Friday, 14 April 2017

लग्न एक संस्कार



* लग्न एक पवित्र संस्कार! *

(सर्व विवाहित व नवविवाहितांना समर्पित पोस्ट!)

© अनिल जाधव शिरपूरकर.


भारतीय पध्दतीचे लग्न!
पाणिग्रहण!!
सोळा संस्कारांतील एक संस्कार!  
दोन जीवांचेच नव्हे तर दोन कुटुंबांचे मिलन!
अग्नीदेवता, देव-ब्राम्हण, कुटुंबीय आणि समाज या सर्वांना साक्षी ठेवून, अग्निदेवतेभोवती सात प्रदक्षिणा घालून दोन शरीरे, मने आणि आत्मे ज्या पवित्र बंधनाने गुंफली जातात ते दोन जीवांचे जन्मोजन्मींचे बंधन! 

हिंदू धर्मशास्रानुसार मानवी जीवनात एकूण ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम , संन्यासाश्रम व
वानप्रस्थाश्रम असे आश्रम असतात.
त्यांतील गृहस्थाश्रमासाठी "पाणिग्रहण"  म्हणजेच लग्न हा संस्कार स्थिर व आदर्श मानवी जीवनासाठी  अत्यावश्यक आहे!

   भारतीय संस्कृतीनुसार मातृ-पितृ ऋण, गुरु ऋण, समाज ऋण व देश ऋण मानले जातात.

यांपैकी माता-पिता, गुरु, समाज व देश यांच्या सेवेतून ही ऋणे काही प्रमाणात फेडली जातात मात्र यांच्या सेवेच्या जोडीला कौटुंबिक प्रगती, समाजाची प्रगती व देशाची प्रगती ही ऋण फेडण्याची माध्यमे आहेत!

   हिंदू धर्मीय विवाहाचा मुख्य उद्देश म्हणजे 
आपल्या पोटी संतान जन्माला येवून, आपल्या वडीलांचा वंश पुढे चालविणे. 

    अशाप्रकारे आपल्या वडीलांचा वंश पुढे चालविणे हेच खरे पितृ ऋणातून मुक्त होण्याचे मुख्य लक्षण मानले जाते! 

 आणि यासाठी हिंदू विवाहानंतर पतिपत्नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध हा वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे! म्हणूनच  हिंदू विवाहात पतिपत्नींमधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे!

हिंदू विवाहामुळे जुळून आलेला पति-पत्नींदरम्यानचा तथाकथित  संबंध हा सामान्य परिस्थितीत तोडला जाऊ न शकणारा संबंध असतो. (अन्य काही धर्मांत विवाह हा विशेष परिस्थितीत तोडला जाऊ शकणारा पती व पत्नी यांमधील एका प्रकाराचा करार असतो.)

संसार रथाची पती व पत्नी ही दोन चाके मानली जातात.  

ही दोन्हीही चाके जेव्हा समसमान समर्पणातून संसाराचा रथ यशस्वीपणे ओढतात, तेव्हाच तो संसार हा सर्वांत सुखी संसार मानला जातो!

 म्हणूनच लग्न आपल्या हिंदू धर्माचा एक पवित्र संस्कार आहे! 

भारतीय लग्न हे जणू आपल्या सुखी जीवनाचा दर्पण आहे!

भारतीय लग्न पध्दतीमूळे नवरा-बायकोंची परस्परांची सुख-दुःखे जीवनभरासाठी जणू
एकमेकांना अर्पण केलेली आहे! 

भारतीय लग्न हे खरेतर नुसत्या दोन जीवांचेच नव्हे, तर दोन भिन्न  कुटुंबांचे मिलन आहे!

भारतीय लग्न हे दोन जीवांचे परस्परांना कायमस्वरुपी केलेले समर्पण आहे,

अशा अर्थाच्या काव्याने आपली सांगता करुन, आपला निरोप घेतो! 

* लग्न एक पवित्र संस्कार! *

लग्न एक पवित्र संस्कार, 
सुखी जीवनाचा दर्पण;
परस्परांची सुख-दुःखे, 
एकमेकांना ती अर्पण!

लग्न हे खरेतर मिलन,
दोन जीव न् कुटुंबांचे;
दोन जीवांचे परस्परांना,
हे कायमस्वरुपी समर्पण!



