Saturday, 6 May 2017

ही गोष्ट आहे, दोन मित्रांची.

ही गोष्ट आहे, दोन मित्रांची. एक सामान्य तर दुसरा असामान्य. दोन विपरित वृत्तींचे माणसं एखाद्या वेळी निभवुन घेतिल, पण जर त्यातला एक “दिव्यांगी” असेल तर..? सिनेमातली ‘दोस्ती’ वगैरे ठिक आहे हो..., आपण विचारात तेव्हां पडतो, जेव्हां अशे मित्र आणि त्याचं जीवन आपल्या डोळ्या समोरुन जातो. तर मित्रांनो, अशीच एक मैत्री, जी मी जवळुन अनुभवली आहे, त्यांची ही गोष्ट.
      कॉलेजमधे असताना, मी ज्या मेस मधे जेवायला जात होतो, तिथे अशेच् दोन मित्र जेवायला यायचे. एक ‘अजय’ नावाचा, सावळा उंचपुरा आणि अप-टु-डेट मुलगा, जो मेस मधे आल्या-आल्या आदि दोन खुर्च्या रिजर्व करायचा आणि बाहेर जाउन गाडीवर बसलेला आपल्या दिव्यांग मित्र ‘भावेश’ ला, ज्याचे दोन्ही पाय कंबरेपासुन लुळे होते, आपल्या दोन्ही हातात अलगत उचलुन आणायचा आणि एका खुर्चीवर बसुन द्यायचा आणि स्वतः बाजुच्या खुर्चीवर बसुन जेवायचा. आम्ही सगळे त्यांच्याकडे मोठ्या कौतुकीने बघायचो, ते कशे एकामेकाला मैनेज करतात आणि मुख्य म्हणजे ते दोघं अगदि सामान्य लोकांन प्रमाणे वागायचे. कशाची ही परवा न करता, ते सहज आप-आपले कामं करायचे, जणु त्यांना आता एकामेकाची सवयच् लागली असावी.
      अजय आणि भावेश रोज सकाळी आणि संध्याकाळी मला भेटायचे. हळु हळु परिचय वाढला आणि मी एके दिवशी त्यांच्या रुमवर दोघांना भेटायला गेलो, सहज बोलता बोलता मी त्याच्याबद्दल चौकशी केली, तर भावेश म्हणाला, “बाबु, याचे वडिल आमच्याकडे लहानपना पासुन लाकडाच्या टालावर लाकडं विकण्याचं काम करायचे. आमच्याकडे फॉरेस्टचे लाकडं येतात आणि लाकडं विकणं हा आमचा व्यवसाय आहे. याचा आणि माझा जन्म एकाच महिन्यात झालं आहे, मी जरी काही दिवस मोठा असलो, पण हा पट्ठा माझ्या मोठ्या भावासारखी देखरेख करतो. अगदी म्हणजे, सकाळी संडासापासुन तर रात्री झोपुन देयी पर्यंत, हा माझी सेवा करतो. लहानपना पासुन हा माझ्या सोबतीला आहे, तेंव्हा हा मला साईकिलवर शाळेत घेउन जायचा. आता पल्सरवर नेतो... हा-हा-हा...” दोघेही हासायला लगले.
“बरं का मन्या...” चहा देत अजय बोलला, “लहानपना पासुन माझं संपुर्ण खर्च शेटजी, भावेशचे वडील उचलत आहे.”
“अरे पण तु माझी सेवा करित नाहीका...?” भावेश हसत म्हणाला...! मग दोघही हसायला लागले. मी पण चहा घेत त्यांच्या आनंदात सामिल झालो.
      भावेश हा एका गुजराती कुलिन घराचा दिव्यांग पुत्र होता आणि त्यांचा लाकडाचा मोठा व्यवसाय होता. अजय, हा त्यांच्याकडे काम करणार्या एका गडी-माणसाचा गरिब मुलगा. जेमतेम पगारात् अजयचे वडिलांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केलं नसावा कि त्यांच्या सारख्या गरिब मजुराचा मुलगा, आपल्या मालकाच्या मुलासोबत सि.ए.चं शिक्षण घ्यायला शहरात् जाणार..! नशिबाचे खेळ बघा, अजयचा भविष्य, हा भावेश मुळेच् चमकणार होतं..! भावेश जर दिव्यांग नसता, तर अजय जास्तित जास्त आपल्या वडिलांच्या सोबत टालावर कारकुन झाला असता..., पण आता तो सि.ए. होणार होता. कुठे अकाऊंटंट आणि कुठे सि.ए., खुप मोठा फरक आहे यात, आणि याची परिणिती भविष्यात काय होणार होती, देवालाच् माहित.
      आमची भेटीगाठी रोजच् व्हायची. ते दोघं कधी सिनेमा तर कधी पानीपुरी च्या ठेल्यावर सुद्धा भेटायचे. पण असामान्याला सुद्धा सामान्याप्रमाणे कसं जगायचं, हे कुणी त्यांच्याकडुन शिकावं. वर्षा वर वर्ष भराभर निघत होते, आम्ही सुद्धा आप-आपल्या शिक्षणाच्या अंतिम पडावावर येउन पोहोचलो होतो. एके दिवशी मेस मधे अजयला एक फोन आला आणि त्याच्या चेहर्यावरचे रंग उडाल्यासारखे वाटले मला. तो फोन घ्यायला बाहेर आला आणि थोड्यावेळानी बोलुन जेवण आटोपटं घेतलं. भावेश त्याच्याकडे उत्सुकतेनी बघत होता कि आता हा मला कुणाचं फोन होतं, हे सांगेल...! शेवटी त्यांनिच् अजयला विचारले, “कुणाचा फोन होता रे..?”
“ऑफिस मधुन होता, सरांचा...” अजय म्हणाला.
      ऑफिस म्हणजे जिथे हे दोघं आर्टिकलशिप करित होते, हे मलापण कळलं, पण त्यात घाबरण्यासारखं काय होतं, हे भावेश सोबत आम्हा सगळ्यांना विचारात टाकत होतं, पण अजयच्या सेवाभावामुळे त्याच्या या कृतीत् जास्त काही शंका घेणं अम्हाला योग्य वाटत नव्हतं. नंतर मला कळलं, अजय ऑफिसच्या एका आर्टिकल मुलीच्या प्रेमात पडला होता...! प्रेम हा जर सांगुन आला असता तर भावेशनी त्याला कधीचं ‘नो-एंट्री’ चा बोर्ड दाखविला असता.., कारण अजय जर त्याच्या जिवनातुन एकदा का निसटला, तर त्याची देखरेख कोण करणार... हा एक मोट्ठा यक्षप्रश्न भावेशसमोर उभा होता. भावेशला कळल्यावर तो कसा रिएक्ट करणार, याची मला उत्कंठा आणि भिती पण होती.
