Tuesday, 28 September 2021

श्रद्धा

 --------अवघा रंग एक झाला--------

"माई मी निघते,पोळी भाजी करून ठेवली आहे, दुपारी मावशी येतील ,त्यांना वरण भाताचा कुकर लावायला सांगा,रात्रीचं मी बघेन आल्यावर"

माई मख्ख चेहेऱ्याने अनुजा च्या सुचना ऐकत होत्या.त्यांच्या चेहेऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती,म्हणजे आजपण दिवस भर त्या एकट्याच असणार. नात काय शाळेतून आली की जेवेल आणि क्लास ला जाईल, तिथून आली की खेळायला मैत्रिणी कडे पळेल.

अनुजाचं त्यांच्या कडे लक्ष गेलं

"काय झालं माई?नाराज आहात का?

कसला राग आलाय का?माझं काही चुकलंय का?"

"तुझं काही चुकलं नाहीये ग बाई,माझंच चुकलंय,मीच एक अडगळ होऊन राहिले आहे तुमच्या घरात.."बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला.

आज काहीतरी वेगळाच नूर दिसतोय माईंचा,त्या सहसा असा त्रागा करत नाहीत .अनुजा ने पर्स खाली ठेवली त्यांच्या जवळ बसत तिने विचारलं

" काय झालं माई?मनात काय असेल ते बोलून मोकळ्या व्हा म्हणजे तुम्हाला हलकं वाटेल"

माईंनी एकदा अनुजा कडे बघितले,तिच्या आवाजात ,नजरेत आर्जव होतं, त्यांना एकदम अपराधी वाटलं.खरं तर त्यांना तक्रार करायला काही जागा नव्हती.घरात सगळ्या सोयी होत्या,मुलगा ,सून,नात सगळी त्यांच्याशी नीट वागत होती,त्यांचं औषधपाणी ,व्यवस्थित होत होतं,

फक्त प्रश्न होता तो त्यांच्या समोर अजगरा सारख्या पसरलेल्या वेळेचा....

"कंटाळा येतो ग दिवसभर, काही काम न धाम,टीव्ही बघितला की डोकं दुखतं, तुम्ही सगळी आपापल्या व्यापात....दिवस खायला उठतो बघ....पण हे बघ तुम्हा कोणाची काही चूक नाहीये......तुम्ही माझं सगळं व्यवस्थित करता....'सुख दुखतं' म्हणतात ना तसं झालय माझं"

अनुजा जरा विचारात पडली ,मग म्हणाली" तुम्हाला वाती करायला जमतील का?

"हो ......बोटं दुखतात त्याने सुद्धा..... पण थांबून थांबून करीन"

"ठीक आहे ,मी कापूस आणून ठेवीन तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही वाती करत जा."

अनुजा लहान मुलीची समजूत काढावी तशी बोलत होती माईंनी मान डोलावली तशी अनुजा म्हणाली

"निघू मग मी आता?रात्री लवकर येते....

अनुजा गेली आणि त्या घरात एकट्याच उरल्या....

इतक्यात बेल वाजली....

त्यांनी दार उघडलं.... खालच्या वाण्याच्या दुकानातला मुलगा  कापूस घेऊन आला होता

अनुजाच्या तत्परतेच त्यांना कौतुक वाटलं....त्यांनी पिशवी टेबलावर ठेवली

जेवण झाल्यावर त्यांनी  पिशवीतून कापूस पुढे काढला....तो फुटबॉल एवढा गोळा बघून माईंना हसूच फुटलं... एवढ्या कापसाच्या हजार- दीड हजार वाती होतील....आणि घरात वर्षात एखादं दुसऱ्या वेळी निरांजन लावलं जातं..... काय उपयोग इतक्या वाती करून?....

विचार मागे सारत त्यांनी वाती वळायला सुरवात केली .इतक्यात  ऋत्विका तिथे आली

"आजी मी पण करू"

"नको तुला नाही जमणार"

"तू शिकवं ना मला"

त्या दाखवतील त्या प्रमाणे ऋत्विका पण प्रयत्न करू लागली आणि विशेष म्हणजे तिला जमायलाही लागल्या

तिने केलेल्या वाती माई थोड्या सुधारून घेत होत्या....

पुढचे दहा बारा दिवस माईंना एक उद्योग च झाला .....वाती वळण्याचा....पण वेळही चांगला जात होता...वैषम्य एवढंच होतं की, एवढ्या वातींपैकी चार वाती सुद्धा घरात वापरल्या जाणार नव्हत्या.....

एवढी कशी अश्रद्ध माणस?एकही परंपरा पाळावी असे वाटू नये यांना?


अनुजा रोज सकाळी बाहेर पडत असे

ती संध्याकाळीच परते.... आज तर

सात वाजून गेले तरी अनुजा चा पत्ता नव्हता....शेवटी ७.३० ला आली.....