© अनिल जाधव शिरपूरकर.

पदर

• स्त्रिचा पदर •• 
    पदर  काय  जादुई  शब्द  आहे  
               हो  मराठीतला ! 

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार  नाही.  एक  सरळ  तीन 
             अक्षरी  शब्द. 

             पण  केवढं  विश्‍व
      सामावलेलं  आहे त्यात....!!

     किती  अर्थ,  किती  महत्त्व... 
     काय  आहे  हा  पदर.......?

साडी नेसणाऱ्या  स्त्रीच्या  खाद्यावर
रुळणारा  मीटर  दीड मीटर  लांबीचा
भाग.......!!
तो   स्त्रीच्या   लज्जेचं   रक्षण   तर
करतोच,   सगळ्यात   महत्त्वाचं  हे
कामच   त्याचं.   पण,   आणखी   ही
 बरीच  कर्तव्यं  पार  पाडत  असतो.

 या   पदराचा   उपयोग  स्त्री  केव्हा,
    कसा  अन्‌  कशासाठी  करेल, 
        ते  सांगताच  येत  नाही. 

सौंदर्य   खुलवण्यासाठी   सुंदरसा
पदर   असलेली    साडी   निवडते. सण-समारंभात   तर   छान-छान
पदरांची   जणू   स्पर्धाच   लागलेली
असते.  सगळ्या  जणींमध्ये  चर्चाही
 तीच. .....!!

लहान  मूल  आणि   आईचा  पदर, 
हे   अजब  नातं  आहे.  मूल  तान्हं
असताना   आईच्या   पदराखाली
जाऊन  अमृत   प्राशन  करण्याचा
 हक्क   बजावतं. .....!!

जरा  मोठं  झालं,  वरण-भात  खाऊ
 लागलं,  की  त्याचं  तोंड  पुसायला
आई  पटकन  तिचा  पदर  पुढे  करते
....

मूल   अजून   मोठं   झालं,   शाळेत
 जाऊ  लागलं,  की  रस्त्यानं  चाल-
ताना  आईच्या  पदराचाच  आधार लागतो.   एवढंच   काय,   जेवण 
  झाल्यावर  हात  धुतला, की  टाॅवेल
ऐवजी  आईचा  पदरच  शोधतं आणी  आईलाही  या  गोष्टी   हव्याहव्याशा
वाटतात  मुलानं  पदराला  नाक  जरी 
पुसलं,  तरी  ती  रागावत  नाही ...

त्याला  बाबा  जर रागावले, ओरडले 
तर मुलांना पटकन  लपायला आईचा पदरच  सापडतो.....!! 

महाराष्ट्रात  तो  डाव्या  खांद्या  वरून 
 मागे   सोडला  जातो.....!!

तर  गुजरात,  मध्य प्रदेशात  उजव्या 
 खांद्यावरून       पुढं     मोराच्या. 
 पिसाऱ्यासारखा   फुलतो ....!!

काही   कुटुंबात   मोठ्या   माणसांचा
 मान  राखण्यासाठी   सुना  पदरानं
चेहरा  झाकून  घेतात ..
 तर  काही  जणी  आपला   लटका ,
राग     दर्शवण्यासाठी     मोठ्या 
फणकाऱ्यानं   पदरच   झटकतात !

     सौभाग्यवतीची  ओटी  भरायची
ती  पदरातच  अन्‌  संक्रांतीचं   वाण
 लुटायचं   ते  पदर   लावूनच.

बाहेर   जाताना   उन्हाची   दाहकता
थांबवण्यासाठी  पदरच  डोक्यावर 
ओढला  जातो,  तर  थंडीत  अंगभर 
पदर   लपेटल्यावरच   छान   ऊब 
मिळते....!!

काही   गोष्टी   लक्षात   ठेवण्यासाठी
पदरालाच   गाठ   बांधली   जाते .
अन्‌   नव्या   नवरीच्या   जन्माची 
गाठ   ही   नवरीच्या   पदरालाच, 
नवरदेवाच्या   उपरण्यासोबतच
बांधली   जाते.....!!

पदर   हा   शब्द   किती   अर्थांनी 
           वापरला  जातो  ना.....? 