      भावेशला, अजयचं प्रेम-प्रकरण कळायला जास्त दिवस लागले नाही, पण तो मोठ्या मनाने त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करित होता. दिव्यांगी माणसं फार प्रेमळ आणि चांगल्या मनाचे असतात, हे माझ्या एकुण अनुभवाने मी सांगु शकतो. काही वेगळे असतात, पण भावेशनी आपल्या मनावर पुर्ण ताबा कमविला होता आणि तो कुठल्याही प्रसंगाला तोंड सुद्धा द्याला तैयार होता. काळानी भावेश साठी काय लिहुन ठेवले होते, देव जाणे. पण त्याचं भलं व्हावं, हे आम्हा सगळ्यांना वाटत होतं..!
      दिव्यांगी मुलाला त्याच्या आई-वडिलांन् शिवाय दुसरं कुणीही समजु शकत नाही, पत्नी सुद्धा नाही, कारण तिचं त्या व्यक्तिशी रक्ताचं नातं नसतं. मग अजयतर परका होता, फक्त एका उपकाराखेरीज भावेशची सेवा करायला भाग पाडायला दुसरं काहिच् कारण नव्हतं त्याला. तसं बघितलं तर उपकार फेडण्याकरिता दुसरे अनेक मार्ग असु शकतात, तो या सेवेच्या मोबदल्यात पैशे घेउ शकत होता, पण तरी तो निश्काम भावनेने भावेशची सेवा करित होता. लहानपना पासुन तर आता २४-२५ वर्षा पर्यंत, खुप मोठा काळ असतो हा. जीवनहा नेहमी बदलत असतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या नंतर, प्रत्येक तरुण मनाला कुणाचीतरी साथ लागते, त्यांच्या सळसळणार्या उग्र रक्ताला हळुवार फुंकर घालणारा कुणीतरी हवं असतं. अजयचं मनसुद्धा कुणालातरी शोधित होता, कि जिच्या ऑफिसमधे येताच एक परिचित परफ्युमचा झोका सरळ डोक्यात् शिरणार, कि जिच्या मोकळे केसांचा स्पर्श हवंहवंसं वाटणार, कि जी चोर नजरेनी आपल्या मैत्रिणीच्या घोळक्यातुन त्याला स्माईल देणार, कि जी केसं सावरण्याच्या निमित्याने त्याला “हाय...” म्हनणार, कि जी ऑडिट करिता बाहेर जाता जाता, “कॉल मी..” चा संकेत देणार...!
      अजय सुद्धा एक माणुस आहे, त्याला सुद्धा मन, भावना आहे, त्याचं सुद्धा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, एक सेवाभावी मन आहे, मग त्याला थोडं स्वतःसाठी जगणं, इतकं स्वातंत्रतर मिळालाच पाहिजे, नाही का..? भावेशला सुद्धा हे कळत होतं, तो दिव्यांगी आहे, पण अजयतर नाही..! तो अक्षम असेल, पण अजयतर सक्षम आहे..! आणि मन मोठं केल्यानी त्याचे लुळे पायतर सरळ होणार नाही, कि त्यात प्राणतर येणार नाही..! आयुष्याच्या शेवटच्या श्वासा पर्यंत त्याला एका आधाराची गरज भासणार होती, हा एक कटुसत्य भावेशला माहित होतं, म्हणुन कधी कधी तो बेचैन होउन जायचा, कपाळावर घाम यायचा आणि तो आपल्या नशिबाला दोष द्यायला लागायचा..! मला इतकी बुद्धि दिली, दोन व्यवस्थित पाय दिले असते तर काय बिघडलं असतं देवाचं...? देवाच्या कारखान्यात् सुद्धा अंग प्रत्यंग, ‘आउट-ऑफ-ऑर्डर’ होतात का कधी..?
“काय विचार करतोस रे मित्रा..?” भावेश दचकला..! “अरे, मी आहे ना...!” अजय बोलला, जणु त्याला भावेशच्या मनाचं कळत होतं.
“तुला... अंजली आवडते का..?” भावेशनी अजयला सरळ प्रश्न विचारलं. अजय दचकला, त्याच्या कपाळावर घाम फुटायला लागलं..! “तुला कुणी सांगितलं..?” अजयनी डोळे खाली करत, अपराधभावने विचारले.
“फुल उमळला कि तो त्याच्या सुगन्धानेच् कळतं...!” भावेश मिस्किलपणे बोलला, “ऑफिस मधे सगळ्यांना माहित आहे तुमच्या प्रकरणाबद्दल...”
“सॉरी...” अजय हळुच बोलला... “यात सॉरी बिरी कुठुन आलं आता..?” भावेश हसत बोलला... “तु काय माझा गुलाम आहेस..?”
“नाही, मी तुला सोडुन जाईन, असं तुला नको वाटायला..!” अजय सावरत म्हणाला.
“देवाकडुन बोलावनं आलं, तरी नाही जाशिल..?” भावेश मसकरी करित म्हणाला. अजय त्याच्या जवळ येउन खाली बसला आणि म्हणाला, “हे सगळं कसं आणि कधी झालं, कळलंच नाही.., ती खुप छान मुलगी आहे रे...” अजय अंजलीची बाजु घेत कुठेतरी स्वतःला विसरला..!
“ए, हलो... ओ रोमियो... कुठे भटकले तुम्ही..?” भावेश अजयच्या डोळ्यापुढुन हाथ हालवित बोलला... “मी जर तुझ्या जागी असतो, तर मलापण एकदा प्रेमात पडायला आवडलं असतं..!” भावेश सुद्धा शुन्यात कुठेतरी हरवला.