खूप थकलेली वाटत होती,हातात कसली तरी गुंडाळी होती.....

आल्या आल्या तिने माईंना हाक मारली.....

माई आल्या ...अनुजाने गुंडाळी उलगडली..... आणि....माईंच्या अंगावर काटा उभा राहिला...... ते विठ्ठलाचे चित्र होते ...मूर्तिमंत  पांडुरंग....त्यांच्या कडे फ्रेम होती... अगदी तसाच विठोबा रेखाटला होता....वत्सल,आश्वासक......माईंचे हात जोडले गेले.....स्वतःच्याही नकळत......

"कोणी काढलं हे चित्र?" भानावर येत माईंनी विचारलं....

"माई तुम्ही ऐकून थक्क व्हाल, हे चित्र करुणा नावाच्या एका अनाथ, दिव्यांग मुलीने काढलंय....."

 तिला दोन्ही हात नाहीयेत.... पायाने काढलंय तिने हे चित्रं ......तिलाच चित्र काढायला शिकवायला जात होते  पंधरा दिवस....."

"अगं किती सुरेख चित्र काढलंयन...

आपल्या कडे एक तसबीर होती पांडुरंगाची ...अगदी हुबेहूब तसंच चित्र आहे"

"अगदी बरोबर,कारण त्या फ्रेम वरूनच तिने हे चित्र काढलय...मीच नेली होती तिला दाखवायला....  तिने काढलेल्या ह्या चित्राला स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळालं ..... "

"आता ह्या चित्राचं काय करणार?"

"काही नाही ....खास तुम्हाला दाखवायला आणलंय"

"मी काय म्हणते हे चित्र आपण सोसायटी च्या लॉबी मध्ये लावूया,बाजूला चित्र कोणी काढलं त्याचीही माहिती लिहू.....नाहीतरी उद्या एकादशी आहे..."

"अरे वा ही आयडिया माझ्या डोक्यातच नाही आली.....फक्त सेक्रेटरिंची परवानगी घेऊ म्हणजे झालं"

झालं...सगळे कामाला लागले आणि चित्र खाली लागलं...बाजूला करुणा ची माहिती..... आणि बाजूला एक वही ठेवली....त्यात अभिप्राय लिहायचे होते....

माई तुम्ही नेहमी म्हणत असता ना की आम्ही अश्रद्ध आहोत .......तसं नाहीये माई...आमची श्रद्धा आहे .....पण देवावर....देवाच्या मूर्तीवर नाही...माई तुम्ही आणि ऋत्विका ने वाती केल्या होत्यात ना त्या मी देवळा जवळच्या दुकानात विकायला दिल्या त्याचे पैसे मिळाले त्यात थोडी भर घालून ,देवळा जवळच एक मुलगी रस्त्यावर फडकं टाकून हार,फुलं विकायला बसायची, तिला एक स्टूल,टोपली,हार अडकवायला स्टँड असं समान घेऊन दिलं,इतकी खुश झाली,पुन्हा पुन्हा आभार मानत होती,आज तुमच्या रुपात तिला पांडुरंग भेटला.....

 त्या मुली साठी तुम्ही,ऋत्विका, करुणा साठी मी ...आणि माझ्या साठी माझे बाबा 'पांडुरंग' होते....ज्यांनी मला माणसा मधला पांडुरंग ओळखण्याची 'नजर' दिली....

माई हसल्या"अगं भल्या माणसाची ओळख आम्हाला पण पटते.... देवमाणसा पुढे आम्ही कायमच लीन असायचो...आणि गरजू माणसाला मदत करायची बुद्धी देवाने आम्हाला ही दिली....पदराला खार लावून सुध्दा  मदत केली आहे आम्ही....पण तरीही मला परंपराही पाळावीशी वाटते गं....

परंपरा देवासाठी नाही तर स्वतः साठी, कुटुंबा साठी, समाजासाठी पाळायची.... आता इथे शहरात सगळी कडे उजेडच उजेड असतो, पण खेडेगावात संध्याकाळ झाली की,धड अंधार नाही, धड उजेड नाही अशा वेळी खूप उदास वाटत,मन कातर होतं ......

अशा वेळीच देवाशी निरांजन लावायची पद्धत होती,तुळशी जवळ दिवा लावून शुभंकरोती म्हणायला लागलं की मन शांत ,आश्वस्त होतं....अशा परंपरांमुळे आपलं मानसिक स्वास्थ्य टिकतं.... सणा उत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातली माणसं एकत्र येतात,नाती टिकतात,किरकोळ रुसवेफुगवे विसरले जातात.....अनुजा श्रद्धा ही बावनकशी सोन्यासारखी असते...पण सोन्याची लगड दोऱ्याला बांधून गळ्यात घातली तर कशी दिसेल?

परंपरा त्या लगडीचा सुंदर हार करते.....विस्तारते .....सर्वांना सामावून घेते.....श्रद्धेला एक लोभस रूप देते...."अनुजा चकित होऊन ऐकतच राहिली.....

