Monday, 30 December 2019

*लक्ष्मीची पावलं..!*

लहानशी गोष्ट आहे. रात्री साडेनऊचा सुमार, एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचा टिपीकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार, तसाच  होता तो, बोलण्यात गावाकडचा लहेजा तरीही काॅन्फीडन्ट. बावीस-तेवीस वर्षांचा असेल. दुकानदाराच लक्ष पहिल्यांदा पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पाॅलीश केलेले..!

*दुकानदार* - काय सेवा करू..?

*मुलगा* - माझ्या आईला चप्पल हवीय. टिकाऊ पाहिजे..!

*दुकानदार )* - त्या आल्या आहेत का..? त्यांच्या पायाचं माप..?

मुलाने आपलं वाॅलेट बाहेर काढलं. त्यात चार घड्या केलेला एक कागद होता. त्या कागदावर पेनानं आऊटलाईन काढलेली दोन पावलं होती.

*दुकानदार* - अरे, मला मापाचा नंबर चालला असता..!

तसा तो मुलगा एकदम बांध फुटल्यासारखं बोलता झाला 'काय माप सांगू साहेब..?
माझ्या आयनं जिंदगीभर पायात कदी चप्पलच घातली नाय. आई ऊसतोड कामगार होती. काट्याकुट्यात कुटं बी जात्ये. अनवानी ढोरावानी मेहनत केली. मला शिकवलं. मी शिकलो अन् नोकरीला लागलो. आज पहिला पगार झालायं. दिवाळीला गावाकडं चाललोय. आईला काय नेऊ..? हा सवालच पैदा होत नाही. माझे किती वर्षांच स्वप्न होते. पहिल्या पगारातून आईला चपला घेऊन जायच्या.'

दुकानदारान चांगल्या टिकाऊ चपला दाखवल्या. आठशे रूपये किंमत होती. त्या पाहून मुलाने 'चालतंय की..!,' असे सांगितले. त्याची तयारी त्याने केली होती.

दुकानदाराने सहज विचारले, 'किती पगार आहे रे तुला..?

*मुलगा* - सध्याच्याला बारा हजार आहे. राहणे, खाणे धरून सात-आठ हजार खर्च होतात. दोन तीन- हजार आईला धाडतो..!

*दुकानदार* - अरे मग आठशे रूपये जरा जास्त होतात.

मुलाने दुकानदाराला मध्येच रोखत असुद्या म्हणून सांगितले.दुकानदाराने बाॅक्स पॅक केला. मुलाने त्याला पैसे दिले आणि तो आनंदात बाहेर निघाला. एवढी महागाची भेट किंमत करताच येणार नव्हती त्या चपलांची...!

पण दुकानदाराच्या मनात नेमके काय आले कुणास ठाऊक. मुलाला, जरा थांब असे सांगितले. दुकानदाराने अजून एक बाॅक्स मुलाच्या हातात दिला.

दुकानदार म्हणाला, 'ही चप्पल आईला तुझ्या या भावाकडून गिफ्ट असे सांग. पहिली खराब झाली की दुसरी वापरायची. तुझ्या आईला सांग आता अनवाणी फिरायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही.'

दुकानदाराचे आणि त्या मुलाचे असे दोघांचेही डोळे भरून आले. 'काय नाव तुझ्या आईचं..?,' असे  दुकानदाराने विचारलं तर तो *लक्ष्मी* असे ऊत्तरला.

दुकानदार लगेचच बोलला, 'माझा नमस्कार सांग त्यांना आणि एक वस्तू देशील मला..? पावलांची आऊटलाईन काढलेला तो कागद हवाय मला...!


तो मुलगा कागद दुकानदाराच्या हातात ठेऊन आनंदात निघून गेला. तो घडीदार कागद दुकानदाराने  दुकानाच्या देव्हाऱ्यात ठेवला. दुकानातील देव्हाऱ्यातला तो कागद दुकानदाराच्या लेकीनं बघितला आणि तिनं विचारलं, 'काय आहे हे बाबा..!

दुकानदार दिर्घ श्वास घेऊन आपल्या लेकीला बोलला *लक्ष्मीची पावलं'* आहेत बेटा...!. एका सच्च्या भक्ताने काढली आहेत. त्यानं बरकत येते धंद्याला..!. लेकीनं, दुकानदाराने आणि सगळ्यांनीच मनोभावे त्या पावलांना नमस्कार केला..!
 .....#आणि_म्हातारी_अमर_झाली.

