माणसं....
मला माणसांना भेटायला फार आवडतं. लहानपणापासून. माणसं आवडतात मला. अनोळखी माणसांना भेटण्यात, जाणून घेण्यांत त्यांना एक अनोखी मजा असते. त्यांच्याकडून बरंच काही मग कळतं जातं आपलं आपल्याला. टिपतं राहतंच आपलं मन. नकळतपणे आपल्याच. एखाद्या टिपकागदासारखं. माणूस बदलला समोरचा की हा कागद बदलून टाकला जातो. तो सुद्धा नकळतपणे आपल्याच. म्हणून मला वाटतं की आपलं मन हे एखाद्या टिपकागदासारखं असावं. पण काही काही जणांचं असं नसतं, त्यांची मनं कार्बन पेपर सारखी असतात. म्हणजे जाणारी माणसं गेलीच निघून आयुष्यातून त्यांच्या तरी ते आपले ठसे उमटवून जातात. आणि मग त्या खुणा जन्मखुणांसारख्या बाळगत अशी माणसं जगतं राहतात. माझ्या मते असं जगणं खूप त्रासदायक आहे. आणि नव्याने येणाऱ्या माणसांवर अन्यायकारक सुद्धा आहेच. येणारा नवीन माणूस जुन्या सारखा कसा असेल? रोजचं साधं ऊन घ्या. ते सुद्धा नसतंच रोज तसंच आणि सारखं. हिवाळी दिवसांत कलेकलेने त्यातला उबदारपणा कमी होतं जातो. आणि उन्हाळी दिवसांत तो त्याचं कलेकलेने वाढतं नाही का जातं? आणि पावसाळ्यातलं जांभळं ऊन, कलणाऱ्या दिवसाच्या खांदयावर बसून ते जेव्हा परतीच्या प्रवासाला निघतं तेव्हा ते अनुपम सुंदर दिसतं.....
काही माणसांची तर अजूनच गंमत असते. म्हणजे त्यांनी असा 'निज शैशवास जपावे' असा वसाचं घेतलेला असतो जणू. ती मग वाढतंच नाहीत. वयानं वाढली तरी. अशा माणसांच्यात एकाच वेळी बरंच काही सापडतं बघा मग. म्हणजे ती माणसं सतत काही तरी करत असतात. हसतात, रडतात, बोलतात. सगळंच. आणि बेलगाम. चांगलं का वाईट हे ठरवणारे आपण कोण? पण ह्यांचे राग, लोभ फार तीव्र असतात. त्यांच्या मधला मी पण खूप मोठा असतो. त्यांच्या सावलीपेक्षा सुद्धा लांब. आणि अनेकदा अशी माणसं फक्त स्वतःबद्दल बोलत असतात. आणि ते फार कंटाळवाणं जातं होऊन. म्हणजे सापडलाच आहे समोरचा तावडीत छान तर ऐकवा त्याला असा एकूण रोख आणि होरा असतो ह्यांचा. अशा माणसांना भेटून, बोलून त्यांच्याशी काही लागत नाही मग हाती. माझ्या ओळखीच्या एका बाई आहेत. त्या ‘मीभक्त’ आहेत. एकच गोष्ट इतक्यांदा आणि परत परत त्याचं उत्साहानं त्या सांगतं असतात. जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा गुदमरल्यासारखं होतं मग. म्हणजे बाई हुशार आहेत, चटपटीत, कामसू गुण आहेतच अनेक. पण त्या ते इतक्यांदा उगाळून सांगतात की ते स्वस्तुतीचे थाळाभर गंध मग संपता संपत नाही.
काही काही वेळा तर माणसं हातालाच लागतं नाहीत. इतकी ती खोटी, तकलादू आणि वरवरची असतात. कचकड्याची. त्यांच्याबद्दल लिहिलं तरी ते तकलादू होईल इतकी. म्हणून त्यांच्याबद्दल इतकंच. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलंच आहे, आणि असतंच ते तसं. आपण कसे दिसतं असू समोरच्याला? कसे वाटतं असू? आणि जसे दिसतं असू तसेच आहोत का नक्की आपण? असे सुद्धा प्रश्न मग मनात येऊनच जातात. आणि व्यक्त होणाऱ्या माणसांना, विचार करणाऱ्या माणसांना ते जास्त तीव्रतेने पडतात. कधी कधी आपल्यालाच आपली नवीन ओळख पटत जाते. जगण्यातले प्रश्न कधी कधी इतके गुंतागुंतीचे आणि तीव्र असतात की आपला अभिमन्यू आणि युधिष्टिर दोन्हीही होऊन जातो. एकाच वेळी परत. म्हणजे आपला प्रश्न म्हणून आपण त्यात अडकलेले राहतो. कधी नकळतपणे आपल्या समोरच्याचा प्रश्न आपला होऊन जातो. इतके आपण जोडलेले असतो. अशावेळी ना ते सहन करता येतं ना त्यातून सुटका मिळते. म्हणून म्हटलं आपला अभिमन्यू होतो. आणि युधिष्टिर का? तर अनेकदा आपल्याला ‘सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्, न ब्रूयात् सत्यम् अप्रियम्’ असं वागावं लागतं. आणि हे सगळं आपण आपल्या मायेच्या माणसांसाठी करत असतो. इतकी ती महत्वाची असतात. असतातच. कारण अनेकदा प्रश्नांना उत्तरंच नसतात. किंवा येणारा काळ हेच एक उत्तर. मग अशा वेळी काय करायचं असतं? अशावेळी माणसं काय करतात? जी आपल्या आधी जगून गेलेली असतात. माझ्या मते ती पुस्तकं वाचतात.
इतक्या वेगवेगळ्या माणसांना भेटून, बोलून काय मिळतं? आणि अजूनही का भेटतो आपण त्यांना? ह्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा किती अस्पष्ट, किती धूसर. आपल्या मनांत संदिग्धता नाही हे कितीही आवर्जून आणि ठासून सांगितलं आपण तरी काही क्षण चकवूनच जातात. मला तर हे सगळं असं टेकडी चढण्यासारखं वाटतं. म्हणजे माथा दिसतं असतो. अंतर माहित असतं. आपली कुवत सुद्धा असतेच माहित. बरं वर जाऊन तिथे काही लागेलंच हाती हे नसतं माहित. आणि दिसेल ते हवंच होतं का हे सुद्धा कुठं असतं माहित चढतांना टेकडी. पण तरीही आपण ती टेकडी चढतो. माणसांचं असंच आहे. किती भेटतात. हजार अनुभव देऊन जातात. काही परत तेच नव्याने. कधी अगदी नवे, कोरे. कधी इतके जुने की जाळीदार पिंपळाचे पान. पण तरीही आपण भेटतोच त्यांना. न जाणो कोणत्या असोशीने... आणि राहूच भेटत, हे सुद्धा खरंय.
© प्राची बापट
No comments:
Post a Comment