आपण माईंना देवभोळ्या ,फारसा विचार न करता प्रथा पाळणाऱ्या समजत होतो......जरा विचार करून अनुजा म्हणाली,

"माई तुम्ही दमला असाल ,जरा आराम करा ,जेवायच्या वेळी हाक मारते तुम्हाला"

माई त्यांच्या खोलीत जाऊन आडव्या झाल्या , त्यांचा डोळा लागला....

त्यांना जाग आली ती अनुजा त्यांना उठवायला  आली तेव्हा.....त्या उठल्या .....त्यांनी ठरवलं आपल्या उपासाचे काही बोलायचे नाही....नाही केला उपास तर काय बिघडतं?....नाहीतरी ह्या प्रथा स्वतः साठीच असतात,असं आपणच नाही का सांगितलं अनुजाला....घरात निरांजन लागत नाही म्हणून आपण नाराज होतो...पण आज एका मुलीच्या आयुष्यात एक दिवा लागला....मग नाराजी कशाची?

त्या बाहेर आल्या ....ऋत्विकाने त्यांना हात धरून किचन मध्ये देव्हाऱ्याजवळ नेलं...माई बघतच राहिल्या.... विठोबाची तसबीर ठेवली होती....हार घातला होता.....आणि........निरांजन लावलं होतं.... माईंनी हात जोडले नि त्या डायनिंग टेबल जवळ आल्या......ताटात वरी तांदूळ, दाण्याची आमटी,बटाट्याची भाजी...  सगळा उपासा चा मेनू........

आज धक्क्यावर धक्के बसायचा दिवस होता......त्यांनी अनुजा कडे पाहिलं.....

"माई ,तुमचं पटलं मला,प्रथा आपल्या साठी पाळायची.....खरं सांगू मला पण बरं वाटलं हे सगळं करून....कारण

जे काही मी केलं त्या मागचा हेतू मला आज कळला....."

माई हसून म्हणाल्या "आणि आज मी परंपरा सोडायचं ठरवलं होतं....तुझ्या सारखा माणसातला पांडुरंग शोधायचा ,असं ठरवलं होतं....."

"चला ....म्हणजे आज आपल्या श्रद्धेचे वेगवेगळे रंग एकत्र आले....आणि

 'अवघा रंग एक झाला'

दोघी एकदम म्हणाल्या.....


मेधा दीक्षित

२२/०९/२०२१

 एक सभा में गुरु जी ने प्रवचन के दौरान एक 30 वर्षीय युवक को खडा कर पूछा कि


- आप मुम्बई मेँ जुहू चौपाटी पर चल रहे हैं और सामने से एक सुन्दर लडकी आ रही है , तो आप क्या करोगे ?


युवक ने कहा - उस पर नजर जायेगी, उसे देखने लगेंगे।


गुरु जी ने पूछा - वह लडकी आगे बढ गयी , तो क्या पीछे मुडकर भी देखोगे ?


लडके ने कहा - हाँ, अगर धर्मपत्नी साथ नहीं है तो। (सभा में सभी हँस पडे)


गुरु जी ने फिर पूछा - जरा यह बताओ वह सुन्दर चेहरा आपको कब तक याद रहेगा ?


युवक ने कहा 5 - 10 मिनट तक, जब तक कोई दूसरा सुन्दर चेहरा सामने न आ जाए।


गुरु जी ने उस युवक से कहा - अब जरा कल्पना कीजिये.. आप जयपुर से मुम्बई जा रहे हैं और मैंने आपको एक पुस्तकों का पैकेट देते हुए कहा कि मुम्बई में अमुक महानुभाव के यहाँ यह पैकेट पहुँचा देना... 


आप पैकेट देने मुम्बई में उनके घर गए। उनका घर देखा तो आपको पता चला कि ये तो बडे अरबपति हैं। घर के बाहर 10 गाडियाँ और 5 चौकीदार खडे हैं। 


उन्हें आपने पैकेट की सूचना अन्दर भिजवाई , तो वे महानुभाव खुद बाहर आए। आप से पैकेट लिया। आप जाने लगे तो आपको आग्रह करके घर में ले गए। पास में बैठाकर गरम खाना खिलाया। 


चलते समय आप से पूछा - किसमें आए हो ?

आपने कहा- लोकल ट्रेन में।


उन्होंने ड्राइवर को बोलकर आपको गंतव्य तक पहुँचाने के लिए कहा और आप जैसे ही अपने स्थान पर पहुँचने वाले थे कि उस अरबपति महानुभाव का फोन आया - भैया, आप आराम से पहुँच गए..


अब आप बताइए कि आपको वे महानुभाव कब तक याद रहेंगे ?


