Saturday, 6 May 2017

# "बेटी बचाव " म्हणताय ?

#  "बेटी बचाव " म्हणताय ? 
      का????
    उत्तर हवे- #    
                
 (लतिका चौधरी)

सर्वोच्च न्यायालयात एका एकतर्फी प्रेमातून त्रस्त एका आत्महत्या केलेल्या स्त्री संदर्भात न्याय देताना उद्विग्न न्यायाधीशाने काढलेले उद्गार--"या देशात महिला शांततेत का जगू शकत नाहीत?....."
 त्याचे वास्तव-(दै. सकाळ)
 महिला अत्याचाराच्या घटना घडतच आहेत.विशेष म्हणजे महिलांचा मानसिक,शारीरिक छळ करणारे स्वतः आईच्या पोटी जन्म घेऊन आलेले,बहीण,मुलगी,बायको अशी 'बाई'च्या मायेखाली वाढलेले,जगत असलेले असूनही त्यांच्यात परस्त्रीला छळण्याची,तिला येनकेन प्रकारे हतबल,लाचार करण्याची,अपयशी ठरविण्याची,दुय्यम ठरविण्याची,'तू बाई आहेस..'हे बाईपण पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची,तिचा विनयभंग करण्याची निच प्रवृत्ती,हरामीपण, हैवानी, पाशवी वृत्ती झिरपते तरी कुठून?जर तर मर्द आहेत तर स्वताच्या पुरुषीपणावर, मर्दांगीवर त्यांचाच विश्वास नाही का?खरे मर्द,खरे पुरुष
'बाईपणाला लाचार करत नाहीत,'बाई ' ला कमी लेखत नाहीत,हक्क,जबरदस्ती,जुलूम करत नाहीत.
भारतात अनेक महान आत्मे होऊन गेलेत,
शिवाजी महाराज,शाहू,आंबेडकर,फुले यांच्या सारखे 'स्त्री'ला माणूस मानणारे जगोद्धारक ह्या खलनायकांच्या नजरेसमोर येत नसतील का?
पर स्त्री जर अशा हरामी वृत्तीच्या लोकांजवळ शांतपणे,सुरक्षितपणे,सन्मानाने राहू शकत नसेल तर यांची आई,बहीण,बायको,स्त्री जातीतील कोणतीही नाती यांच्या सानिध्यात कधीच कधीच सुरक्षित नसेल.
शाहू,फुले,आंबेडकर यांचा आत्मा,त्यांचे कार्य यांच्या हिणकस जन्माने,जगण्या-वागण्याने रडत,कुढत आहेत ह्याची ह्या 'माणूस'जातीला कलंक असणाऱ्या ,कफल्लक वृत्तीच्या लज्जेने
 मरत असेल.
राज्यघटनेने स्त्री ला शिक्षणाचे,जगण्याचे,अभिव्यक्ती            स्वातंत्र्य दिले,निर्णयाचे अधिकार दिलेत.
अंधाऱयात्रा संपेल,लख्ख उजाडेल,पिढ्या न पिढ्या अन्याय सहन करणाऱ्या बाईला मोकळा श्वास घेता येईल असे स्वप्न महान जीवांनी पाहिले.यश ही आले.पण  ' येरे माझ्या मागल्या...'सुरूच आहे.पाहिले पाढे पंचावन्न सुरूच आहे.
सीता,द्रौपदीपासून फरपट आजही सुरू आहे.
नावं, घटना,कारणे,निमित्त फक्त बदल.
भले कायद्याचे सरंक्षण (कागदावरचे)असो,
उच्च पदवी असो,अंतराळात भरारी मार,सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बन,राष्ट्रपती,पंतप्रधान बन, तुझी फरफट ,सोसणे काही संपणार नाही.गौरव किती?(दिखाव्याचा) -मातृदेवता,न्यायदेवता,
ग्रामदेवता,कुलदेवता....
भाषणं... स्त्री जातीचा पुळका असलेला पोकळ देखावा,...ढोंगीपणाला तोड नाही.
देवतेच्या रुपात पुजणारा हा देश तीला फक्त
आणि फक्त 'बाई'म्हणून पुजतो.
चुल आणि मुल ची मर्यादा सोडून तिने तिच्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्र पादाक्रानत केलीत,पण तिथं ती एकटीच.
(अरे हां, 'एकटी स्त्री' तर 'विकृत सांडांना खुर उधळायला मोकळे रानच ! 'एकटी स्त्री' म्हणजे त्यांच्या बापजाद्याचा मुलूखच ! त्या राक्षसांना कल्पना नसावी का, की कधीतरी आपली रक्ताची-पोटची पोर,आपलीच बायको ,आई 'एकटी' होऊ शकते?....नसावी कदाचित .  'स्त्री' घरची किंवा बाहेरची...तिच्या 'बाईपणाची 'मजा घेणाऱ्या 'भंडव्यांना'याची जाणीव असेलच कोठून ?)
 येनकेनप्रकारे 'हाती'आली नाही तर तिची बदनामी,टिंगलटवाळी,डावलणे,अनुल्लेख,  वगळून काढणे,त्याची झाली नाही म्हणून दुसऱ्याशी नावे जोडणे,अपप्रचार करणे असे 'राक्षसी, हैवानी'धंद्याचे उपद्व्याप ते करत राहतात.                                                             हे सर्व तिला कळते ही,पण ती आपल्या मर्यादा,संस्कृती,संस्कार जपते.वयक्तिक,  प्रापंचिक,सामाजिक,आर्थिक असे अनेक अडचणी मुळे ती हतबल,लाचार होते.तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत राहते. 
स्वतः शिक्षा भोगते कारण कायदा तिला माहीत 
असतो.चोर,गुंड,मवाली वृत्तीच्या या लोकांनी
पोलीसांना 'कंठपुतळी'करून ठेवलेले असते.
नेते,पुढारी यांनाही अशा गावगुंडांची गरज असते म्हणून तेही 'यांना'पाठीशी घालतात.
 मग सामान्य,लाचार,हतबल ,'बाई'ला 'बाई '
बनवून चूप केले जाते.ती जळत राहते,तगमग
करत राहते,कुणालातरी जगवण्यासाठी जगत 
राहते .'बाई'पणाचं ओझं वाहत राहते.
टुक्कार मात्र हसत,खिदळत,विजयोत्सव मनवत राहतात ......
पण 'त्यांना'कल्पना नाही-
नियती नावाची गोष्ट विश्वात अजूनही वास करते.अपमान हा गुणाकाराने परत मिळतो.कधी ना कधी नियतीची लाठी,मार पडतच असतो.नालायकाचा एक दिवस कुठल्या ना कुठल्या रुपात नायनाट होतच असतो. कर्माचे फळ भोगायला मिळते म्हणजे मिळतेच.
म्हणून 'बेटी बचाव','लेक वाचवा-लेक शिकवा'
असे म्हणण्यापूर्वी आधी तिच्या जन्माचा सन्मान करा.तिला 'माणूस'म्हणून वागणूक द्या.⁠⁠⁠⁠

No comments:

Post a Comment