      एकाला प्रेम करता येत नाही, किंबहुना करण्याची परवानगी नाही, कारण तो अक्षम होता आणि दुसरा, जरी तो सक्षम होता पण प्रेमातपडुन सुद्धा तो प्रेम करु शकत नव्हता...! किती विरोधाभास आहे, नाही..? कारण प्रेम, हा एकट्याने होणारा क़ृत्य नाही आहे, त्याला संपुर्णता मिळते दुसरीकडुन दिल्याजाणार्या दुजोर्याची. एकेरी प्रेम, हा प्रेम नसुन मृगतृष्ना शिवाय काही नसतं. पण अजय आणि अंजलीचं प्रेम, हा दोन्हीबाजुनी सारखं होता. अजय हा एक बुध्दीमान, हुतकरु आणि आकर्षक तरुण होता, अंजली सुद्धा देखणी, प्रेमळ आणि हुशार मुलगी होती, आणि दोघंही सी.ए. होणार होते.., मग का बरं त्याचं मिलन होणार नाही..? ऑफिसमधे सुगबुग होतीच त्या दोघांनविषयी.., सगळे त्याची जोडी बघुन ‘मेड-फ़ॉर-इच-अदर’ म्हणायचे..! अजयच्या स्वपनाचा क्लायमॅक्स नेहमी भावेश जवळ येउन संपायचा, तो नेहमी अंजली आणि भावेशच्या मधे पिसुनजायचा. काय करावं काही कळत नव्हतं त्याला, अंजली सोबत लग्न केलं तर भावेश एकटा पडेल, अशी त्याची नेहमी कोंडी व्हायची. विचार करता करता त्याचे तारांबळ उडायचे..!
      तिकडे अंजली, अजय सोबत स्वतःच्या लग्नाचे स्वप्न रंगवित होती. तिला भावेश बद्दल किती संवेदना होत्या, देव जाणे. कदाचित नसेल, कदाचित गरज भासत नसेल. तिला माहित होतं, ते फ्क्त इतकच् कि अजयसोबत लग्नकरुन आपला नवीन ऑफिस सुरु करायचं आहे बस्स... तिच्या जीवनाच्या प्रायोरिटीज् मधे प्रथम क्रमांकावर हाच एकमेव उध्दिस्ट होता, बाकीचं नंतर बघुया... आदि आपल्या सख्याला जवळतर करु दे, नव्या जिवनाची सुरुवाततर होवु दे... तो दुसरी कुणीच्या होण्याआदि माझा होवु दे...! बस्स एकदा ‘एक’ होवु दे... माझा कान्हा मलाच भेटु दे... असं प्रत्येक गोपीला वाटत होतं... कारण तो होताच मोठ्या गुणाचा... सावळा, भोळा, एकनिष्ठ, हुशार आणि देखणा..!!! आणि यात वाईट काय, सांगाबरं..? स्वप्न रंगविने आणि त्याला पुर्णत्वाला आणने, हाचतर जीवन आहे. साम, दाम, दंड, भेद... माणुस आपले स्वप्न रंगवायला, या पैकी कुठलाही शस्त्र वापरु शकतो. त्याला शास्त्रानी सुद्धा पुर्ण परवाणगी दिली आहे, मग अंजलीने आपले स्वप्न का बरं पुर्ण नाही करावे..? अजय जर भावेशसोबत आर्थिक, भावनिक नात्यानी जुडलेला असेल, पण कधी न कधी त्याला स्वतंत्र व्हावच लागेल.., नाही का..?
       जवळ जवळ वर्षभरानी निकाल लागला, ते तिघंही सी.ए.ची परिक्षा उत्तिर्ण झाले. अजय अंजलीचं तर आनंद गगनात मावत नव्हतं. भावेश मात्रं काहीसं विचलित झाला होता. मी त्याला विचारलं, “आता पुढे काय करायचं विचार आहे तुझा..?” तो हसत म्हणाला, “बघुया... काय आहे पुढे, आपल्या नशिबात..” मला त्याच्या चेहर्यामागे अविरत दुःख दिसत होतं..! मी मनातल्या मनात त्याच्यासाठी प्रार्थनेशिवाय काहीच् करु शकत नव्होतो..! असं म्हणतात कि माणसानी, माणसाचे दुःख कमी करायला पाहीजे, त्याच्या कामात यायला पाहिजे. पण मी त्याच्या कुठल्याही कामात येऊ शकत नव्होतो. त्याच्या जीवनात् एकच् व्यक्ति कामात येऊ शकत होता, आणि तो म्हणजे, अजय..! पण अजयतर अंजलीचा होणार होता.
      सहा महिन्यानी अजय आणि अंजलीचं लग्न जुडुन आलं. नविन ऑफिसचं सेटअप आणि लग्न, अश्या दोन्ही कार्य एकाचवेळी, त्या सुद्धा तेवढेच इम्पॉर्टन्ट..! दोघांची तारांबळ उडालेली होती, लग्नाच्या पत्रिकेपासुन तर ऑफिसच्या कामापर्यंत, अहोरात्र कामच् काम. अजयनी भावेशला, काही दिवसासाठी गावाला जाण्याचे अनुरोध केले, आणि तो त्याला गावाला सोडुन आला. त्याला नविन घराची सोय सुद्धा करायची होती, अंजली घरात लागणार्या आवश्यक वस्तुंची खरिदारी करित होती. अजय, ऑफिस आणि लग्नाची तैयारित लागला होता. तो पत्रिका घेउन गावाला गेला आणि भावेश आणि शेटजींना लग्नाला आमंत्रित करुन, आपल्या आई-वडिलांना सोबत घेऊन परत आला.
      लग्नाचा दिवस उजळला, गुलाबाच्या सुगंधात् शहनाईचा सुर जणु सुगंध आणि सुरांचा मिलन वाटत होता. भावेश आपल्या आई वडिलांसोबत व्हिलचेअरवर आला होता. लग्न समारंभ आटोपल्यावर, अजय आणि अंजलीने, सगळ्यांना आपल्या नवीन ऑफिसला भेंट द्यायला विनंती केली. भावेशला मात्रं अपमानित झाल्या सारखं वाटत होतं. पण नाईलाजाने जावे लागले. सगळेजण अजय आणि अंजलीचे नवीन ऑफिस बघायला गेले. त्यांचे आई-वडिल आणि काही मित्र परिवार ऑफिसला पोहचले. छोटसं, नवीन चकचकित ऑफिस जणु त्यांचीच् वाट बघत होता. चेंबर मधे तिन खुर्च्या बघुन सगळे दचकले. “हा तिसरा कोण रे..?” भावेशनी आश्चर्याने विचारले. अजय आणि अंजलीने त्याची व्हिलचेअर मधल्या खुर्चीजवळ नेऊन त्याला अलगत उचलत, त्यावर बसविले आणि अंजली म्हणाली, “अजुन कुणाची असेल दादा..., फक्त तुमचीच्..!!” दोघं आशिर्वाद घेण्यासाठी त्याच्या समोर वाकले...! पण भावेश त्यांच्या समोर खाली, खुप खाली वाकलेला वाटत होता. त्यानी अश्रुपुर्ण नेत्रांनी आपले हाथ, अजय आणि अंजलीच्या डोक्यावर ठेवले...!!!
ही गोष्ट मी लिहीली नाही 
आवडली म्हणून share  केली⁠⁠⁠⁠