युवक ने कहा - गुरु जी ! जिंदगी में मरते दम तक उस व्यक्ति को हम भूल नहीं सकते।


गुरु जी ने युवक के माध्यम से सभा को संबोधित करते हुए कहा — "यह है जीवन की हकीकत।"


"सुन्दर चेहरा थोड़े समय ही याद रहता है, पर सुन्दर व्यवहार जीवन भर याद रहता है।"


बस यही है जीवन का गुरु मंत्र... अपने चेहरे और शरीर की सुंदरता से ज़्यादा अपने व्यवहार की सुंदरता पर ध्यान दें..  जीवन अपने लिए आनंददायक और दूसरों के लिए अविस्मरणीय प्रेरणादायक बन जाएगा।

प्रसाद

 🥥*"पाहे प्रसादाची वाट"*🥥


*प्रसाद हा देवाचा प्रतिसाद.*


*एका छोटय़ाशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !’’ माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.’’  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.*

*देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते! गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही !’’ गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले. गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली. बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:ख भरली कहाणी माहीत नव्हती.*

*कार्यक्रम छान झाला. निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’ गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही. प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !*

*गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला;  तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले. मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱयाचा लाभ होईल ! आपण प्रसाद घेतो. खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग ! जे वाटय़ाला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद  मानले की सारी घालमेलच संपते.    . गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.*

*एकदा लेखकाची नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवरा-आवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढय़ात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’*

*मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.*

*परमार्थ वेगळे काय शिकवतो ? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!*

*देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोडय़ातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.*

मजेशीर कविता

 😃😃😃😃😃😃😃

 *मजेशीर कविता* ....

चाल चाल चालले, तरी वजन कमी होईना 

धाव धाव धावले, तरी काटा काही हलेना 


सकाळी उठल्यानंतर भूक लागली फार 

चहात बुडवून खाल्ली बिस्किटं फक्त चार 


मग मारल्या थोड्या, दोरीवरच्या उड्या 

चवीसाठी खाल्ल्या दोन खोबऱ्याच्या वड्या 


योगासने करायची मग झाली वेळ 

पटकन खाऊन घेतली हेल्दी डायेट भेळ 


व्यायामाच्या घाईत सकाळ गेली टळून 

जेवणासाठी घेतले गरम वडे तळून 


मुखशुध्दीसाठी खाल्ले काजू-बदाम 

मनःशांतीसाठी केला थोडा आराम 


संध्याकाळ होताच जॉईन केले जिम 

घाम आला म्हणून खाल्ले आइसक्रीम 


वजन घटण्यासाठी चालत गेले घरी 

डीनरसाठी केला बेत श्रीखंड आणि पुरी 


दुस-या दिवशी सकाळी वजन करू म्हटले 

इतक्या मेहनतीने बघू वजन किती घटले 


कालच्यापेक्षा आज वजन वाढले थोडे

वजनकाटा चुकला कसा?  मला पडले कोडे ! 

😂😂🤣🤣


काल वडाने,आपट्याला विचारलं,

दुखतंय का रे जास्त..?

तुझ्याही फांद्या, तुझीही पानं,

माणसाने केली ना ध्वस्त...


वर्षातून एक दिवस,

म्हणे आपला असतो मान,

कुणी विचार करतो का,

आपल्यातही असतो प्राण...


त्यांचा उत्सव साजरा होतो,

आपली म्हणे होते पूजा,

त्यांना कुठे कळतेय मित्रा,

आपल्याला होणारी ईजा..


पूर्वी बांधायचे दोर वडाला,

आता फांद्या तोडून नेतात,

लचके तोडून त्याच वडाला,

काय तर म्हणे देव म्हणतात..


गरजेपेक्षा जास्त किती,

तोडतात फांद्या नी पाने,

निर्जीव झालेल्या पानांना,

मग म्हटलं जातं "सोने"


दुसऱ्याच दिवशी सोन्याचा,

फक्त पालापाचोळा होतो,

कालचा देव आज मात्र,

पायदळी तुडवला जातो...


कसली म्हणायची श्रद्धा ही,

कसली रे पही भक्ती,

स्वतःला नी निसर्गाला,

फसवायचीच ही युक्ती...


विरोध नाही आमचा कुठल्या,

चाली रीती प्रथांना,

पण बघवत नाही निसर्गाचा,

ऱ्हास उगा होताना


आपण कधी स्वतःला,

देव म्हणवून घेत नाही,

खूप आहेत दुःख आपली,

पण बोलता येत नाही...


आपण देतोय भरभरून,

त्यांनी गरजेपुरतंच घ्यावं,

सण साजरे करावे पण,

आम्हालाही जगू द्यावं...


-एक वृक्ष

Wednesday, 2 December 2020

Binding factors

 *Binding Factor*


" करंजी च्या सारणात थोडी कणिक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो." 


*लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची.*


पण कणिकच का? तांदळाचे  पीठ का नाही? तर त्यावर " अग गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. 

तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. " 


"मग आपण खव्याच्या किंवा मटार च्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ? माझा अजून एक आगाऊ प्रश्न। 

तर त्यावर " अग मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते।" 

तितकेच शांत पण तत्पर उत्तर. 

        

        पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर रेणू जुळणी तंत्राचा अभ्यास करताना हे सगळं उपयोगी पडले आणि त्यातले विज्ञान ही समजले. 


*किती सहजपणे माझ्या आईने  जीवनातल्या दोन गोष्टी मला समाजवल्या _* 


1. *अंगी ओलावा असेल तर गोष्टी मिळून येतात.*


2. *ओलावा कमी असेल तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो.* 

      

     नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding factor चे महत्व पटत गेले. 

        

          आणि आज दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली. 


नात्यांचंही असच आहे... 


*प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो , जो सर्वाना धरून ठेवतो.*

    

    मग ती एखादी अशी मैत्रीण असते जी बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणते , व्हाट्सअप्प ग्रुप बनवते आणि " contact मध्ये रहायचं ह" अशी प्रेमळ दमदाटी ही करते. 


कधीकधी असा binding  factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते. 

    

      *आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factor दिसतात.*


आपण त्याना एकेकदा भेटलेलेही नसतो  पण ते मात्र आपली चौकशी करतात, काळजीही करतात. आशा सगळ्या  binding factors ना माझा मानाचा मुजरा !!


समाजातील माणूसपण टिकून राहणे महत्त्वाचे.

    

 मंडळी, आपण मोठे झालो , *चला तर आता सर्वांना मिळवून आणणारे होऊ या.*

सुंदर

 _*"सुंदर.."*_


_लेखक- कौस्तुभ केळकर नगरवाला._


       तो हॅन्डसम वगैरे कधीच नव्हता. गरीब गाय मात्र नक्कीच होता. स्वभावाने आणि खिशानेही.

       कामकरी. आधी पोट मग पाटी. कमवा आणि शिका. आयुष्यभराचा विद्यार्थी.

      ग्रॅड्युएट झाला. नोकरीत इंटरेस्ट नव्हताच. जीभेवर खडीसाखर. माणसं जोडणारा फेव्हीकाॅली स्वभाव. मदतीला सदैव तयार. अशा माणसाला कोण मदत करणार नाही ?

       दोन चार आठ दहा.

सगळ्या लोकांनी मदत केली. पुरेसं भांडवल गोळा झालं. नवीनच झालेली ती पाॅश सोसायटी. सोसायटीच्या दारातला एक गाळा घेतला. डेली नीडस्'चं त्याचं दुकान.

सुरू झालं.

       गावाकडचा त्याच्यासारखाच एक धडपळू सोबतीला घेतला, होम डिलीव्हरीसाठी. वाॅटस्सप केलं की शून्य मिनटात डिलीव्हरी. 

      लोकांचा आळस... त्याची पळापळ. दुकान जोरात पळू लागलं. दोन तीन वर्षात सगळी देणी सपाट. काय नव्हतं त्याच्याकडे ? वाट्टेल ते.. सगळं मिळायचं. 

      गावाकडे जायला वेळ मिळेना. आजूबाजूच्या दहा बारा सोसायट्या. तो नसला की त्यांना आॅक्सीजन कमी पडायचा.

     त्याच्या डोक्यात एक्सपान्शनचे विचार. नाक्यावरची जागा. मोक्याची. कपड्यांची शोरूम. पुरेसं भांडवल. पुरेसा काॅन्फीडन्स. लवकरच सुरू होईल.

       लंबी रेस का घोडा था वो.. मुझे चलते जाना है ! स्लो बट स्टेडी. शुभम् भवतु!

      हे दुकान...? त्याच्या धावपळू जोडीदाराला हॅन्डओव्हर करायचं.

       ती. गोग्गोड हिमगौरी सुंदरा. भूलोकीची अप्सराच जणू. एकदम क्युटीफूल. त्याच सोसायटीत राहणारी. तन भी सुंदर, मन भी. हुश्शार, गोड पोरगी. आई बापाची एकुलती एक. ती स्वतः नोकरी करणारी. एका MNC त चांगल्या पोस्टवर, तरीही जमिनीवर.

       गेली दोन तीन वर्ष बघतीय ती त्याला. त्याची धावपळ, त्याची जिद्द, त्याचा स्वभाव. त्याची नजर, निरागस निर्मळ. मुलींशी, बायकांशी अतिशय नम्रतेने बोलायचा तो. कीप सेफ डिस्टन्स. आॅलवेज...

      तसा काळासावळाच होता तो. गावाकडे लहान असताना तालमीत घामगाळू मेहनत केलेली. आत्ताही व्यायाम चालूच होता. दणकट मजबूत स्टील बाॅडी. आवड्याच तिला.. तो. दिलसे.

