं वाटतं इतकंच !

पण आज अनोळखी असूनही तुमच्याशी मन मोकळं करून बरं वाटलं...थँक यू !”

त्यांनी फोन ठेवल्यावर मला माझ्याशी बोलून कोणालातरी बरं वाटलं हा विचार सुखावून गेला.मग ही कल्पना सुचली आणि मी इंटरनेटवर माझा प्रोफाइल बनवून टाकला. काही जुन्या माहितीतल्या माणसांना हाताशी धरून माझ्यासारख्या स्त्रियांसाठी एक हेल्पलाईन सुरु केली.एका चुकून आलेल्या फोनमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी दिली.म्हणून मी हा उद्योग सुरू केला...

‘रॉंग नंबर’ ह्या नावानी..

त्यांना २० मिनिटांचा वेळ देते त्यामधे त्यांनी त्यांचे मोबाईल नंबर आणि पत्ते देणे गरजेचं आहे. त्या वेळात मी कधी त्यांची आई,कधी बहीण कधी मैत्रीण बनते आणि फक्त त्यांचं बोलणं ऐकून घेते.

कुठलाही सल्ला देत नाही,त्यांच्यावर रागावत नाही.कधी कधी त्यांनी डाॅक्टरांना भेटायची गरज वाटल्यास तेवढे मात्र सुचवते.

बरेचदा आपल्याला काहीच सल्ले किंवा मार्ग नको असतात,हवे असतात फक्त आपलं बोलणं काही क्षण प्रेमाने ऐकून घेणारी माणसं !त्यांच्या प्रॉब्लेम्सची गोपनीयता राखणे हे माझ्या यशाचं गुपित आहे.. महीन्याभरापूर्वी वैतागलेल्या अवस्थेत मला फोन करणाऱ्या स्त्रीया आता मला धन्यवाद द्यायला फोन करत आहेत... कित्येक संसार तुटण्यापासून वाचताना बघीतले....कदाचित माझा स्वतःचा सुद्धा !निव्वळ माझ्या दिवसभरातल्या काही तासांमुळे....

वेद अतीशय आश्चर्यचकीत होऊन कौतुकाने बायकोकडे पहात होता.. त्याला त्याची चूक लक्षात आली होती.आपण आपल्या भरवशावर लग्न करून आणलेल्या,बघताच क्षणी प्रेमात पडलेल्या जीयाला ह्यापुढें कधीच असं एकटं वाटू द्यायच नाही हे पक्क ठरवलं त्याने.

तिची मुलाखत आणि खूप सारे फोटो घेऊन तिचे परत परत अभिनंदन करून सगळे पत्रकार निघाले.

वेद थोडा खजील मनाने पण कौतुकाने म्हणाला, “मी रॉंग नंबर फिरवला तर बोलशील का माझ्याशी जीया ?”

तसं ती म्हणाली एकतर ती सेवा एकटं पडत चाललेल्या स्त्रियांसाठी आहे.तसही मी तुला एकटं पडू देणार नाही कधीच वेद ... !

नेहमीच आयुष्यात सगळं राईटच घडेल असं नाहीना..?