# "बेटी बचाव " म्हणताय ?

#  "बेटी बचाव " म्हणताय ? 
      का????
    उत्तर हवे- #    
                
 (लतिका चौधरी)

सर्वोच्च न्यायालयात एका एकतर्फी प्रेमातून त्रस्त एका आत्महत्या केलेल्या स्त्री संदर्भात न्याय देताना उद्विग्न न्यायाधीशाने काढलेले उद्गार--"या देशात महिला शांततेत का जगू शकत नाहीत?....."
 त्याचे वास्तव-(दै. सकाळ)
 महिला अत्याचाराच्या घटना घडतच आहेत.विशेष म्हणजे महिलांचा मानसिक,शारीरिक छळ करणारे स्वतः आईच्या पोटी जन्म घेऊन आलेले,बहीण,मुलगी,बायको अशी 'बाई'च्या मायेखाली वाढलेले,जगत असलेले असूनही त्यांच्यात परस्त्रीला छळण्याची,तिला येनकेन प्रकारे हतबल,लाचार करण्याची,अपयशी ठरविण्याची,दुय्यम ठरविण्याची,'तू बाई आहेस..'हे बाईपण पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची,तिचा विनयभंग करण्याची निच प्रवृत्ती,हरामीपण, हैवानी, पाशवी वृत्ती झिरपते तरी कुठून?जर तर मर्द आहेत तर स्वताच्या पुरुषीपणावर, मर्दांगीवर त्यांचाच विश्वास नाही का?खरे मर्द,खरे पुरुष
'बाईपणाला लाचार करत नाहीत,'बाई ' ला कमी लेखत नाहीत,हक्क,जबरदस्ती,जुलूम करत नाहीत.
भारतात अनेक महान आत्मे होऊन गेलेत,
शिवाजी महाराज,शाहू,आंबेडकर,फुले यांच्या सारखे 'स्त्री'ला माणूस मानणारे जगोद्धारक ह्या खलनायकांच्या नजरेसमोर येत नसतील का?
पर स्त्री जर अशा हरामी वृत्तीच्या लोकांजवळ शांतपणे,सुरक्षितपणे,सन्मानाने राहू शकत नसेल तर यांची आई,बहीण,बायको,स्त्री जातीतील कोणतीही नाती यांच्या सानिध्यात कधीच कधीच सुरक्षित नसेल.
शाहू,फुले,आंबेडकर यांचा आत्मा,त्यांचे कार्य यांच्या हिणकस जन्माने,जगण्या-वागण्याने रडत,कुढत आहेत ह्याची ह्या 'माणूस'जातीला कलंक असणाऱ्या ,कफल्लक वृत्तीच्या लज्जेने
 मरत असेल.
राज्यघटनेने स्त्री ला शिक्षणाचे,जगण्याचे,अभिव्यक्ती            स्वातंत्र्य दिले,निर्णयाचे अधिकार दिलेत.
अंधाऱयात्रा संपेल,लख्ख उजाडेल,पिढ्या न पिढ्या अन्याय सहन करणाऱ्या बाईला मोकळा श्वास घेता येईल असे स्वप्न महान जीवांनी पाहिले.यश ही आले.पण  ' येरे माझ्या मागल्या...'सुरूच आहे.पाहिले पाढे पंचावन्न सुरूच आहे.
सीता,द्रौपदीपासून फरपट आजही सुरू आहे.
नावं, घटना,कारणे,निमित्त फक्त बदल.
भले कायद्याचे सरंक्षण (कागदावरचे)असो,
उच्च पदवी असो,अंतराळात भरारी मार,सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बन,राष्ट्रपती,पंतप्रधान बन, तुझी फरफट ,सोसणे काही संपणार नाही.गौरव किती?(दिखाव्याचा) -मातृदेवता,न्यायदेवता,
ग्रामदेवता,कुलदेवता....
भाषणं... स्त्री जातीचा पुळका असलेला पोकळ देखावा,...ढोंगीपणाला तोड नाही.
देवतेच्या रुपात पुजणारा हा देश तीला फक्त
आणि फक्त 'बाई'म्हणून पुजतो.
चुल आणि मुल ची मर्यादा सोडून तिने तिच्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्र पादाक्रानत केलीत,पण तिथं ती एकटीच.
(अरे हां, 'एकटी स्त्री' तर 'विकृत सांडांना खुर उधळायला मोकळे रानच ! 'एकटी स्त्री' म्हणजे त्यांच्या बापजाद्याचा मुलूखच ! त्या राक्षसांना कल्पना नसावी का, की कधीतरी आपली रक्ताची-पोटची पोर,आपलीच बायको ,आई 'एकटी' होऊ शकते?....नसावी कदाचित .  'स्त्री' घरची किंवा बाहेरची...तिच्या 'बाईपणाची 'मजा घेणाऱ्या 'भंडव्यांना'याची जाणीव असेलच कोठून ?)
 येनकेनप्रकारे 'हाती'आली नाही तर तिची बदनामी,टिंगलटवाळी,डावलणे,अनुल्लेख,  वगळून काढणे,त्याची झाली नाही म्हणून दुसऱ्याशी नावे जोडणे,अपप्रचार करणे असे 'राक्षसी, हैवानी'धंद्याचे उपद्व्याप ते करत राहतात.                                                             हे सर्व तिला कळते ही,पण ती आपल्या मर्यादा,संस्कृती,संस्कार जपते.वयक्तिक,  प्रापंचिक,सामाजिक,आर्थिक असे अनेक अडचणी मुळे ती हतबल,लाचार होते.तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत राहते. 
स्वतः शिक्षा भोगते कारण कायदा तिला माहीत 
असतो.चोर,गुंड,मवाली वृत्तीच्या या लोकांनी
पोलीसांना 'कंठपुतळी'करून ठेवलेले असते.
नेते,पुढारी यांनाही अशा गावगुंडांची गरज असते म्हणून तेही 'यांना'पाठीशी घालतात.
 मग सामान्य,लाचार,हतबल ,'बाई'ला 'बाई '
बनवून चूप केले जाते.ती जळत राहते,तगमग
करत राहते,कुणालातरी जगवण्यासाठी जगत 
राहते .'बाई'पणाचं ओझं वाहत राहते.
टुक्कार मात्र हसत,खिदळत,विजयोत्सव मनवत राहतात ......
पण 'त्यांना'कल्पना नाही-
नियती नावाची गोष्ट विश्वात अजूनही वास करते.अपमान हा गुणाकाराने परत मिळतो.कधी ना कधी नियतीची लाठी,मार पडतच असतो.नालायकाचा एक दिवस कुठल्या ना कुठल्या रुपात नायनाट होतच असतो. कर्माचे फळ भोगायला मिळते म्हणजे मिळतेच.
म्हणून 'बेटी बचाव','लेक वाचवा-लेक शिकवा'
असे म्हणण्यापूर्वी आधी तिच्या जन्माचा सन्मान करा.तिला 'माणूस'म्हणून वागणूक द्या.⁠⁠⁠⁠

खूप काही शिकण्यासारखे

खूप काही शिकण्यासारखे ,विस्मरण झालेले...

१. दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे.  धेनु मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.

२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तरही तयार, म्हणायची, श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची  घेवडा  भाजी  गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते. 

३. अन्नाचे एक शीत तरी सैनिकासाठी पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग तुळशीत अर्पण करावे. देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो, त्या लेकरांचे आयुष्य वाढते. 

४.  वाळवण घालताना आज्जी सूर्य मंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची. 

५. रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, कोरफडीचे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, तर म्हणायची, स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये. 

६.  मुंग्यांना साखर ठेवायची, म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो, सुखात राहा,माझ्या लेकरांना डसू नका. 

७. तुळशीला दिवा लावायची, चिलटे,किडे नष्ट होऊन घरात येत नाही.ती माझ्या घशाला अाराम देते मी  तुळशीच्या पानांना उब देते.

८. लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण कंदील आणि चिमणी च्या उजेडात असावे आग्रह असे. 
भाकरी पण चंद्रासारखी वाटते , 
सावल्यांची भीती जाते, खेळ करताना मौज असते, अंधाराची सवय असावी, भुमातेला पण शांतता मिळते म्हणायची. 

९. दारातल्या रांगोळीने सरपटणारे प्राणी लांब राहतात. त्यांच्या कातडीला रांगोळी चिकटते म्हणायची. 

१०. झोपताना तांब्याच्या धातुतील तांब्या पाणी भरून डोक्याशी ठेवायची, चांगले असतेच पण तापलेल्या 'भु'चा तप्त असा भार किंवा स्पंदने  तांबे घेते आणि आपल्याला शांती देते. 

अजब अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास, अनुभव आणि ज्ञान कधी लक्षातच घेतले नाही..⁠⁠⁠⁠

गोष्ट मोलाची

एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे.

तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे.

तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते....

हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ  वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.....

आता तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "सर, किती किंमत आहे या बाहुलीची?"

दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने  विचारतो " बोल तू काय देशील ?"

मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?"
दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत.  ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो.
मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो. 

हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता व त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?"

दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला, 
"आपल्यासाठी हि केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हि शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.
हि गोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यासाठी मदतीची ठरेल आणि तो सुद्धा चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल."😊☺⁠⁠⁠⁠

नांदत्या घराची किंमत ....

नांदत्या घराची किंमत ....

....दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून  मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात. 

त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं ..कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते.

7.30 ला मोबाईल वरून फोन आला . जरा थकलेला ..पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता . " मी आलेय फोटो घेऊन . डेक्कन च्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का ?" 

अरे बाप रे ..एवढ्या वयस्क आजी . मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला . झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या . फिकटस नऊवारी पातळ , सुपारीएवढा अंबाडा , हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात . 

ब्रेकफास्ट ची वेळ होती . नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता . मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती .मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती . लेक पसार झाली काहीतरी काम काढून . 

शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली . माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या , " मी करते ग पोहे , तू निश्चिनतीने फोटोचे काम हातावेगळे कर ." मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले . माझे काम होस्तोवर पोहे तय्यार .
भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते . हक्कानी पापड मागून घेतले . मी भाजते म्हंटलं तर म्हणाल्या " थांब मी तळते कि ".

एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला .आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश . जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला . आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.

निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले , " आजी खूप त्रास घेतलात हो ."
आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही . 

त्या म्हणाल्या "नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले,अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला...खूप छान वाटलं ग "

या एका वाक्यात मीच रडवेली झाले . " पुन्हा याल ना ? " त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या " परमेश्वराची इच्छा "

खरा सांगू ..सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे .....आजींच्या " नांदत्या " या एका शब्दाने मला ती किंमत कळली .

-- अनामिक⁠⁠⁠⁠

Sunday, 23 April 2017

पॉज़िटिव विचार आणि निगेटिव विचार यांचा फरक

पॉज़िटिव विचार आणि निगेटिव विचार यांचा फरक --------------------


एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते. 

अचानक काही आठवलं म्हणुन त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली ....

     * * या वर्षात माझ्या शरीरातलं  पित्ताशय काढुन टाकलं 

आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळुन रहावं लागलं . 

     ** याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पुर्ण केली 

आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची 30 वर्ष नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली 

** याच वर्षात माझ्या वडिलांच्या दु:खद निधनाचं  दु:ख मला पचवावं लागलं  


** याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकिय शिक्षणाच्या परिक्षेला मुकला.... 

त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे ! 
जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले
 शिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजुन वेगळेच ..!

                  आणि शेवटी त्यांनी  लिहिले ..…. 

"खरच, किती वाईट आणि दु:खदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी !!!

    इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली. 

भरलेले डोळे आणि विचारात गढुन गेलेल्या आपल्या पतिकडे पहाताच त्याना काहितरी वेगळ असल्याचा अंदाज आला.
 सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला
 आणि काही न बोलता त्या खोलीतुन निघुन गेल्या. 

                  थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता. 

तो कागद त्यानी त्यांच्या पतिच्या कागदा शेजारी ठेवला. 
लेखक महाशयानी तो कागद उचलुन वाचायला सुरुवात केली. 
त्यात लिहिले होते ..

         ** गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशय अखेर या वर्षात मी काढुन टाकले. 

आता मला कुठलाही त्रास नाही. 
मी अत्यंत सुखी झालोय यामुळे ..!

       ** याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पाडली.

 आणि एक चांगल्या नोकरीतुन सन्मानाने सेवानिवृत्त झालो, 
आता अजुन चांगलं आणि लक्षपुर्वक लिहायला माझ्याकडे भरपुर वेळ आहे...!!

      ** याच वर्षात माझे तिर्थरुप वडिल वयाच्या 95 व्या वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबुन न रहाता इहलोकीची यात्रा संपवुन शांतपणे मार्गस्थ झाले ..!!


     ** याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं, 

जीवघेण्या कारच्या अपघातातुन जरी कार पुर्णपणे मोडित निघाली तरी तो बचावला 
आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला जोमाने लागला ....!!!

  आभारी आहे देवा ...!!

 किती सुंदर आणि चांगल वर्ष दिलस तु मला ..!!"

         बघा मित्रानो ... तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी ..!! 

नकारात्मक विचार बाजुला सारुन एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी !! 

  आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात.

 आपण ज्या दृष्टीने त्याकडे पहातो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो. 
प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.
 आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायच…..!!!

     त्या घटनेची वाईट बाजु न पहाता चांगली बाजु, सकारात्मक बाजु डोळ्यासमोर ठेवायला शिका. 

जे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगुन पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपुर्वक विचार करा ...!! 
जगणं अजुन सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!

   Every Dark cloud has a silver lining …!!!

 प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हे ही लक्षात ठेवा ..!! 

     शेवटी चिडचिड करुन जगायच की आनंद घेत हे आपल्या विचारांवरच ठरणार आहे. 


आपल्याकड काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेवुन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा ..!!


 दु:खात सुख शोधा, सुखात दु:ख नको !!


  शेवटी पाडगावकरांच्या  ओळी आठवतात….!!


पेला अर्धा सरला आहे

असं सुद्धा म्हणता येत;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येत!

सरला आहे म्हणायचं

कि भरला आहे म्हणायचं?

सांगा कसं जगायचं?

कण्हत कण्हत 
कि गाणं म्हणत

तुम्हीच ठरवा....!!



मित्रानो सकारात्मक व्हा ....आनंद लुटा ..!!

घर निंदकाचं

कडू डोस 15

घर निंदकाचं

म्हण आहे,'निंदकाचे घर असावे शेजारी'
अगदी बरोबर आहे.निंदक म्हणजे निंदा करणारा.सोप्या भाषेत टीका करणारा.
निंदकाला काय काम असते? चांगले चालले असेल तरी काहीतरी निंदा करून लोकांच्या मनात भूत घालून द्यायचे. लोकांचेही काही खरे नसते,ग्लोबल नीती प्रमाणे एक गोष्ट सारखी सारखी सांगितली की ती लोकांना खरी वाटायला लागते.दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा जवळचा अधिकारी ग्लोबल याने ही ट्रिक वापरली. आपण सतत आघाडीवर आहोत असे ग्लोबल आकाशवाणी वरून लोकांना सांगत होता.लोक खोट्या विजयाला भुलून  हिटलरचा उदो उदो करत होते.हिटलर इतका काळ युद्धात टिकून राहिला त्याचे श्रेय ग्लोबललाच दिले जाते.

निंदक  तेच तर करत असतो.एकच गोष्ट फिरवून फिरवून लोकांना सांगत असतो आणि लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असतो.
गोष्ट असते लहानशी. पण  तो आपल्या पद्धतीने तिला मालमसाला लावून सांगत असतो.त्यामुळे लोकांचे मनोरंजन होते आणि समोरच्या व्यक्ती बद्दल मत वाईट होते. खरे म्हणजे एखादी व्यक्ती जर एखाद्या व्यक्ती बद्दल काही माहिती सांगत असेल तर लगेच तिच्यावर विश्वास ठेवण्या अगोदर त्याची खातरजमा करायला काय हरकत आहे?पण लोकही फार उतावीळ असतात.घटनेची खातरजमा ना करता ती गोष्ट पसरवायला सुरुवात करतात.आणि निंदकाचे फावते.
ज्याची निंदा केली जाते त्यांच्यापर्यंत बातमी खूप उशीरा पोचते.किंवा जरी पोचली असेल तरी तो सौजन्य दाखवून त्यास काहीच माहित नाही असे दाखवतो आणि  भांडणाचा प्रसंग टाळतो.
एक इंग्रजी सुभाषित आहे,'देवाने नेत्याला संपवण्यासाठी अनुयायी निर्माण केले.
अनुयायी नेत्यांची तळी उचलत असतो.नेत्याने काहीही केले तरी 'खूप छान साहेब.' असेच म्हणत असतो तो. त्यामुळे नेता आणखी फुगतो आणि त्याच्या कडून परत परत त्याच चुका होत जातात.आणि त्याची अधोगती होत जाते.
पण तोच कार्यकर्ता असेल तर त्याच्या नेत्याने काही चुकीचे केले असेल तर लगेच सांगतो,'साहेब तुम्ही इथे असे बोलायला नको होते.ते तुमच्या फायद्याचे नाही.तुम्हाला त्रास होऊ शकतो.लोक तुटू शकतात. विरोधकांना फायदा होऊ शकतो.
पण दुर्दैवाने खरे कार्यकर्ते कमी असतात.आणि बोगस अनुयायी जास्त  असतात.ते नेत्याला बुडवत असतात. आज महाराष्ट्रात असे अनेक प्रकार नेत्यांबाबत बघायला मिळतील. नेते त्याच त्याच चुका करताना दिसतील.

