Thursday, 26 September 2019

शेती आणि शेतकरी

शेती आणि शेतकरी 
का शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या 
नाही खूपत मनाला ?
शेतकऱ्यांचा तो आक्रोश का 
ऐकू येत नाही कुणाला ?
उपयोग नाही झाला 
करून पेरणी दुबारा 
झाला अवकाळी पाऊस 
अन् पडल्या गारा 
बिघडुन विस्कटुन गेला 
हिशोबाचा मेळ सारा 
शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या 
थांबल्या नाहीत धारा 
घर प्रपंचासाठी त्यांच
सर्वस्व लागलं होतं पणाला 
पण शेतकऱ्यांचा तो आक्रोश 
ऐकू येत नाही कुणाला
शेतकरी राजा बिचारा 
झाला आहे मुका
आसवांचा ओघ 
झाला आता सुका 
मदतीला धावतो कोणी 
नेता, अभिनेता 
सांडवतात इकडे तिकडे 
गोळा केलेल्या व्यथा 
व्यथेच्या त्या कथा आता 
नाही स्पर्शत रे कुणाला 
शेतकऱ्यांचा तो आक्रोश 
ऐकू येत नाही कुणाला
बरी नव्ही रे शेतकरी दादा 
सावकाराशी ती गट्टी 
कश्याला हवी पोकळ
प्रतिष्ठा ती खोटी 
हुंड्याची ती प्रथा मला 
भासली आज अघोरी 
लटकलेल्या बापाच्या फाशीची 
तिच तर रे दोरी 
खचू नकोस रे दादा 
आणि नको स्पर्श त्या दारूला 
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं नाही रे
घेणे-देणे आता कुणाला
मंत्री संत्री करती 
गुर्हाळ ती चर्चेची 
भळभळणाऱ्यां जखमेवर 
मलमपट्टी ती वरवरची 
माध्यम ही चघळतात 
शेतकऱ्यांच्या दूःखांना 
फूटत चालल्या आहेत साऱ्यांच्या 
डोळ्यातल्या संवेदना 
का झालं ते विवश मन 
हतबल निसर्गाच्या कोपाला 
शेतकऱ्यांचा तो आक्रोश 
ऐकू येत नाही कुणाला
शेतकरी दादा…
तुला कायमची मदत 
नाही रे कोणी करणार 
तुझं तुलाच सावरायला हवंय 
तुला कधी रे कळणार ?
उघडे डोळे ठेवून तुला 
आता जागृत रहायला हवं
गरज पडली तर हक्कासाठी 
कधी भांडायलाही हवं 
बदल राजा स्वतःला आता 
आणि कर समर्थ त्या मनाला 
शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता 
नाही खूपत रे कुणाला 
नाही खूपत रे कुणाला…
डॉ. सुभाष कटकदौंड – खोपोली

।। शेती आणि शेतकरी ।।
।। शेती आणि शेतकरी ।। 
★★★★★ 

© Rajesh Sabale

 1 Minutes    7.4K     7

Content Ranking

पोटच्या जीवा परी, शेतावरी केली माया।
कधी पिकलं शेतात, मूठ भर पीक खाया।।

मेघ पाहून आकाशी, काय शेतात पेरावं।
भेगाळल्या शेतास बांधावरून पहावं।।

रानंमाळ शेती सारी, उन्हानं करपली।
गुरढोर माणसांची, तोंड उन्हान सुकली।।

वाट पिकाची लागली, शेती गेली सारी वाया।
एक थेंब पावसाचा, नाही तोंडात टाकाया।।

विहिरी तलाव तळी, सारी उताणी पडली।
तरी दया कशी नाही, आता पावसास आली।।

आस वाटते मनाला, मेघ येईल धावत।
आता येईल पाऊस, सोनं पिकलं शेतात।।