*🕯️.🕯️.चार मेणबत्त्या.🕯️.🕯️*
एका छोट्या शहरातील गोष्ट.दिव्याच्या झगमगाट असलेल्या शहरात अचानक आठवडाभर वीज गेली.घरामध्ये खूप अंधार पसरला.उजेडासाठी एका छोट्या मुलाने घराच्या चार कोपऱ्यात एक एक अशा चार मेणबत्त्या लावल्या.खोली प्रकाशमान झाली.मुलगा झोपी गेला.
अचानक एक आश्चर्य घडलं.मेणबत्त्या चक्क बोलू लागल्या.एकमेकांशी बोलता बोलता त्या अर्ध्या जळून गेल्या होत्या.
पहिली मेणबत्ती म्हणाली " माझं नाव *शांती.* आयुष्यभर जग शांत आणि आनंदी राहावं म्हणून मी पेटत राहली. पण आता माणसं बदलली आहेत. सर्वत्र द्वेष ,भांडण आणि राग पसरला आहे.आता माझी गरज संपली आहे." असे म्हणत ती विझून गेली.
ते पाहून बाकी तीन मेणबत्त्या विचारात पडल्या.दुसरी मेणबत्ती बोलली."माझे ही हाल असेच झाले आहेत. माझं नाव *विश्वास.* लोकांची नाती मजबूत करण्यासाठी मी आयुष्यभर तेवत राहिले पण या कलियुगात माझी अवस्था बिकट आहे. फसवणूक आणि लबाडी वाढली आहे. माझी ही गरज संपली आहे."असे म्हणून त्या मेणबत्तीनेही निरोप घेतला. आणि अर्ध्या खोलीत अंधार झाला.
तिसरी मेणबत्ती मोठ्या आकाराची होती. खोलीच्या महत्वाच्या भागात लावली होती. ती चौथ्या मेणबत्तीला दु:खात म्हणाली, " ह्या दोन्ही मेणबत्त्या बोलतात ते बरोबर आहे.जग खूप निष्ठुर झालं आहे. माझं नाव *प्रेम.* माझं महत्वंच लोक विसरून गेले आहेत.आपल्या जवळच्या लोकांशी,नातेवाईकांशी आजकाल कोणी प्रेमाने बोलत नाही माझं ही पेटणं आता निरर्थक झालं आहे.आता तू तुझा विचार कर". तिसरी मेणबत्ती ही वाऱ्याने विझली.खोली एक छोटासा कोपरा सोडला तर अंधारून गेली.
छोटा मुलगा अचानक झोपेतून उठला.अचानक झालेला अंधार पाहून घाबरला व रडायला लागला.त्याने लावलेल्या तीन मेणबत्त्या विझल्या होत्या.एका निरुपयोगी कोपऱ्यात लावलेली सर्वात छोटी मेणबत्ती मात्र पेटत होती.तो रडत रडत बोलला.
" तू तरी कशाला पेटत राहलीस.तुझा काय उपयोग? बघ जवळपास पूर्ण खोलीत अंधार झाला आहे.तू पण जा आता विझून.आता सगळं संपलं आहे." आणि तो रडायला लागला.
त्याला रडताना पाहून चौथी मेणबत्ती बोलली. " अरे मी छोटी आहे.दुर्लक्षित आहे पण मी विझू शकत नाही.माझं नाव आहे *आशा.* खोलीत सर्वत्र अंधार आहे,मी जास्त प्रकाश देऊ शकत नाही पण मी खोली प्रकाशित करू शकते. माझी पेटणारी वात घेऊन तू ह्या विझलेल्या तिनी मेणबत्त्या पेटव आणि त्या अशाच तेवत राहतील याची काळजी घे"
हे ऐकून त्या मुलाला खुप आनंद झाला. त्याने आशेची मेणबत्ती घेऊन 'शांती,विश्वास आणि प्रेम' ह्या तिन्ही मेणबत्त्या पेटवल्या आणि पूर्ण घर पुन्हा प्रकाशमान झालं.
.....सध्याचे दिवस ही असेच काळेकुट्ट आहेत.मनाच्या खोलीत उदासीचा आणि चिंतेचा अंधार पसरला आहे.सर्वत्र अशांती पसरली आहे.अनेकांचे जीव वाचवण्याऱ्या डॉक्टरांवरही लोकांचा विश्वास राहिला नाही.सच्च्या प्रेमापेक्षा त्याचा दिखावा आणि स्वार्थ सर्वत्र दिसत आहे.प्रेमाचे मुखवटे घातलेल्या लोकांचे खरे चेहरे लक्षात आले आहेत. 'आता सर्व संपले आहे आणि कुणीही आपली मदत करू शकणार नाही' अशा विचारांमुळे काही जणांनी अगदी आत्महत्येच्या ही विचार केला आहे.पण एक दिवा ह्या भयाच्या अंधारातून मनाला बाहेर काढणार आहे तो म्हणजे 'आशा (HOPE). *'हे ही दिवस जातील आणि चांगले दिवस येतील'* हा आशादायी विचार आणि भावना.
चला मग स्वतःच्या मनाला बदलू.मग जग आपोआप बदलेल.आशेचा दिवा पुन्हा पेटवू आणि काळोखाशी लढत राहू.
म्हणूनच आजपासून "दिल हे छोटासा, छोटीशी आशा,दु:ख भरे मन की भोलीशी आशा" ......मग
*"फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश,दरी खोऱ्यातुन वाहे एक प्रकाश प्रकाश..."*
No comments:
Post a Comment