Tuesday, 28 September 2021

श्रद्धा

 --------अवघा रंग एक झाला--------

"माई मी निघते,पोळी भाजी करून ठेवली आहे, दुपारी मावशी येतील ,त्यांना वरण भाताचा कुकर लावायला सांगा,रात्रीचं मी बघेन आल्यावर"

माई मख्ख चेहेऱ्याने अनुजा च्या सुचना ऐकत होत्या.त्यांच्या चेहेऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती,म्हणजे आजपण दिवस भर त्या एकट्याच असणार. नात काय शाळेतून आली की जेवेल आणि क्लास ला जाईल, तिथून आली की खेळायला मैत्रिणी कडे पळेल.

अनुजाचं त्यांच्या कडे लक्ष गेलं

"काय झालं माई?नाराज आहात का?

कसला राग आलाय का?माझं काही चुकलंय का?"

"तुझं काही चुकलं नाहीये ग बाई,माझंच चुकलंय,मीच एक अडगळ होऊन राहिले आहे तुमच्या घरात.."बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला.

आज काहीतरी वेगळाच नूर दिसतोय माईंचा,त्या सहसा असा त्रागा करत नाहीत .अनुजा ने पर्स खाली ठेवली त्यांच्या जवळ बसत तिने विचारलं

" काय झालं माई?मनात काय असेल ते बोलून मोकळ्या व्हा म्हणजे तुम्हाला हलकं वाटेल"

माईंनी एकदा अनुजा कडे बघितले,तिच्या आवाजात ,नजरेत आर्जव होतं, त्यांना एकदम अपराधी वाटलं.खरं तर त्यांना तक्रार करायला काही जागा नव्हती.घरात सगळ्या सोयी होत्या,मुलगा ,सून,नात सगळी त्यांच्याशी नीट वागत होती,त्यांचं औषधपाणी ,व्यवस्थित होत होतं,

फक्त प्रश्न होता तो त्यांच्या समोर अजगरा सारख्या पसरलेल्या वेळेचा....

"कंटाळा येतो ग दिवसभर, काही काम न धाम,टीव्ही बघितला की डोकं दुखतं, तुम्ही सगळी आपापल्या व्यापात....दिवस खायला उठतो बघ....पण हे बघ तुम्हा कोणाची काही चूक नाहीये......तुम्ही माझं सगळं व्यवस्थित करता....'सुख दुखतं' म्हणतात ना तसं झालय माझं"

अनुजा जरा विचारात पडली ,मग म्हणाली" तुम्हाला वाती करायला जमतील का?

"हो ......बोटं दुखतात त्याने सुद्धा..... पण थांबून थांबून करीन"

"ठीक आहे ,मी कापूस आणून ठेवीन तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही वाती करत जा."

अनुजा लहान मुलीची समजूत काढावी तशी बोलत होती माईंनी मान डोलावली तशी अनुजा म्हणाली

"निघू मग मी आता?रात्री लवकर येते....

अनुजा गेली आणि त्या घरात एकट्याच उरल्या....

इतक्यात बेल वाजली....

त्यांनी दार उघडलं.... खालच्या वाण्याच्या दुकानातला मुलगा  कापूस घेऊन आला होता

अनुजाच्या तत्परतेच त्यांना कौतुक वाटलं....त्यांनी पिशवी टेबलावर ठेवली

जेवण झाल्यावर त्यांनी  पिशवीतून कापूस पुढे काढला....तो फुटबॉल एवढा गोळा बघून माईंना हसूच फुटलं... एवढ्या कापसाच्या हजार- दीड हजार वाती होतील....आणि घरात वर्षात एखादं दुसऱ्या वेळी निरांजन लावलं जातं..... काय उपयोग इतक्या वाती करून?....

विचार मागे सारत त्यांनी वाती वळायला सुरवात केली .इतक्यात  ऋत्विका तिथे आली

"आजी मी पण करू"

"नको तुला नाही जमणार"

"तू शिकवं ना मला"

त्या दाखवतील त्या प्रमाणे ऋत्विका पण प्रयत्न करू लागली आणि विशेष म्हणजे तिला जमायलाही लागल्या

तिने केलेल्या वाती माई थोड्या सुधारून घेत होत्या....

पुढचे दहा बारा दिवस माईंना एक उद्योग च झाला .....वाती वळण्याचा....पण वेळही चांगला जात होता...वैषम्य एवढंच होतं की, एवढ्या वातींपैकी चार वाती सुद्धा घरात वापरल्या जाणार नव्हत्या.....

एवढी कशी अश्रद्ध माणस?एकही परंपरा पाळावी असे वाटू नये यांना?


अनुजा रोज सकाळी बाहेर पडत असे

ती संध्याकाळीच परते.... आज तर

सात वाजून गेले तरी अनुजा चा पत्ता नव्हता....शेवटी ७.३० ला आली.....