लेखक- मनवंतराव साळुंखे.

       रात्री बराच वेळ झाला होता. भुसावळ जाणारी शेवटची बस वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपुर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी इकडे तिकडे रेंगाळत होते. या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजुन का सुटत नाही.
       तेवढयात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर आहे. तो काढला की गाडी सुटेल. बरोबर दहा वाजता बस निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी भुसावळ जाणारे होते. एका हातात बोचके धरुन बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकिट फाडण्यास आला तेव्हा रस्त्यावर फाटा असलेल्या व तेथुन तीन चार किलोमिटर दूर असलेल्या गावाचे तिकिट मागु लागली.
     बस वाहक विचारात पडला. या म्हातारीचे वय झालेले, एकटीच उतरणारी, पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहचेल?
     तो थोडासा म्हातारीवर रागावलाच की, 'तु एकटी, तुला नीट दिसत नाही, चालता येत नाही, एवढा उशीर का केला? लवकर उजेडात निघुन जायायचे ना?'
     म्हातारीला नीट ऐकु पण येत नव्हते. काही तरी उत्तर तीने दिले. वाहकाने तीला त्या गावाचे तिकिट दिले व आपल्या स्थानावर येवुन बसला.
     इतर प्रवाशी पेंगुळले होते. चालकाने दिवे बंद केले. वाहक मात्र म्हातारीचा विचार करीत होता. त्या फाट्यावर तर आपण तीला उतरुन देवु पण धड चालता न येणारी, व्यवस्थीत रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन चार किलोमीटर या पाणी पाऊसाच्या दिवसात घरी कशी पोहचेल? रस्ता खाचखळग्यांनी व खड्डांनी भरलेला, मध्ये एखादा नाला वाहत असेल तर? कुत्रे किंवा एखादया प्राण्याने या म्हातारीवर एकटे पाहुन हल्ला केला तर?
      तेवढयात म्हातारी उतरणार होती त्या गावचा फाटा आला. वाहकाने घंटी वाजविली. चालकाने बस थांबविली. वाहक उठला आजीबाईचे बोचके एका हातात व दुसऱ्या हातात तीचे बखोटे धरून तीला गाडीखाली उतरण्यास मदत केली. थोडा त्रागाही केला.
      बाहेर डोळयांना काहीही दिसत नव्हते. त्याने ते बोचके डोक्यावर घेतले व म्हातारीचे परत बखोटे धरून चालायला लागला तो एकाच विचाराने की म्हातारीला एकटे न सोडता घरापर्यंत सुरक्षित घरी पोहचविणे.
     म्हातारीलाही नवल वाटले. शक्य तेवढे ती ही त्याच्या पाऊलांबरोबर पाऊल टाकु लागली.
     इकडे बस चालक व प्रवाशींची 'दहा पंधरा मिनिटे झाली हा वाहक गेला कुठे?' अशी काव काव सुरु झाली. चालकाने बसखाली उतरुन बसला फेरी मारली की चक्कर वगैरे येवुन पडला की काय? नंतर त्याच्या लक्षात आले की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल.
     संताप झाला त्याचा. प्रवाशीही संताप करु लागले. अशा निर्जनस्थळी बस सोडुन हा निघुन गेला. काही म्हणाले 'चला हो, त्याला राहु द्या' वगैरे वगैरे.
       इकडे म्हातारीने त्या वाहकाला विचारले, 'बा तुझे नांव काय रे?'
     'तुला काय करायचे आजी माझ्या नांवाशी... मी महादू शिंदे.'
      'कोणत्या डेपोमध्ये आहे?'
     वाहक- 'चोपडा.'
     आजी - 'मुलेबाळे?'
     वाहक- 'आहेत दोन.'
     तेवढयात आजीचे पडक्या अवस्थेतील जीर्ण घर आले. दोन चार कुत्रे भुंकत पळाले. वाहकाला म्हातारीने कुलुपाची किल्ली दिली. त्याने कुलुप उघडुन दिले व तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला.
      ती म्हातारी त्या घरात व गांवात एकटी राहत होती. तीला जवळचे म्हणुन कोणीच नातेवाईक नव्हते. तीच्यावर प्रेम करणारे चौकशी करणारे काळजी करणारे असे कोणीही तीच्या आजुबाजुला फिरकत नसे.
      तीही फारशी मग कोणाच्या जवळ जात नसे. कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तीला वाटायचे, हा स्वार्थी आहे. याचा माझ्या इस्टेटवर डोळा आहे. ते वयोमानानुसार तीला वाटणे स्वाभाविक व सहजही होते.
