* लग्न एक पवित्र संस्कार! *
(सर्व विवाहित व नवविवाहितांना समर्पित पोस्ट!)
© अनिल जाधव शिरपूरकर.
भारतीय पध्दतीचे लग्न!
पाणिग्रहण!!
सोळा संस्कारांतील एक संस्कार!
दोन जीवांचेच नव्हे तर दोन कुटुंबांचे मिलन!
अग्नीदेवता, देव-ब्राम्हण, कुटुंबीय आणि समाज या सर्वांना साक्षी ठेवून, अग्निदेवतेभोवती सात प्रदक्षिणा घालून दोन शरीरे, मने आणि आत्मे ज्या पवित्र बंधनाने गुंफली जातात ते दोन जीवांचे जन्मोजन्मींचे बंधन!
हिंदू धर्मशास्रानुसार मानवी जीवनात एकूण ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम , संन्यासाश्रम व
वानप्रस्थाश्रम असे आश्रम असतात.
त्यांतील गृहस्थाश्रमासाठी "पाणिग्रहण" म्हणजेच लग्न हा संस्कार स्थिर व आदर्श मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे!
भारतीय संस्कृतीनुसार मातृ-पितृ ऋण, गुरु ऋण, समाज ऋण व देश ऋण मानले जातात.
यांपैकी माता-पिता, गुरु, समाज व देश यांच्या सेवेतून ही ऋणे काही प्रमाणात फेडली जातात मात्र यांच्या सेवेच्या जोडीला कौटुंबिक प्रगती, समाजाची प्रगती व देशाची प्रगती ही ऋण फेडण्याची माध्यमे आहेत!
हिंदू धर्मीय विवाहाचा मुख्य उद्देश म्हणजे
आपल्या पोटी संतान जन्माला येवून, आपल्या वडीलांचा वंश पुढे चालविणे.
अशाप्रकारे आपल्या वडीलांचा वंश पुढे चालविणे हेच खरे पितृ ऋणातून मुक्त होण्याचे मुख्य लक्षण मानले जाते!
आणि यासाठी हिंदू विवाहानंतर पतिपत्नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध हा वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे! म्हणूनच हिंदू विवाहात पतिपत्नींमधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे!
हिंदू विवाहामुळे जुळून आलेला पति-पत्नींदरम्यानचा तथाकथित संबंध हा सामान्य परिस्थितीत तोडला जाऊ न शकणारा संबंध असतो. (अन्य काही धर्मांत विवाह हा विशेष परिस्थितीत तोडला जाऊ शकणारा पती व पत्नी यांमधील एका प्रकाराचा करार असतो.)
संसार रथाची पती व पत्नी ही दोन चाके मानली जातात.
ही दोन्हीही चाके जेव्हा समसमान समर्पणातून संसाराचा रथ यशस्वीपणे ओढतात, तेव्हाच तो संसार हा सर्वांत सुखी संसार मानला जातो!
म्हणूनच लग्न आपल्या हिंदू धर्माचा एक पवित्र संस्कार आहे!
भारतीय लग्न हे जणू आपल्या सुखी जीवनाचा दर्पण आहे!
भारतीय लग्न पध्दतीमूळे नवरा-बायकोंची परस्परांची सुख-दुःखे जीवनभरासाठी जणू
एकमेकांना अर्पण केलेली आहे!
भारतीय लग्न हे खरेतर नुसत्या दोन जीवांचेच नव्हे, तर दोन भिन्न कुटुंबांचे मिलन आहे!
भारतीय लग्न हे दोन जीवांचे परस्परांना कायमस्वरुपी केलेले समर्पण आहे,
अशा अर्थाच्या काव्याने आपली सांगता करुन, आपला निरोप घेतो!
* लग्न एक पवित्र संस्कार! *
लग्न एक पवित्र संस्कार,
सुखी जीवनाचा दर्पण;
परस्परांची सुख-दुःखे,
एकमेकांना ती अर्पण!
लग्न हे खरेतर मिलन,
दोन जीव न् कुटुंबांचे;
दोन जीवांचे परस्परांना,
हे कायमस्वरुपी समर्पण!
© अनिल जाधव शिरपूरकर.