खूप थकलेली वाटत होती,हातात कसली तरी गुंडाळी होती.....

आल्या आल्या तिने माईंना हाक मारली.....

माई आल्या ...अनुजाने गुंडाळी उलगडली..... आणि....माईंच्या अंगावर काटा उभा राहिला...... ते विठ्ठलाचे चित्र होते ...मूर्तिमंत  पांडुरंग....त्यांच्या कडे फ्रेम होती... अगदी तसाच विठोबा रेखाटला होता....वत्सल,आश्वासक......माईंचे हात जोडले गेले.....स्वतःच्याही नकळत......

"कोणी काढलं हे चित्र?" भानावर येत माईंनी विचारलं....

"माई तुम्ही ऐकून थक्क व्हाल, हे चित्र करुणा नावाच्या एका अनाथ, दिव्यांग मुलीने काढलंय....."

 तिला दोन्ही हात नाहीयेत.... पायाने काढलंय तिने हे चित्रं ......तिलाच चित्र काढायला शिकवायला जात होते  पंधरा दिवस....."

"अगं किती सुरेख चित्र काढलंयन...

आपल्या कडे एक तसबीर होती पांडुरंगाची ...अगदी हुबेहूब तसंच चित्र आहे"

"अगदी बरोबर,कारण त्या फ्रेम वरूनच तिने हे चित्र काढलय...मीच नेली होती तिला दाखवायला....  तिने काढलेल्या ह्या चित्राला स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळालं ..... "

"आता ह्या चित्राचं काय करणार?"

"काही नाही ....खास तुम्हाला दाखवायला आणलंय"

"मी काय म्हणते हे चित्र आपण सोसायटी च्या लॉबी मध्ये लावूया,बाजूला चित्र कोणी काढलं त्याचीही माहिती लिहू.....नाहीतरी उद्या एकादशी आहे..."

"अरे वा ही आयडिया माझ्या डोक्यातच नाही आली.....फक्त सेक्रेटरिंची परवानगी घेऊ म्हणजे झालं"

झालं...सगळे कामाला लागले आणि चित्र खाली लागलं...बाजूला करुणा ची माहिती..... आणि बाजूला एक वही ठेवली....त्यात अभिप्राय लिहायचे होते....

माई तुम्ही नेहमी म्हणत असता ना की आम्ही अश्रद्ध आहोत .......तसं नाहीये माई...आमची श्रद्धा आहे .....पण देवावर....देवाच्या मूर्तीवर नाही...माई तुम्ही आणि ऋत्विका ने वाती केल्या होत्यात ना त्या मी देवळा जवळच्या दुकानात विकायला दिल्या त्याचे पैसे मिळाले त्यात थोडी भर घालून ,देवळा जवळच एक मुलगी रस्त्यावर फडकं टाकून हार,फुलं विकायला बसायची, तिला एक स्टूल,टोपली,हार अडकवायला स्टँड असं समान घेऊन दिलं,इतकी खुश झाली,पुन्हा पुन्हा आभार मानत होती,आज तुमच्या रुपात तिला पांडुरंग भेटला.....

 त्या मुली साठी तुम्ही,ऋत्विका, करुणा साठी मी ...आणि माझ्या साठी माझे बाबा 'पांडुरंग' होते....ज्यांनी मला माणसा मधला पांडुरंग ओळखण्याची 'नजर' दिली....

माई हसल्या"अगं भल्या माणसाची ओळख आम्हाला पण पटते.... देवमाणसा पुढे आम्ही कायमच लीन असायचो...आणि गरजू माणसाला मदत करायची बुद्धी देवाने आम्हाला ही दिली....पदराला खार लावून सुध्दा  मदत केली आहे आम्ही....पण तरीही मला परंपराही पाळावीशी वाटते गं....

परंपरा देवासाठी नाही तर स्वतः साठी, कुटुंबा साठी, समाजासाठी पाळायची.... आता इथे शहरात सगळी कडे उजेडच उजेड असतो, पण खेडेगावात संध्याकाळ झाली की,धड अंधार नाही, धड उजेड नाही अशा वेळी खूप उदास वाटत,मन कातर होतं ......

अशा वेळीच देवाशी निरांजन लावायची पद्धत होती,तुळशी जवळ दिवा लावून शुभंकरोती म्हणायला लागलं की मन शांत ,आश्वस्त होतं....अशा परंपरांमुळे आपलं मानसिक स्वास्थ्य टिकतं.... सणा उत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातली माणसं एकत्र येतात,नाती टिकतात,किरकोळ रुसवेफुगवे विसरले जातात.....अनुजा श्रद्धा ही बावनकशी सोन्यासारखी असते...पण सोन्याची लगड दोऱ्याला बांधून गळ्यात घातली तर कशी दिसेल?