'निंदकाचे घर असावे शेजारी'असे म्हटले जाते त्याचे कारण असे की,निंदक तुमच्या प्रतेक गोष्टीवर लक्ष ठेऊन असतो.तुम्ही काय करता?कुणाशी बोलता?काय खाता?तुमचे काय कार्यक्रम ठरलेले आहेत?हे जितके तुमच्या जवळच्या किंवा घरातल्या लोकांना माहित नसते तितके निंदकाला माहित असते.कारण त्याला काही काम धंदा नसतो.त्याचा एकच उद्योग असतो.तुम्हाला अडचणीत पकडायचे आणि त्याचा डांगोरा पिटायचा.तुमच्या बद्दल वाईट सांगून जनमत खराब करायचे.आणि वातावरण बिघडवायचे.एक पाहिले का?निंदकाला तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी कधीच दिसत नाहीत. एकदा एका शिक्षकाने एक मोठा पांढरा कपडा विध्यार्थ्यांपुढे ठेवला त्यावर एक छोटासा काळा डाग होता. विदयार्थ्यांना  त्याचे वर्णन करायला सांगितले.प्रत्येकाने कापडा किती मोठा आहे.किती शुभ्र आहे.कुठे खराब झाला आहे.तो कसा असायला हवा होता हे सगळे सांगितले आणि सगळ्यांनी एक काळ्या डागाचे त्यांच्या भाषेत वर्णन केले.काळ्या डागाचे सर्वानीच वर्णन केले.
शिक्षकाने सांगितले,'सर्वानी काळ्या डागाचे वर्णन केले.पण सगळ्याना इतका मोठा पांढरा कपडा दिसला नाही.त्यातील एक छोटा डाग लगेच दिसला.आणि विशेष म्हणजे सगळ्यांचे लक्ष फिरून फिरून त्या काळ्या डागाकडेच जात होते.तसेच असते.निंदकाचे केलेली निंदाच आपल्याला दिसत असते.ज्याची निंदा केली त्याचे काम दिसत नाही. त्याने इथपर्यंत येण्यासाठी खाल्लेल्या खस्ता दिसत नाहीत. त्याचा इतका मोठा त्याग दिसत नाही.त्यांना दिसते फक्त निंदकाने केलेली निंदा.
सच्ची माणसे कधीच निंदेला घाबरत नाहीत उलट निंदकाला जवळ घेऊन शाबासकी देतात कारण त्याच्या मुळेच त्याच्या कडून घडणाऱ्या खूप चुका वाचलेल्या असतात. निंदकाने अगोदरच त्याला सावध करून टाकलेले असते.
तसे पाहिले तर ,दुसऱ्याच्या अंगावर शेण फेकून त्याचा आनंद घेणाऱ्या निंदकाचेही हात भरतातच ना?
निंदक चांगल्या गोष्टी पण वाईट ठरवण्यात खूप माहीर असतात.कारण त्यांचा धंदाच तो असतो.त्यामुळे हुशार माणसे त्याकडे लक्ष देत नाहीत. आणि आपली गाडी रुळावरुन घसरू देत नाहीत.

निंदक पराचा कावळा करण्यात पटाईत असतात.ते पराचा कावळा करतात पण लोक खरोखरचा कावळा समजतात.
आम्ही बारावीला असताना इंग्लिश मध्ये एक कविता होती तिचा सार असा, एक टीकाकार म्हणजे निंदक ,सलून मध्ये जातो.सलून मध्ये काही लोक बसलेले असतात.त्यालाही दाढी करायची असते तो तिथे बसतो आणि अचानक त्याचे लक्ष समोर असलेल्या घुबडावर जाते.घुबड न्हाव्याच्या डोक्यावर एका फळीवर असते.टीकाकार आपली हुशारी दाखवण्यासाठी मोठयाने बोलायला लागतो,' हे जे घुबड आहे ना? ज्याने कोणी त्याची मूर्ती बनवली आहे ती खुप सुंदर आहे. पण त्यात काही चुका आहेत.सगळे लोक त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतात. त्याला आणखी हुरूप येतो.तो म्हणतो,घुबडाची चोच खूपच अनुकूचीदार झाली आहे, ती इतकी अनुकूचीदार नसते.'तो आपली हुशारी दाखवण्यासाठी आणखी सांगतो,'खरे म्हणजे घुबडाचे पंख इतके मोठे नसतात.ते थोडे आखूड झाले असतात.तसे घुबड झाले आहे छान. त्या कलाकाराला दाद दिली पाहिजे.पण घुबड इतके जाड नसते.त्याची जाडी थोडी कमी पाहिजे होते.त्याचे पाय खूपच लहान झाले आहेत थोडे।मोठे पाहिजे होते.आणि नखे खूपच बोथट झाली आहेत ती टोकदार पाहिजे होती.बाकी घुबड झाले आहे छान.पण त्याची मान खूपच लांब झाली आहेघुबडाची मान इतकी लांब नसते.पण झाले आहे छान.आणि डोळे किती मोठे काढले आहेत ,त्याची बुबुळे इतकी मोठी थोडीच असतात."असे म्हणत असतानाच घुबडाने थोडीशी मान हलवली.बुबुळे कोठी केली.आणि तोंडातून एक आवाज काढला.
टिकाकाराचे तोंड बघण्यासारखे झाले.आणि सलून मधील सगळे हसू लागले.
अशा पद्धतीची फजिती निंदकाची होते.एखाद्याला एखादी गोष्ट सांगायला जातो आणि ज्याला सांगायला जातो तोच प्रत्यक्ष साक्षीदार असतो.त्यामुळे निंदकाचे तोंड बघण्यासारखे होते.
निंदक शेजारी असल्याने आपला दिवस खूप चांगला जातो.आपल्या चुका आपण टाळण्याचा प्रयत्न करतो.कारण निंदकाच्या हाती आपली एखादी गोष्ट लागू नाही म्हणून आपण काळजी घेत असतो..

 कडू डोस:


निंदकाला लगेच प्रती उत्तर देऊन नका.त्याने केलेली निंदा सहन करायला शिका.आणि जमलेच तर आपल्यातले त्याने दाखवून दिलेले अवगुण काढायला शिका.तो सतत आपल्यावर टीका करतो म्हणून त्याचे आभार माना. आणि त्याला आणखी टीका करण्याची संधी द्या.""म्हणजे एक काळ असा येईल की तुमच्यातील सर्व अवगुण नष्ट होऊन त्याला निंदा करण्यासाठी काहीच राहणार नाही. आणि तो जुनेच चघळत बसेल.मग हसण्याची पाळी तुमची असेल.


शांताराम निकम
22 एप्रिल 2017⁠⁠⁠⁠

मुलांवर संस्कार कसे करावेत ?