      सोसायटीतली ती एकटीच बहुधा, जी स्वतः त्याच्या दुकानापर्यंत जाणारी. आधी आळस नको म्हणून.. नंतर. तिथं जायला आवडायचं, म्हणून. त्या वेडूला काहीच समजायचं नाही. प्रेमाच्या बाबतीत एकदम अनपढ.

     तीचा प्रश्नच नव्हता. 'माझा होशील काय ?'

      तो एकदम गडबडलाच. ऊंच जीनेसे धप्पकन खाली पड्यासारखं. "काय पाहिलंस माझ्यात ?" त्याला हेच विचारायचं होतं. चान्सच मिळाला नाही.

       पुढचं सगळं पटाटा. तिच्या आईबाबांचा लेकीवर पूर्ण विश्वास. तिचाही स्वतःवर. त्याच्या आईबाबांची समजूत जरा ऊशीरा पटली. टॅ टॅ ट्या टॅ ट टॅऽऽट्या.. गुँज ऊठी शहनाई.. शुभमंगल सावधान.

       तिथूनच जवळ एका सोसायटीत वन बीएच के घेतलाय त्यानं. सध्या भाड्यानेच. चालतंय की..

       काल एक छोटीशी पार्टी. तिच्या आॅफीसची गँग. तिचा बाॅस, कलीग्ज. सगळं आॅफीस हजर.

       त्याला सवयच नव्हती याची. लग्नात निळा सफारी शिवलेला. तो घालूनच गेला तो तिथं.

       काय दिसत होती ती.. तिच्या शेजारी तो. ब्लॅक अॅन्ड व्हाईट काॅम्बी. सगळ्यांचे चेहरे वाचले तिने. सगळ्यांनी काहीतरी छान गिफ्टलं दोघांना..

       माफक ड्रिंक्स ईतरांसाठी. ती दोघं त्या वाटेवरचे वाटसरू नव्हतेच कधी. मंद म्युझीक. छानसं जेवण. खिदळाट. तो जरा अवघडलेला. तरीही खूष.

       एकदम फिल्मी  अनाऊन्समेंट. "लेडीज अॅन्ड जेन्टलमन. मे आय हॅव यूवर अटेन्शन प्लीज."

      सगळ्यांनी कान टवकारले. ती बोलत होती. "थँक्स अ लाॅट. तुम्ही सगळे आलात, मला खूप बरं वाटलं. हाऊ ईज माय हब्बी ?"

     छोटासा पाॅझ घेतला तिनं. सगळ्यांच्या रिअॅक्शन्स वाचल्या तिनं. "आय नो... मला माहित्येय मी कशी आहे. दिसायला मी छान आहे. ईज ईट माय फाॅल्ट ? तुमच्या सगळ्यांचे डोळे स्कॅन करता येतात मला. जे फाॅर जेलसी. एस फाॅर सेक्सी. सगळं वाचता येतं मला. चलता है.. ईटस् ह्यूमन नेचर.

       तरीही तुम्ही सगळे खूप छान आहात. कुणीही आपल्या बाऊंड्रीज क्राॅस केल्या नाहीत कधी. ग्रेट. बाकी मन ही मन में... वो छोड दो.

       माय हब्बी..? वन्स अगेन. आय कॅन स्कॅन यूवर एक्स्प्रेशन्स.. "बंदर के हाथ अंगूर." "हम क्या ईतने बुरे थे ?"

       तुम्ही वाईट नव्हताच कधी. तो खूपच हॅन्डसम आहे. माझ्या चेहऱ्यामागच्या फिलींग्ज वाचता येतात त्याला. त्याचं केअरींग नेचर आणि निरागस, निरपेक्ष प्रेम. तेच आवडतं मला..

       और एक बात. त्याची तबीयत, स्टील बाॅडी. तीन चार लोगोंको तो पक्का भारी पडेगा वो. बच के रहना लोगो. अजून काय हवं ?

       बाकी त्याच्या फिल्डमधे तो डाॅन आहे. नोकरी करणारा नाहीये तो. नोकरीला लावणारा. म्हणूनच तो आवडतो मला. आय लव्ह माय हब्बी व्हेरी मच..."

       सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे. वो शरमा के मोतीचूर. सगळे जाम खूष.

      तिचा बाॅस. चाळीशीचा असेल. शेवटी तो बोलला. "ग्रेट.. ग्रेट आहात तुम्ही दोघं. मेन विल बी मेन. नेहमी मला काय पाहिजे याचा विचार करतो आम्ही. यूवर हब्बी ईज दी मोस्ट हॅन्डसम गाय. मुलीच्या मनातलं ज्याला ओळखता आलं तो  सगळ्यात हॅन्डसम. हिअर आफ्टर वीई आॅल विल काॅपी हिम.. बेस्ट आॅफ लक. विश यू हॅपी मॅरीड लाईफ."

      बाॅस ईज बाॅस. त्याचं म्हणणं पटलंच सगळ्यांना..