परंपरा त्या लगडीचा सुंदर हार करते.....विस्तारते .....सर्वांना सामावून घेते.....श्रद्धेला एक लोभस रूप देते...."अनुजा चकित होऊन ऐकतच राहिली.....

आपण माईंना देवभोळ्या ,फारसा विचार न करता प्रथा पाळणाऱ्या समजत होतो......जरा विचार करून अनुजा म्हणाली,

"माई तुम्ही दमला असाल ,जरा आराम करा ,जेवायच्या वेळी हाक मारते तुम्हाला"

माई त्यांच्या खोलीत जाऊन आडव्या झाल्या , त्यांचा डोळा लागला....

त्यांना जाग आली ती अनुजा त्यांना उठवायला  आली तेव्हा.....त्या उठल्या .....त्यांनी ठरवलं आपल्या उपासाचे काही बोलायचे नाही....नाही केला उपास तर काय बिघडतं?....नाहीतरी ह्या प्रथा स्वतः साठीच असतात,असं आपणच नाही का सांगितलं अनुजाला....घरात निरांजन लागत नाही म्हणून आपण नाराज होतो...पण आज एका मुलीच्या आयुष्यात एक दिवा लागला....मग नाराजी कशाची?

त्या बाहेर आल्या ....ऋत्विकाने त्यांना हात धरून किचन मध्ये देव्हाऱ्याजवळ नेलं...माई बघतच राहिल्या.... विठोबाची तसबीर ठेवली होती....हार घातला होता.....आणि........निरांजन लावलं होतं.... माईंनी हात जोडले नि त्या डायनिंग टेबल जवळ आल्या......ताटात वरी तांदूळ, दाण्याची आमटी,बटाट्याची भाजी...  सगळा उपासा चा मेनू........

आज धक्क्यावर धक्के बसायचा दिवस होता......त्यांनी अनुजा कडे पाहिलं.....

"माई ,तुमचं पटलं मला,प्रथा आपल्या साठी पाळायची.....खरं सांगू मला पण बरं वाटलं हे सगळं करून....कारण

जे काही मी केलं त्या मागचा हेतू मला आज कळला....."

माई हसून म्हणाल्या "आणि आज मी परंपरा सोडायचं ठरवलं होतं....तुझ्या सारखा माणसातला पांडुरंग शोधायचा ,असं ठरवलं होतं....."

"चला ....म्हणजे आज आपल्या श्रद्धेचे वेगवेगळे रंग एकत्र आले....आणि

 'अवघा रंग एक झाला'

दोघी एकदम म्हणाल्या.....


मेधा दीक्षित

२२/०९/२०२१

 एक सभा में गुरु जी ने प्रवचन के दौरान एक 30 वर्षीय युवक को खडा कर पूछा कि


- आप मुम्बई मेँ जुहू चौपाटी पर चल रहे हैं और सामने से एक सुन्दर लडकी आ रही है , तो आप क्या करोगे ?


युवक ने कहा - उस पर नजर जायेगी, उसे देखने लगेंगे।


गुरु जी ने पूछा - वह लडकी आगे बढ गयी , तो क्या पीछे मुडकर भी देखोगे ?


लडके ने कहा - हाँ, अगर धर्मपत्नी साथ नहीं है तो। (सभा में सभी हँस पडे)


गुरु जी ने फिर पूछा - जरा यह बताओ वह सुन्दर चेहरा आपको कब तक याद रहेगा ?


युवक ने कहा 5 - 10 मिनट तक, जब तक कोई दूसरा सुन्दर चेहरा सामने न आ जाए।


गुरु जी ने उस युवक से कहा - अब जरा कल्पना कीजिये.. आप जयपुर से मुम्बई जा रहे हैं और मैंने आपको एक पुस्तकों का पैकेट देते हुए कहा कि मुम्बई में अमुक महानुभाव के यहाँ यह पैकेट पहुँचा देना... 


आप पैकेट देने मुम्बई में उनके घर गए। उनका घर देखा तो आपको पता चला कि ये तो बडे अरबपति हैं। घर के बाहर 10 गाडियाँ और 5 चौकीदार खडे हैं। 


उन्हें आपने पैकेट की सूचना अन्दर भिजवाई , तो वे महानुभाव खुद बाहर आए। आप से पैकेट लिया। आप जाने लगे तो आपको आग्रह करके घर में ले गए। पास में बैठाकर गरम खाना खिलाया। 


चलते समय आप से पूछा - किसमें आए हो ?

आपने कहा- लोकल ट्रेन में।


उन्होंने ड्राइवर को बोलकर आपको गंतव्य तक पहुँचाने के लिए कहा और आप जैसे ही अपने स्थान पर पहुँचने वाले थे कि उस अरबपति महानुभाव का फोन आया - भैया, आप आराम से पहुँच गए..


