अबोला
काही मंडळी अबोल्याचा आपल्या विरोधकांविरोधात शस्त्रासारखा उपयोग करतात. ज्या व्यक्तीशी आपले मतभेद आहेत किंवा काही कारणाने वादविवाद झाला आहे, अशा व्यक्तीशी बोलणे बंद करणे, अबोला धरणे ही बाब समाजात सर्रास आढळते. या अबोल्यांना वयाचे, पदाचे, परिस्थितीचे, प्रांताचे, देशाचे कशाचेही बंधन नसते. विशेषत: नवराबायकोच्या नात्यात या अबोल्याला विशेष स्थान आहे.
लहानपणीे खेळता-खेळता मित्रमैत्रिणींशी भांडण झाले की, कट्टी त कट्टी, बालं बट्टी लिंबाचा पाला तोडू नको, बारा महिने बोलू नको, असे अगदी रितसर सांगून अबोला धरला जायचा, 12 महिन्यांची कालमर्यादाही घालून दिली जायची, एकप्रकारे 12 महिन्यांनंतर बोलण्याचे आश्वासन दिले जायचे. अर्थात हा अबोला अनेकदा 12 मिनटातच संपायचा, हा भाग वेगळा. (आताच्या लहान मुलांची अबोला धरण्याची काय पद्धत आहे, माहिती नाही.) मोठ्यांचा अबोला मात्र अनेकदा कुठलीही कल्पना न देता सुरू होतो. बरेचदा तर निर्णय एकतर्फी घेतलेला असतो. समोरच्याने आपल्याशी अबोला धरला आहे, त्या माध्यमातून तो आपल्याला शिक्षा देतो आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला अनेकदा माहिती नसते. कधी कधी तर ही अबोल्याची शिक्षा आपल्याला कशासाठी देण्यात आली आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला कळतच नाही. हे प्रगल्भतेचे लक्षण नक्कीच नाही. अबोल्याने कुठलेही प्रश्न सुटू शकत नाहीत. उलट गैरसमज वाढतात आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्यातले किती सुंदर सोनेरी क्षण या अबोल्यात आपण कायमचे हरवून बसतो. त्यापेक्षा एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला काही तक्रार असेल, किंवा त्याच्याशी काही विषयात मतभेद असतील, तर ते चर्चेतून सुटू शकतात. दोघांनीही एकमेकांविषयीच्या तक्रारी शांतपणे, समजूतदारपणे एकमेकांना सांगाव्यात गरज असल्यास दोघेही ज्या व्यक्तीला मानत असतील, अशा मध्यस्थाला सोबत ठेवावे. त्यातून काही मध्यम मार्ग निघू शकतो का, ते पाहावे. मतभेद अगदीच टोकाचे असतील आणि मार्ग निघण्याची शक्यता संपलेली असेल, तर तेवढा मतभेदाचा विषय बाजूला ठेऊन बाकी संबंध कायम ठेवले जाऊ शकतात. अर्थात यासाठी दोन्ही बाजूच्या व्यक्ती तेवढ्या प्रगल्भ असणे आवश्यक आहे. कारण बोलणे म्हणजे एकमेकांना त्यानिमित्ताने टोचणे किंवा कलगीतुरा नव्हे, तर संभाषण होय. अशा प्रकारे मतभेद विसरून संबंध कायम ठेवणारी माणसे हे समृद्ध मानसिकतेचे लक्षण आहे. अशा पद्धतीने वागणारी माणसेच मोठी होतात. त्यांच्या लोकसंग्रहात दिवसेंदिवस वाढच होते.
एरवी अशा बालिश अबोल्याने अनेक वर्षांचे चांगले संबंध संपुष्टात येतात. पुढे कधीतरी कळते. ज्या कारणासाठी आपण अबोला धरला होता, तो कोणीतरी तिसऱ्याने निर्माण केलेला गैरसमज होता. किंवा आपलाच अहंकार होता की मीच का बोलावे, मीच का पुढाकार घ्यावा, पण हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. चांगले नाते कोमजलेले असते.