मुलांवर संस्कार कसे करावेत ?
याचं एक सुंदर उदाहरण पहा.
एक मध्यमवयीन गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक ७-८ वर्षांचा मुलगा भर दुपारी चालले होते. 
वाटेत त्यांना एक मोठं शेत लागलं. शेतात एक शेतकरी जमीन नांगरत होता. जवळच एका झाडाखाली त्याचं जुजबी समान होतं आणि झाडाच्या फांदीवर त्याने आपला सदरा अडकवला होता. सदरा पाहताच या छोट्या मुलाच्या मनात काहीतरी सुरु झालं आणि त्याचे डोळे चमकू लागले.
तो म्हणाला, "बाबा, त्या सदऱ्याच्या खिशामध्ये मी आता २-२ दगड ठेवतो, जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल आणि खिशात हात घालून दगड पाहील तेव्हा खूप मजा येईल."
बाबा म्हणाले, "हो, पण मी एक बदल सुचवतो बघ ....त्या दगडांच्या ऐवजी आपण २-२ चांदीचे रुपये ठेऊ या."
मुलगा म्हणाला, छे, दगडानं जास्त गम्मत येईल, रुपयांपेक्षा."
पण बाबा म्हणाले, "पहा तर, तुला जास्त मजा येईल."
मुलगा थोड्या नाराजीनेच तयार झाला आणि त्यानं टाचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सदऱ्याच्या दोन्ही खिशात २-२ चांदीचे रुपये ठेवले. त्याला वाटत होतं....मजा तर येणारच नाही उलट रुपये मात्र जाणार.
ते दोघेही एका झाडामागे लपून शेतकऱ्याकडे पाहू लागले. सूर्य डोक्यावर आला. शेतकऱ्यानं नांगरणी थांबवून बैल सोडले आणि एका झाडाखाली त्यांना बांधलं, चारा टाकला आणि स्वतःशीच पुटपुटत बांधावर बसला. आता त्याचं बोलणे या दोघानाही ऐकू येऊ लागलं.
'कालच्यान् अन्नाचा कण कोनाच्या पोटात गेला नाई. घरात शिजवायला कायबी नाई. कारभारीनबी उपाशीच. लेकराला दूध नाई. कसं व्हणार? काय बी समजना.' 
मग हताश होऊन तो उठला मडक्यातील पाणी प्यायला आणि फांदीवरचा सदरा काढून अंगात घातला. सवयीने खिशात हात गेला हाताला काही लागलं म्हणून पाहतो तो काय चांदीचे २ रुपये!...दुसऱ्या खिशात हात घातला तर त्यामध्येही २ रुपये!!. 
त्याच्या चेहऱ्यावर मघापासून जी उदासीनता होती ती नाहीशी झाली त्याचा चेहरा उजळला आणि पुन्हा बोलू लागला. 'आता या पैशानं मी धान आणील आणि कारभारनीकडं देईन. मग ती रांधून पोटभर जेवंल आणि लेकरालाबी दूध पाजंल. लेकरू मग खूप खूश होईल. त्या दोघांना असं आनंदात बघून माझंबी पोट भरंल.'
मग तो नांगरलेल्या शेतात गेला. वरती आकाशाकडे पहात बोलू लागला, 'देवा, कोनाच्या रूपानं तू माज्यासाठी येवडा तरास घेतलास? ज्येनं ह्ये काम केलं त्येला खूप आयुक्ष दे, त्यो जगाचा धर्मावतार होऊ दे, देवा, ही सारी तुजी दया...म्या आज भरून पावलो.'
हे सारं बोलणं ऐकून तो लहान मुलगा रडू लागला. आपल्याला काय होतं आहे हे त्यालाच कळत नव्हतं. तो बाबांना म्हणाला, "बाबा,मला काय होतंय, हे मला काहीच कळत नाही. असं वाटतंय की, माझ्या शरीराला लक्ष लक्ष डोळे फुटले आहेत आणि त्या साऱ्या डोळ्यांनी मी रडतो आहे....
पण तरीही माझ्या अंगातून सुखाच्या, समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी उठत आहेत."
बाबा म्हणाले."बाळ, माणुसकीचा एक धडा तू आज शिकलास. त्या गरिबाचे शब्द तू ऐकलेस ना? त्याचा आशीर्वाद देवाघरून आला आहे, तो खरा होणार."
अशी शिकवण हवी, असा गुरु हवा किंवा असा संस्कार हवा की, तो कायमचा मनांवर बिंबला जाईल.
☞☞आवडली तर नक्की शेयर करा ☜☜

🙏🏻🙏🏻 ।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🏻🙏🏻⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠"अपेक्षा "

⁠⁠⁠"अपेक्षा "

आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, "बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे?  तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझ आजारपण, पडण, रडण, दुखण, भरवणं, शिकवण काय काय नाही केल. स्वत:च जगणंच विसरले मी."


मुलगा म्हणाला, "आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."


आई स्मितहास्य करित म्हणाली, " अरे वेडया हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन् हो, तू जेव्हा खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा  ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."


मुलगा म्हणाला,"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर"


आई आता हसली म्हणाली, "सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच ईच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न कराव ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ दयावी, समजून घ्याव व सुखाने एकत्र नांदाव."


मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला, "आता तूच सांग ना आई मला, "मी काय कराव तुझ्यासाठी?"

आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली, "ऐक, जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने  मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हिच अपेक्षा आहे माझी.
 जेव्हा देवासमोर उभा राहशील तेव्हा माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर.
 मी जेव्हा मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर. तु केलेले प्रत्येक चांगले काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, आसपास असलेल्या लहानथोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव.
लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट हे मी स्वेच्छेने स्विकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा  दोघांचा निर्णय होता.

 देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची त्याबद्दल त्याची मी सदैव रृणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.


 तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल.

करशील का हे?"

निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते.


धन्य धन्य ती माता!!

निरपेक्ष व निस्सिम प्रेम फक्त माताच करु जाणे, त्रिवार वंदन प्रत्येक  मातेला !!

अबोला

अबोला

काही मंडळी अबोल्याचा आपल्या विरोधकांविरोधात शस्त्रासारखा उपयोग करतात. ज्या व्यक्‍तीशी आपले मतभेद आहेत किंवा काही कारणाने वादविवाद झाला आहे, अशा व्यक्‍तीशी बोलणे बंद करणे, अबोला धरणे ही बाब समाजात सर्रास आढळते. या अबोल्यांना वयाचे, पदाचे, परिस्थितीचे, प्रांताचे, देशाचे कशाचेही बंधन नसते. विशेषत: नवराबायकोच्या नात्यात या अबोल्याला विशेष स्थान आहे.