      एकदम म्युझीक चेंज. गरबा अॅटमाॅसफीअर.. ढोल बाजे रे.. सगळे आनंदाने डान्सू लागले. तो भारी नाचतो राव...

      दुसऱ्या दिवशी आॅफीस ग्रुपवर हेच सगळे फोटो. काय कॅप्शन असणार ? 'बंदर के...' अंहं..

      "लक्की गर्ल विथ हॅन्डसम गाय."

धूम मचालो..


_*©कौस्तुभ केळकर नगरवाला.*_

(आवडल्यास शेअर करतांना कथेत कुठलाही बदल न करता कृपया मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती- मेघःशाम सोनवणे 9325927222.)

_*C/P.*_

फटाके आणि फाटके

 _*🔸फटाके आणी फाटके.🔸*_


_लेखक-अनामिक._


      परवा सहज बाहेर पडलो. दिवाळी तशी म्हटली तर संपली होती. तसंही हल्ली दिवाळी पाच वरून दोन दिवसावर आली आहे...

      म्हटलं.., जरा सकाळी सकाळी फेरफटका मारून येऊ. असाच रस्त्याने एकटा चालत होतो अचानक माझी नजर रस्त्याचा दुसऱ्या बाजूला गेली ४ ~५ पोरं-पोरी वय जेमतेम ७ ~१०  वयोगटातील असतील... पोरं तशी फक्त चड्ड्या घालूनच होती आणि त्या पण बऱ्याच ठिकाणी फाटलेल्या नायतर ठिगळं जोडलेल्या. पोरींची कपडे पण तशी ठिगळांचीच जास्त होती...

      प्रत्येकाच्या हातात झाडू होता आणि ते रस्त्याला पडलेले फटाक्यांचे कागद झाडून काढत होती. जेवढा आनंद आमच्या पोरांच्या चेहऱ्यावर फटाके फोडताना दिसत असतो त्यापेक्ष्या दुप्पट त्यांच्या चेहऱ्यावर होता. जणू त्यांच्यातच शर्यत लागली होती, जास्त कचरा कोण साफ करतोय...

      मला कुतुहल वाटलं. त्यांचा उत्साह आणि ती धावपळ पाहून ..

       मी सहज रस्ता पार करून त्यांचेकडे गेलो. सर्वांना बोलावले आणि विचारले, ”का रे एव्हढी का गडबड सुरु आहे तुमची..?”

       हे ऐकून त्यातला एक पोरगा म्हंटला, ”आमचे आई- बाप रस्त्याची साफ सफाई करतात. आम्हाला दिवाळीची सुट्टी आहे, म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय, जो जास्त झाडलोट करेल त्याला भरपूर दिवाळी फराळ आणि नवीन कपडे मिळतील. आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या कचऱ्याचे वेगळे वेगळे ढीग करायचे. मंग आमचे आय - बाप त्यात काय फटाके असतील तर ते आम्हाला शोधून वाजवायला देणार.”

       हे ऐकून मी सुन्न झालो… त्यातून मी सावरून सहज विचारले, ”अरे तुम्हाला तर फटाके ह्यातले शोधून देणार मग तुम्हाला नवीन कपडे आणि फराळ कसा काय देऊ शकतात ते..?”

      त्यांच्यातली सगळ्यात मोठी पोरगी बोलली, ”काका, ते आमचे आई बाप झाडू मारत मारत जे बी घर रस्त्यात येतं, त्यांना विचारतात काय फराळ उरले असेल तर आमच्या पोरासनी द्या. कुणी देतो, कुणी असूनही हाकलून देतं..

       काही लोक लय चांगली असतेत, ते न इचारता देतात.. कपड्याचं पण तसंच. कुणी चांगली कापड देतं, कुणी फाटलेली... मग आमची आई त्याला जमत असलं, तर शिवते नायतर ठिगळ लावून देते. आणि मंग आम्ही ती आमची दिवाळीची कापडं म्हणून वरिस भर घालून फिरतो.”

      हे माझ्यासाठी खूप भयानक होते, असंही असू शकते, ह्यावर माझा विश्वास बसेना. माझ्या पाया खालची जमीनच सरकली…. सुख - समाधान कशात असतं..!! हे मला ह्या १० वर्षाच्या पोरांनी  दोन मिनिटात शिकवलं होतं...

      नाहीतर आम्ही १०० ची माळ आणली तरी त्या मोजत बसतो आणि १~२ फटाके जरी उडले नाही किंवा आवाज जरी कमी वाटला तरी सणासुदीला पण त्या दुकानदाराचा उद्धार करत बसतो... कपडे तर आम्ही AC शोरूम शिवाय घालतच नाही. त्याशिवाय दिवाळी होतंच नाही असा आमचा गैरसमज असतो.

      कुठं ते AC त गारठलेले कपडे आणि कुठं ती ठिगळांची कपडे... ज्यातून गारठापण रोखला जात नाही... पण त्यासाठी त्या छोट्या जीवांची चाललेली धडपड.. 