नवी.  नवरी   नवऱ्याशी   बोलताना 
पदराशी  चाळे  करते, पण संसाराचा 
संसाराचा  राडा  दिसला,  की  पदर
कमरेला   खोचून   कामाला   लागते 

देवापुढं आपण चुका कबूल  करताना म्हणतोच  ना .....?
माझ्या   चुका  " पदरात "  घे.‘

मुलगी मोठी  झाली,  की  आई  तिला 
साडी   नेसायला   शिकवते,  पदर
सावरायला   शिकवते   अन्‌   काय
 म्हणते  अगं,  चालताना  तू  पडलीस
 तरी  चालेल. ....!!

पण,   " पदर "  पडू   देऊ   नकोस !
अशी  आपली  भारतीय  संस्कृती.

 अहो  अशा  सुसंस्कृत आणी सभ्य
मुलींचा   विनयभंग  तर  दुरच्   ती. रस्त्यावरून     चालताना     लोकं
तिच्याकडे   वर  नजर  करून  साधे पाहणार   ही   नाहीत   ऊलटे   तिला  वाट  देण्या साठी  बाजुला सरकतील एवढी  ताकत  असते  त्या  "पदरात" ....... !!

   🙏🙏🙏🙏🙏सर्व स्त्रीयांना🙏🙏🙏🙏🙏⁠⁠⁠⁠

स्पर्श

स्पर्श! 
एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला त्वचेद्वारे दिलेला भावनात्मक संदेश!  

स्पर्श हा भावनात्मक संदेश असल्याने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीच्या मनात कोणता भाव आहे हे त्या स्पर्श होणाऱ्या व्यक्तीला लगेचच समजते वा समजायलाच हवे! 

म्हणजेच प्रत्येक भारतीयाला चांगला स्पर्श वा वाईट स्पर्श यांचा भावनात्मक संदेश ओळखता यायलाच हवा!

आणि फक्त चांगला भावनात्मक संदेश आपल्या स्पर्शातून इतरांना देता ही यायला हवाच! 

आणि म्हणूनच एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष स्पर्श करते तेव्हा पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात, कारण आपला स्पर्श हा केवळ आदरभावाचाच स्पर्श नव्हे, तर आपल्या स्पर्शातून माणूसकीचा मानसिक आधार  इतरांना मिळायला हवा! 

१) आपल्या कोणत्याही स्पर्शात कधीही विकारभाव नसावा.

२) आपण वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींना चरणस्पर्श करुन त्यांचा आशीर्वाद आपल्या मस्तकी धारण करतो, तेव्हा संबंधित वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींच्या चरणस्पर्शाचा फक्त वरवरचा आव नसावा.

३) आपण कोणता भावनात्मक संदेश आपल्या स्पर्शातून देतोय, हे आपल्या प्रत्येक स्पर्शातून इतरांना समजते आणि आपल्या या प्रत्येक स्पर्शातूनच आपला मूळ स्वभाव ओळखला जातो!

म्हणूनच आपल्या प्रत्येक स्पर्शातून स्पर्श होणाऱ्या व्यक्तीला आदरभाव जाणवेल, असाच भावनात्मक संदेश आपल्या स्पर्शाद्वारे इतरांना जायला हवा!

वरील अर्थाची चारोळी आधी सादर करतो आणि "चरणस्पर्श" एक वरदानात्मक संस्कार या उपविषयाकडे वळतो! 

* स्पर्श आणि चरणस्पर्श! *


कोणत्याही स्पर्शात नसावा विकारभाव,

चरणस्पर्शाचा नको फक्त वरवरचा आव;

हर स्पर्शातून ओळखला जातो स्वभाव,

प्रत्येक स्पर्शातून जाणवावा आदरभाव!


आता वळू या मानवतेच्या सर्वांत पवित्र स्पर्शाकडे! अर्थातच चरणस्पर्शाकडे!

चरणस्पर्श!
डोके नम्रतेने झुकवून, वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तीच्या  पायांना स्पर्श करीत केलेला मनोभावे नमस्कार वा दंडवत म्हणजे चरणस्पर्श होय!

   चरणस्पर्श करतांना आपल्यातील "मी"पणा सोडून "कमी"पणा घेतला जातो, म्हणूनच चरणस्पर्श हा एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याला समरसतेने केलेला प्रणिपात होय!