      गांवा लगतच ज्याला ग्रामीण भाषेत पांढरी म्हणतात तसे चार बिघा शेताचे तुकडे तीच्या मालकीचे होते. ते दरवर्षी कोणास तरी पेरण्यास देऊन त्या मोबदल्यात पैसे घेवुन आपला उदरनिर्वाह करायची.
      असेच एक दिवस म्हातारी थोडी जास्तच आजारी पडली. तीने गांवचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलाविणे पाठविले. त्यांनाही म्हातारीने असे अचानक का बोलाविले म्हणुन नवल वाटले.
      ते घरी आले. म्हातारी उठुन बसली व त्यांना म्हणाली, 'दादा कागद काढा. हे दोन अडीच तोळे सोने, माझी पांढरी व हे घर महादू शिंदे, कंडक्टर, चोपडा याच्या नावावर लिहुन द्या व हे वीस हजार रुपये जमविले आहेत त्यातुन मी मेल्यावर क्रियाकर्म करा. मी जास्त दिवस काही जगणार नाही.
      सरपंच व ग्रामसेवक अबोल झाले. काय भानगड आहे, कोण हा महादू शिंदे कंडक्टर? त्याला सर्व म्हातारी का देतेय? असेल काही नाते असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला.
      दोन तीन दिवसात म्हातारी वारली. सरपंच व ग्रामसेवकाने तीच्या सांगितल्या प्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडले. सर्व आटोपल्यावर मग त्यांनी महादू शिंदे कंडक्टरचा चोपडा बसस्थानकावर शोध घेतला. त्याला भेटुन सर्व वृत्तांत सांगितला. साधारण वर्षभरापूर्वीचाच बस मध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठविले. म्हातारीने त्याच्यासाठी केलेले ऐकुन तर त्याला रडुच कोसळले.
     त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली. त्यांना नवलही व आनंदही वाटला. त्यांनी वाहकाला ठरल्या तारखेला त्या गांवी येण्याचे आमंत्रण दिले.
      वाहक महादू शिंदे गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले. सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातला. वाजतगाजत त्याला गांवाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले. तेथे सर्वजन विराजमान झाल्यावर तो शेताचा व घराचा नावावर करण्याचा कागद व म्हातारीने दिलेले अडीच तोळे सोने त्याच्या समोर ठेवले.
      महादू शिंदेंच्या डोळ्यातुन अश्रुच्या धारा लागल्या. मी केलेल्या एका छोटयाश्या मदतीची म्हातारी एवढी किंमत देवुन गेली. त्याला काहीच सुचत नव्हते.
     बाजुलाच मुलांचा गलका त्याला ऐकु येत होता. त्याने विचारले, 'येथे शेजारी हायस्कुल भरते का?'
       सरपंचाने, 'हो, शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात.' असे सांगितले.
      वाहक म्हणाला, 'का? गावठाणची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोनी देत शाळेसाठी?'
      सरपंच म्हणाले, 'गांवठाणची जागा नाहीच व शेत देण्यास कोणीच तयार होत नाही.'
      वाहक महादू शिंदे ताडकन खुर्चीवरुन उठले व टेबलावरील शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले, 'हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत. हे घर पण विक्री करा. त्यातुन येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोने हे विकुन शाळेला छान दरवाजा बांधा व त्यावर म्हातारीचे सुंदर नांव टाका.'
     टाळ्यांचा कडकडाट झाला. सरपंच व ग्रामस्थ भारावुन गेले. 'दरवाज्यालाच काय हायस्कुलला म्हातारीचे नांव देवु.'
      वाहक महादू शिंदे यांनी त्यांचे आभार मानुन निरोप घेतला. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारा गाव बघतच राहिला. झोळी फाटकी असुन सुद्धा गांवाचे सारे काही तो गांवालाच देवुन गेला होता व एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला.
      बंधुनो, एखाद्याला केलेली छोटीमोठी मदत कधीही वाया जात नाही. त्याच्या काळजात ती घर करुन जाते. समोरचा कृतघ्न झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडु नका.
©मनवंतराव साळुंखे,
 धाबे, पारोळा.
(आवडल्यास शेअर करतांना कृपया लेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती- मेघःशाम सोनवणे.)
श्री. मधुकर पोतदार, नाशिक, यांच्या संग्रहातून.
C/P.