      त्यांची धडपड आणि आमची धडपड पाहून एकच फरक जाणवला, ते आनंदानं समाधानाने मिळेल तेच सुख मानणारी वाटत होती, पण आमची धडपड हि कधीच आनंदी वाटली नाही, कधी चेहऱ्यावर समाधान दिसलेच नाही. पण धडपडत राहत जायचे हेच आम्हाला माहिती. कारण आम्हाला सुख कशात आहे हेच समजत नाही..

       मी तसाच मागे फिरलो… घरातले सारे डब्बे शोधू लागलो. मिळेल तो फराळ पिशवीत घातला, पोरांची मिळतील ते ५~६ कपड्याचे जोड, बायकोच्या कपाटातल्या ढीगभर साड्यातल्या ३~४  साड्या, माझी काही कपडे एका पिशवीत भरली आणि थेट त्या पोरांकडे निघालो...

     इकडे माझं काय सुरु आहे, हे माझ्या बायको पोरांना समजत नव्हते. त्यांचा तिकडे दंगा सुरु होता आमचे कपडे, खाऊ घेऊन गेले…

       मी ते सारं त्या पोरांना दिलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.. त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं..

       मी परत फिरलो आणि जाता जाता त्यांना सांगितलं इथून पुढं कोणत्याही सणाला माझ्या घरी यायचं आणि इथून पुढे तुम्हाला दिवाळीची नवीन कपडे, फराळ आणि फटाके दरवर्षी मी देत जाईन...

       माझे डोळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पाण्यानी डबडबलेले … स्वतःला सावरत घरी आलो..!!

      आता माझी बारी होती. मला घरी उत्तर द्यायचे होते… मी घरी पोहचणार तोच दारात सारी मंडळी उभी होती. मी तसाच पायरीवर बसलो दोन्ही मुलांना जवळ घेतलं. बायको फुगून दाराला टेकूनच उभी होती. 

       मी मुलांना जे काय पाहिलं ते सगळं सांगितलं. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे भारीतभारी कपडे, दागिने, सुगंधी साबण आणि सुगंधी उटणं लावले तरच दिवाळी होते असं समजून आपण विनाकारण किती वायफळ खर्च करतो आणि समाजात असे किती तरी लोक आहेत  ज्यांना साधं साबण, तेल अश्या साध्या साध्या, त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळत नाहीत... हे समजावू लागलो.

      तुम्ही २ फुलबाजे कमी घेतले, तरी रुसून बसता. पण ती मुलं तुमच्या उडवलेल्या फटक्याच्या ढिगातून एकादी न उडलेली फटाकी मिळेल ह्या आशेने मन लावून तुम्ही केलेला कचरा साफ करत आहेत... हे समजावण्याचा प्रयत्न करत होतो..  

      ती पोरं रस्ता झाडत झाडत आमच्या घराजवळ आली होती.. आमच्या घरचे सारे एकटक लावून त्यांचेकडे पाहत होते.

      साऱ्याचे चेहरे पडले होते. तोच माझा छोटा मुलगा माझ्या जवळुन उठला आणि थेट घरात गेला, आणि लपवून ठेवलेले एक टिकल्याचे पॅकेट आणि बंदूक घेऊन बाहेर आला नि सरळ त्या पोरांकडे गेला आणि त्यांना दिले…

       हे पाहून त्या पोरांनी काम सोडलं आणि जणू काय आपल्या हातात हजाराची माळ पडल्यासारखे एक-एकजण ते टिकल्या बंदुकीत घालून वाजवत नाचू लागले…

      माझा मुलगा तसाच पळत आला नि माझ्या कुशीत बसून रडायला लागला. त्याला काय समजलं मला माहिती नाही आणि मी हि त्याला विचारणं मुद्दाम टाळलं, काहीही असेल... तरी एक वात पेटली होती त्याची मला जाणीव झाली होती.. 

      ह्या साऱ्यातून एक गोष्ट मला आणि माझ्या कुटुंबाला समजली ती म्हणजे “फटाके” आणि “फाटके” ह्यात फक्त एका “काण्याचा” फरक असतो आणि तो “काना” एकाद्या “काठी” सारखा असतो. योग्य ठिकाणी लागला तर साऱ्या गोष्टींचा आनंद देणारा आधार बनतो नाहीतर ते आयुष्याचं ओझं होतो ….

      म्हणून ठरवलं, आता कोणताही सण आला कि अश्या २ का होईना, पण ह्या पोरांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम करायचे .. फटाके एकदा पेटले, कि एकदा मोठा आवाज करून कागदच होतात पण कोणाच्यातरी चेहऱ्यावर एकदा पेटवलेले आनंदरुपी समाधान आवाज न करता पण एखाद्या रंगीत फुलबाज्या प्रमाणे फुलत राहतात.

_*लेखक-अनामिक.*_