कळत-नकळत कुणाला तरी आपला पाय लागला तेव्हाही आपण नकळतपणे ज्या व्यक्तीला आपल्या पायाचा चुकून धक्का लागलाय, त्या व्यक्तीचाही आपण सहजपणे चरणस्पर्श करतो वा असे करावे! 

            आपल्या हिंदू धर्मात कोणतेही शुभ वा विधायक कार्य करण्यापूर्वी वरिष्ठांचे चरणस्पर्श करण्याची एक अतिशय चांगली परंपरा आहे!

   आजही अनेक घरांमध्ये सकाळी उठल्यावर अथवा घराबाहेर जातांना वरिष्ठांचे चरणस्पर्श केले जावून त्यांच्या आशीर्वादाची शिदोरी पुढील कामांसाठी बरोबर नेण्याची पध्दत आहे!


* वरिष्ठांचे वा सन्माननिय व्यक्तींचे चरणस्पर्श केल्याने :

१) वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींबद्दल आपल्या मनात आदर कायम राहतो.

   या आदरातून आपलेपणा तर येतोच, वरुन संबंधित वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्ती
व्यक्तींबद्दल मनात "आदरयुक्त भीती" तयार झाल्याने, या वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींचा मान राखण्यासाठी आपण आपल्या वर्तनात जाणीवपूर्वक  विधायक बदल करतो; त्यामूळेच   भविष्यात आपल्या हातून चुका वा पाप होण्याची शक्यता कमी होते!

२) वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींच्या आशीर्वादरुपी मस्तक व पाठीवरील प्रेमळस्पर्शाने त्यांच्यातील धनात्मक उर्जेचा लाभ प्रत्यक्षपणे आपल्याला मिळतो.

३) वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींच्या हृदयात आपल्याबद्दलच्या सहानुभूती व प्रेमविषयक एक विशिष्ट कोपरा तयार होवून, हे वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्ती आपल्याला केवळ मार्गदर्शनच नव्हे तर हरघडी मदत देण्याच्या मनस्थितीत असतात.

४) कनिष्ठांनी ज्येष्ठांचा चरणस्पर्श केल्याने दोन पिढ्यांमधील अंतर कमी करणारा दुवा तयार होतो; त्यामूळेच दोन पिढ्या समविचाराने एकत्र नांदून कौटुंबिक एकता तयार होते.

५) आपल्या सततच्या चरणस्पर्श करण्याच्या क्रियेने, आपल्या कंबरेची लवचिकता वाढीस लागून शरीरास उत्तम आरोग्य लाभते.

६) आपल्या अंगी संयमातून नम्रता येवून इतरांच्या सेवेची सवय आपल्या अंगी रुजते.

७) "जो झुकतो वा वाकतो तोच या जगी टिकतो", या जीवनसूत्रानुसार आपल्या जीवनाला, वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींच्या कृपाछत्राने एक विशिष्ट स्थैर्य अत्यंत कमी कालावधीत लाभते!

थोडक्यात  "आखडणे" हे प्रेताचे आपल्या व्यक्तिमत्वात दडलेले लक्षण नाहीसे होवून, आपल्या जीवनात "जिवंतपणा" येतो!

    "चरणस्पर्शा"चे वरील सर्व फायदे लक्षात घेता, "चरणस्पर्श" हा एक वरदानात्मक संस्कार आहे हे निश्चित! 

           वरिष्ठांच्या  वा सन्माननिय व्यक्तींच्या चरणस्पर्शाचे विधायक फायदे लक्षात घेवून, वरिष्ठ वा सन्माननिय व्यक्तींना चरणस्पर्श करण्याचा हा भारतीय संस्कार संरक्षित व संवर्धित करुन; हा चरणस्पर्शाचा  संस्कार संक्रमित करणे हिच खरी काळाची गरज आहे! 

शेवटी स्पर्श असो वा चरणस्पर्श,
आपल्या प्रत्येक स्पर्शातून आपल्यातील माणूसकीयुक्त आदर वा भावनिक आधार त्या स्पर्श होणाऱ्या व्यक्तीपर्यंत आपल्याकडून पोहोचायला हवा!


© अनिल जाधव शिरपूरकर.