जिथे बोलून किंवा मन मोकळे करूनही दुसरी व्यक्ती समजण्यापलिकडची असेल, किंवा आपल्या समजुतदारपणाला आपली कमजोरी समजली जात असेल, अशावेळी अबोल्याला पर्याय नसतो, अर्थात तरीही तुझ्या अशा वागण्यामुळे मी आता तुझ्याशी बोलणे बंद करणार आहे, हे त्या व्यक्तीला निश्चित सांगावे.
आयुष्य किती आहे, कोणाला माहिती आहे, मित्रांनो. कधीतरी छोट्याशा अहंकारामुळे किंवा गैरसमजामुळे आपण कोणाला तरी अबोल्याची शिक्षा देतो आणि कदाचित मग हळहळण्यापलिकडे आपल्या हातात काहीही उरत नाही.
अलिकडे हा अबोला मोबाईल, फोन, सोशल साईट्सलाही घेरून बसला आहे. अनेकदा एखाद्या व्यक्तीचा फोनच उचलला जात नाही. त्याच्या संदेशांना उत्तरही दिले जात नाही. कधी महत्त्वाचा निरोप असतो किंवा त्या व्यक्तीला तुमच्या मानसिक आधाराची नितांत गरज असते. अशावेळी त्या व्यक्तीची केलेली अडवणूक हा निव्वळ क्रुरपणा आहे.
नवे वर्ष येऊ घातले आहे, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग, अशा काही व्यक्ती असतातच. आपण स्वत:हून एक पाऊल पुढे टाकून बघुया का? आयुष्यातला कडू रस कमी होतोय का ते?
अशा अबोला धरलेल्या पण हवाश्या वाटणाऱ्या व्यक्तीला मनापासून हळुवार हाक देऊन तर बघा, मनावरचे मणामणांचे ओझे क्षणात उतरेल आणि मनातल्या सुकलेल्या झाडाला कोवळी लुसलुशीत पालवी फुटेल.
काही मंडळी अबोल्याचा आपल्या विरोधकांविरोधात शस्त्रासारखा उपयोग करतात. ज्या व्यक्तीशी आपले मतभेद आहेत किंवा काही कारणाने वादविवाद झाला आहे, अशा व्यक्तीशी बोलणे बंद करणे, अबोला धरणे ही बाब समाजात सर्रास आढळते. या अबोल्यांना वयाचे, पदाचे, परिस्थितीचे, प्रांताचे, देशाचे कशाचेही बंधन नसते. विशेषत: नवराबायकोच्या नात्यात या अबोल्याला विशेष स्थान आहे.
लहानपणीे खेळता-खेळता मित्रमैत्रिणींशी भांडण झाले की, कट्टी त कट्टी, बालं बट्टी लिंबाचा पाला तोडू नको, बारा महिने बोलू नको, असे अगदी रितसर सांगून अबोला धरला जायचा, 12 महिन्यांची कालमर्यादाही घालून दिली जायची, एकप्रकारे 12 महिन्यांनंतर बोलण्याचे आश्वासन दिले जायचे. अर्थात हा अबोला अनेकदा 12 मिनटातच संपायचा, हा भाग वेगळा. (आताच्या लहान मुलांची अबोला धरण्याची काय पद्धत आहे, माहिती नाही.) मोठ्यांचा अबोला मात्र अनेकदा कुठलीही कल्पना न देता सुरू होतो. बरेचदा तर निर्णय एकतर्फी घेतलेला असतो. समोरच्याने आपल्याशी अबोला धरला आहे, त्या माध्यमातून तो आपल्याला शिक्षा देतो आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला अनेकदा माहिती नसते. कधी कधी तर ही अबोल्याची शिक्षा आपल्याला कशासाठी देण्यात आली आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला कळतच नाही. हे प्रगल्भतेचे लक्षण नक्कीच नाही. अबोल्याने कुठलेही प्रश्न सुटू शकत नाहीत. उलट गैरसमज वाढतात आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्यातले