अब आप बताइए कि आपको वे महानुभाव कब तक याद रहेंगे ?


युवक ने कहा - गुरु जी ! जिंदगी में मरते दम तक उस व्यक्ति को हम भूल नहीं सकते।


गुरु जी ने युवक के माध्यम से सभा को संबोधित करते हुए कहा — "यह है जीवन की हकीकत।"


"सुन्दर चेहरा थोड़े समय ही याद रहता है, पर सुन्दर व्यवहार जीवन भर याद रहता है।"


बस यही है जीवन का गुरु मंत्र... अपने चेहरे और शरीर की सुंदरता से ज़्यादा अपने व्यवहार की सुंदरता पर ध्यान दें..  जीवन अपने लिए आनंददायक और दूसरों के लिए अविस्मरणीय प्रेरणादायक बन जाएगा।

प्रसाद

 🥥*"पाहे प्रसादाची वाट"*🥥


*प्रसाद हा देवाचा प्रतिसाद.*


*एका छोटय़ाशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !’’ माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.’’  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.*

*देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही !’’ गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:ख भरली कहाणी माहीत नव्हती.*

*कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’ गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !*

*गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला;  तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱयाचा लाभ होईल ! आपण प्रसाद घेतो. खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग ! जे वाटय़ाला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद  मानले की सारी घालमेलच संपते.    . गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.*

*एकदा लेखकाची नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवरा-आवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढय़ात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’*

*मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.*

*परमार्थ वेगळे काय शिकवतो ? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!*

*देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोडय़ातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.*

मजेशीर कविता

 😃😃😃😃😃😃😃

 *मजेशीर कविता* ....

चाल चाल चालले, तरी वजन कमी होईना 

धाव धाव धावले, तरी काटा काही हलेना 


सकाळी उठल्यानंतर भूक लागली फार 

चहात बुडवून खाल्ली बिस्किटं फक्त चार 


मग मारल्या थोड्या, दोरीवरच्या उड्या 

चवीसाठी खाल्ल्या दोन खोबऱ्याच्या वड्या 


योगासने करायची मग झाली वेळ 

पटकन खाऊन घेतली हेल्दी डायेट भेळ 


व्यायामाच्या घाईत सकाळ गेली टळून 

जेवणासाठी घेतले गरम वडे तळून 


मुखशुध्दीसाठी खाल्ले काजू-बदाम 

मनःशांतीसाठी केला थोडा आराम 


संध्याकाळ होताच जॉईन केले जिम 

घाम आला म्हणून खाल्ले आइसक्रीम 


वजन घटण्यासाठी चालत गेले घरी 

डीनरसाठी केला बेत श्रीखंड आणि पुरी 


दुस-या दिवशी सकाळी वजन करू म्हटले 

इतक्या मेहनतीने बघू वजन किती घटले 


कालच्यापेक्षा आज वजन वाढले थोडे

वजनकाटा चुकला कसा?  मला पडले कोडे ! 

😂😂🤣🤣


काल वडाने,आपट्याला विचारलं,

दुखतंय का रे जास्त..?

तुझ्याही फांद्या, तुझीही पानं,

माणसाने केली ना ध्वस्त...


वर्षातून एक दिवस,

म्हणे आपला असतो मान,

कुणी विचार करतो का,

आपल्यातही असतो प्राण...


त्यांचा उत्सव साजरा होतो,

आपली म्हणे होते पूजा,

त्यांना कुठे कळतेय मित्रा,

आपल्याला होणारी ईजा..


पूर्वी बांधायचे दोर वडाला,

आता फांद्या तोडून नेतात,

लचके तोडून त्याच वडाला,

काय तर म्हणे देव म्हणतात..


गरजेपेक्षा जास्त किती,

तोडतात फांद्या नी पाने,

निर्जीव झालेल्या पानांना,

मग म्हटलं जातं "सोने"


दुसऱ्याच दिवशी सोन्याचा,

फक्त पालापाचोळा होतो,

कालचा देव आज मात्र,

पायदळी तुडवला जातो...


कसली म्हणायची श्रद्धा ही,

कसली रे पही भक्ती,

स्वतःला नी निसर्गाला,

फसवायचीच ही युक्ती...


विरोध नाही आमचा कुठल्या,

चाली रीती प्रथांना,

पण बघवत नाही निसर्गाचा,

ऱ्हास उगा होताना


आपण कधी स्वतःला,

देव म्हणवून घेत नाही,

खूप आहेत दुःख आपली,

पण बोलता येत नाही...


आपण देतोय भरभरून,

त्यांनी गरजेपुरतंच घ्यावं,

सण साजरे करावे पण,

आम्हालाही जगू द्यावं...


-एक वृक्ष