कधी कधी एक ‘रॉंग नंबर’ सुद्धा बरंच काही सकारात्मक करू शकतो..!
☎☎☎☎☎☎☎



मोरपिसे मनातली     
    चहा

गोविंदराव उठून बसले , घड्याळात बघितले तर रात्रीचे अडीच वाजले होते.
बापरे .. अजून सकाळ व्हायला बराच अवधी आहे. कसा जायचा इतका वेळ! कधी उठणार घरातले सगळे!!  गोविंदराव उठून एकदा बाथरूम ला जाऊन आले. उगाचच चूळ भरली. आतल्या खोलीत जाऊन बाटली मधून पाणी घेऊन प्यायले.
परत येऊन त्यांच्या जागेवर आडवे पडले. खूप प्रयत्न करूनही झोप लागेना त्यांना. या कुशीवरून त्या कुशीवर करत वेळ घालवला. मग जुने दिवस आठवत बसले.
एक काळ होता सकाळ झाली तरी डोळे उघडत नसत त्यांचे. रात्री दमून भागून आल्यावर कधी एकदा गादीवर अंग टेकतो असे होऊन जायचे. बायको सगळे आवरून झोपायला कधी यायची ते देखील कळत नसे त्यांना.आता दिवस आणि रात्र खायला उठायची. वेळ कसा तो जायचा नाही. बाहेरून दुधाच्या गाड्यांचा टेम्पो गेला. गोविंदरावांनी पुन्हा उठून हॉल मधला दिवा लावला. उगाचच खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. अजून मिट्ट काळोख होता. सारखे पाणी पिऊन आणि बाथरूम ला जाऊन कंटाळले होते. चहाची फार तल्लफ आली होती. 'ही' असती तर तिला हक्काने उठवून चहा करायला लावला असता. पण आता कोणाला सांगू ? सगळे आहेत पण
हक्काचे माणूस एकच असते. ते पण गेले मला एकट्याला ठेऊन. उरलेली रात्र त्यांच्या अंगावर आली.अजूनच एकटे एकटे वाटू लागले. इकडे तिकडे फेऱ्या मारत कोणी उठले का त्याचा अंदाज घेऊ लागले. अजून सामसूमच होती. सहज घड्याळात पाहिले पहाट झाली होती त्यांनी पटकन उठून दात घासले. आता उठतील सगळे . ऑफिस , कॉलेज  आणि डब्याची धावपळ सुरू होईल. स्वैपाक खोलीतून मस्त वास सुटतील. आता मिळेल गरम गरम चहा. चहाच्या कल्पनेनेच त्यांना हुशारी वाटू लागली. थोडासा वेळ पटापट गेला. अरेच्चा आज कोणी उठले कसे नाही अजून? अलार्म  झाला नसेल का ? उठवावे का ? मारावी का दरवाजावर हलकी शी थाप . गोविंदराव बेडरूम च्या दरवाजाशी घोटाळले. पण वाजवले नाही दार त्यांनी.
आत गेले , पुन्हा घोटभर पाणी प्यायले. सहज कालनिर्णय पहिला . अरे देवा आज तर रविवार आहे . सुट्टी की सगळ्यांना. चला आज सगळे घरी असतील. त्यांच्या सहवासात आजचा दिवस तर जाईल पटकन . त्यांना जरा हायसे वाटले. तरीपण चहा ची तल्लफ स्वस्थ बसू देईना. ते येरझाऱ्या मारू लागले. आता पोटात कालवू लागले होते. रात्री लवकर जेवले होते. ते सुद्धा त्यांनी आता कमी केले होते. उठवावे का वैदेही ला  सांगावे का कर बाई कप भर चहा आणि झोप मग परत जाऊन. पण नकोच एकदा उठली की तिला परत झोप लागणार नाही. बसेल काहीतरी काम काढून  . आठवड्याचे सहा दिवस लवकर उठते. शिवाय दिवसभर धावपळ चालूच असते .  नकोच.
........आज रविवार होता. रात्री झोपताना वैदेही ने सगळयांना सांगून ठेवले होते. उद्या मला कोणी लवकर उठावायचे नाही. मला भरपूर झोपायचे आहे. पण नेहमी प्रमाणे डोळे उघडलेच तिचे. थोडे आळसावून तिने कूस बदलली. झोपेत सुद्धा तिला जाणवले आप्पा उठले आहेत आणि येरझाऱ्या घालतायत. त्यांची चहा ची वेळ झालीय. तिने वैतागून डोक्यापर्यंत पांघरून ओढून घेतले. नाही नाही मला झोपायचेय आज भरपूर. अगदी उन्हे डोळ्यावर येई पर्यंत. मुले झोपतात तशी. पण झोपच लागेना. अप्पांच्या येरझाऱ्या तिला अस्वस्थ करू लागल्या. ती उठून बसली. दोन पाच मिनटं बसल्यावर उठून बाहेर आली. किचन मधला दिवा लावला. देवापुढची शांत होणारी समईची वात सारखी केली , चहाचे आधण ठेवले आणि कणिक भिजवायला घेतली.
........... हॉल मधला दिवा लागला तसे गोविंदराव उठून बसले. वैदेही ने न बोलता त्यांच्या हातात चहाचा कप ठेवला कडेला अजून एक अर्धा कप चहा ठेवला आणि डिश मध्ये गरम गरम पापुद्रा सुटलेली पोळी. गोविंररावांनी अर्धा कप चहा  घटाघटा  प्यायला. सावकाश पोळी चा रोल केला आणि चहाच्या कपात बुडवायच्या आधी आपले थरथरणारे दोन्ही हात जोडून डोळे मिटले त्यांच्या डोळ्याच्या कडा पणावल्या आणि नकळत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले 'अन्नपूर्णा सुखी भव' .आत वैदेही चा पोळ्या लाटता लाटता हात एकदम  थबकला . तिने मागे वळून पाहिले. देवापुढची सारखी केलेली समई ची ज्योत पुन्हा तेजाळली होती. तिचा मंद प्रकाश वैदेहीच्या चेहऱ्यावर पडला. तिच्यातली 'अन्नपूर्णा' जागृत झाली होती. रविवार असो किंवा सोमवार . तिने घेतलेला अन्नपूर्णेचा वसा असाच अखंड चालू राहणार होता.