किती सुंदर सोनेरी क्षण या अबोल्यात आपण कायमचे हरवून बसतो. त्यापेक्षा एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला काही तक्रार असेल, किंवा त्याच्याशी काही विषयात मतभेद असतील, तर ते चर्चेतून सुटू शकतात. दोघांनीही एकमेकांविषयीच्या तक्रारी शांतपणे, समजूतदारपणे एकमेकांना सांगाव्यात गरज असल्यास दोघेही ज्या व्यक्तीला मानत असतील, अशा मध्यस्थाला सोबत ठेवावे. त्यातून काही मध्यम मार्ग निघू शकतो का, ते पाहावे. मतभेद अगदीच टोकाचे असतील आणि मार्ग निघण्याची शक्यता संपलेली असेल, तर तेवढा मतभेदाचा विषय बाजूला ठेऊन बाकी संबंध कायम ठेवले जाऊ शकतात. अर्थात यासाठी दोन्ही बाजूच्या व्यक्ती तेवढ्या प्रगल्भ असणे आवश्यक आहे. कारण बोलणे म्हणजे एकमेकांना त्यानिमित्ताने टोचणे किंवा कलगीतुरा नव्हे, तर संभाषण होय. अशा प्रकारे मतभेद विसरून संबंध कायम ठेवणारी माणसे हे समृद्ध मानसिकतेचे लक्षण आहे. अशा पद्धतीने वागणारी माणसेच मोठी होतात. त्यांच्या लोकसंग्रहात दिवसेंदिवस वाढच होते.
एरवी अशा बालिश अबोल्याने अनेक वर्षांचे चांगले संबंध संपुष्टात येतात. पुढे कधीतरी कळते. ज्या कारणासाठी आपण अबोला धरला होता, तो कोणीतरी तिसऱ्याने निर्माण केलेला गैरसमज होता. किंवा आपलाच अहंकार होता की मीच का बोलावे, मीच का पुढाकार घ्यावा, पण हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. चांगले नाते कोमजलेले असते.
जिथे बोलून किंवा मन मोकळे करूनही दुसरी व्यक्ती समजण्यापलिकडची असेल, किंवा आपल्या समजुतदारपणाला आपली कमजोरी समजली जात असेल, अशावेळी अबोल्याला पर्याय नसतो, अर्थात तरीही तुझ्या अशा वागण्यामुळे मी आता तुझ्याशी बोलणे बंद करणार आहे, हे त्या व्यक्तीला निश्चित सांगावे.
आयुष्य किती आहे, कोणाला माहिती आहे, मित्रांनो. कधीतरी छोट्याशा अहंकारामुळे किंवा गैरसमजामुळे आपण कोणाला तरी अबोल्याची शिक्षा देतो आणि कदाचित मग हळहळण्यापलिकडे आपल्या हातात काहीही उरत नाही.
अलिकडे हा अबोला मोबाईल, फोन, सोशल साईट्सलाही घेरून बसला आहे. अनेकदा एखाद्या व्यक्तीचा फोनच उचलला जात नाही. त्याच्या संदेशांना उत्तरही दिले जात नाही. कधी महत्त्वाचा निरोप असतो किंवा त्या व्यक्तीला तुमच्या मानसिक आधाराची नितांत गरज असते. अशावेळी त्या व्यक्तीची केलेली अडवणूक हा निव्वळ क्रुरपणा आहे.
नवे वर्ष येऊ घातले आहे, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग, अशा काही व्यक्ती असतातच. आपण स्वत:हून एक पाऊल पुढे टाकून बघुया का? आयुष्यातला कडू रस कमी होतोय का ते?
अशा अबोला धरलेल्या पण हवाश्या वाटणाऱ्या व्यक्तीला मनापासून हळुवार हाक देऊन तर बघा, मनावरचे मणामणांचे ओझे क्षणात उतरेल आणि मनातल्या सुकलेल्या झाडाला कोवळी लुसलुशीत पालवी फुटेल.
No comments:
Post a Comment