लहानपणीे खेळता-खेळता मित्रमैत्रिणींशी भांडण झाले की, कट्टी त कट्टी, बालं बट्टी लिंबाचा पाला तोडू नको, बारा महिने बोलू नको, असे अगदी रितसर सांगून अबोला धरला जायचा, 12 महिन्यांची कालमर्यादाही घालून दिली जायची, एकप्रकारे 12 महिन्यांनंतर बोलण्याचे आश्‍वासन दिले जायचे. अर्थात हा अबोला अनेकदा 12 मिनटातच संपायचा, हा भाग वेगळा. (आताच्या लहान मुलांची अबोला धरण्याची काय पद्धत आहे, माहिती नाही.) मोठ्यांचा अबोला मात्र अनेकदा कुठलीही कल्पना न देता सुरू होतो. बरेचदा तर निर्णय एकतर्फी घेतलेला असतो. समोरच्याने आपल्याशी अबोला धरला आहे, त्या माध्यमातून तो आपल्याला शिक्षा देतो आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला अनेकदा माहिती नसते. कधी कधी तर ही अबोल्याची शिक्षा आपल्याला कशासाठी देण्यात आली आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला कळतच नाही. हे प्रगल्भतेचे लक्षण नक्‍कीच नाही. अबोल्याने कुठलेही प्रश्‍न सुटू शकत नाहीत. उलट गैरसमज वाढतात आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्यातले किती सुंदर सोनेरी क्षण या अबोल्यात आपण कायमचे हरवून बसतो. त्यापेक्षा एखाद्या व्यक्‍तीविषयी आपल्याला काही तक्रार असेल, किंवा त्याच्याशी काही विषयात मतभेद असतील, तर ते चर्चेतून सुटू शकतात. दोघांनीही एकमेकांविषयीच्या तक्रारी शांतपणे, समजूतदारपणे एकमेकांना सांगाव्यात गरज असल्यास दोघेही ज्या व्यक्‍तीला मानत असतील, अशा मध्यस्थाला सोबत ठेवावे. त्यातून काही मध्यम मार्ग निघू शकतो का, ते पाहावे. मतभेद अगदीच टोकाचे असतील आणि मार्ग निघण्याची शक्‍यता संपलेली असेल, तर तेवढा मतभेदाचा विषय बाजूला ठेऊन बाकी संबंध कायम ठेवले जाऊ शकतात. अर्थात यासाठी दोन्ही बाजूच्या व्यक्‍ती तेवढ्या प्रगल्भ असणे आवश्‍यक आहे. कारण बोलणे म्हणजे एकमेकांना त्यानिमित्ताने टोचणे किंवा कलगीतुरा नव्हे, तर संभाषण होय. अशा प्रकारे मतभेद विसरून संबंध कायम ठेवणारी माणसे हे समृद्ध मानसिकतेचे लक्षण आहे. अशा पद्धतीने वागणारी माणसेच मोठी होतात. त्यांच्या लोकसंग्रहात दिवसेंदिवस वाढच होते. 
एरवी अशा बालिश अबोल्याने अनेक वर्षांचे चांगले संबंध संपुष्टात येतात. पुढे कधीतरी कळते. ज्या कारणासाठी आपण अबोला धरला होता, तो कोणीतरी तिसऱ्याने निर्माण केलेला गैरसमज होता. किंवा आपलाच अहंकार होता की मीच का बोलावे, मीच का पुढाकार घ्यावा, पण हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. चांगले नाते कोमजलेले असते.

जिथे बोलून किंवा मन मोकळे करूनही दुसरी व्यक्‍ती समजण्यापलिकडची असेल, किंवा आपल्या समजुतदारपणाला आपली कमजोरी समजली जात असेल, अशावेळी अबोल्याला पर्याय नसतो, अर्थात तरीही तुझ्या अशा वागण्यामुळे मी आता तुझ्याशी बोलणे बंद करणार आहे, हे त्या व्यक्‍तीला निश्‍चित सांगावे. 

आयुष्य किती आहे, कोणाला माहिती आहे, मित्रांनो. कधीतरी छोट्याशा अहंकारामुळे किंवा गैरसमजामुळे आपण कोणाला तरी अबोल्याची शिक्षा देतो आणि कदाचित मग हळहळण्यापलिकडे आपल्या हातात काहीही उरत नाही. 

अलिकडे हा अबोला मोबाईल, फोन, सोशल साईट्‌सलाही घेरून बसला आहे. अनेकदा एखाद्या व्यक्‍तीचा फोनच उचलला जात नाही. त्याच्या संदेशांना उत्तरही दिले जात नाही. कधी महत्त्वाचा निरोप असतो किंवा त्या व्यक्तीला तुमच्या मानसिक आधाराची नितांत गरज असते. अशावेळी त्या व्यक्‍तीची केलेली अडवणूक हा निव्वळ क्रुरपणा आहे. 
नवे वर्ष येऊ घातले आहे, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग, अशा काही व्यक्‍ती असतातच. आपण स्वत:हून एक पाऊल पुढे टाकून बघुया का? आयुष्यातला कडू रस कमी होतोय का ते?

अशा अबोला धरलेल्या पण हवाश्‍या वाटणाऱ्या व्यक्‍तीला मनापासून हळुवार हाक देऊन तर बघा, मनावरचे मणामणांचे ओझे क्षणात उतरेल आणि मनातल्या सुकलेल्या झाडाला कोवळी लुसलुशीत पालवी फुटेल.⁠⁠⁠⁠

inspiring words

Worlds 8  superb  sentences

--------------<>-------------

Shakespeare :👌

Never  play  with the feelings

of  others  because  you may

win the  game but the  risk is

that  you  will surely  lose

the person  for a  life time.

--------------------------------

Napoleon.👌

The world  suffers  a  lot. Not

because  of  the  violence  of

bad people, But because   of

the silence of good people!

--------------------------------

Einstein :👌

I  am  thankful  to  all those

who  said  NO  to  me   It's

because  of  them  I  did  it

myself.

--------------------------------

Abraham Lincoln :👌

If friendship is your weakest

point  then  you  are  the

strongest  person  in the

world.

--------------------------------

Shakespeare :👌

Laughing  faces  do  not

mean that  there is  absence

of sorrow!  But it means that

they  have the ability to deal

with it.

----------------------

William  Arthur : 👌

Opportunities   are  like

sunrises, if  you  wait too

long  you  can miss them.

------------------------------

Hitler : 👌

When  you  are  in  the light,

Everything follows  you, But

when  you  enter  into   the

dark, Even your own shadow

doesn't  follow  you.

--------------------------------

Shakespeare : 👌

Coin  always  makes  sound

but  the  currency  notes are

always  silent.  So  when

 your value  increases

keep quiet.⁠⁠⁠⁠

Saturday, 22 April 2017

‘अडगळीत गेलेले शब्द

‘अडगळीत गेलेले शब्द

‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की ‘अडगळ’ हा शब्दच अडगळीत गेला आहे.पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची.सगळ्या नको असलेल्या,परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते.

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.


माळा (आताच्या मराठीत अॅटिक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची.


तसंच आता व्हेंटिलेटर फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोकावजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहीत असेल. 


‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा. घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.


पागोळं म्हणजे काय?  वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी 'पन्हळी' तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून खाली येतात - ती पागोळी.


‘फडताळ’ ..... फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द. जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.


गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली. 


लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला ‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.


स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल,वैल,निखारे हे शब्दही गेले. स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले. ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला. पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले. देवघराबरोबर सहाण, गंधाची थाटी, गायब. 


‘काथवट’हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली. 


कपड्यांचा विचार करताना तठव,जाजम,बसकर, सुताडे सगळे हरवून गेलेले.सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,  पण उत्तरवस्त्र ‘पाभरी’ हरवून गेली. सोवळ्यात नेसण्याची‘ धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.

सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले. 

कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या, ढोल्या - ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे - त्या गडप झाल्या.

सूप खुंटीवरून बाउल मधे आलं.

एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई. 


‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले. काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात.भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे,फक्त गेल्या अर्धशतकाच्या पूर्वी विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच,इतकेच


काळाबरोबर प्रत्येकाला बदलावंच लागतं

जे नाही बदलंत ते मोडून पडतं
          ।। कालाय तस्मै नम:।।⁠⁠⁠⁠

खरा आनंद

खरा आनंद
एकदा श्री कृष्ण आणि अर्जुन फिरायला बाहेर पडले. वाटेत त्यांना एक माणूस भीक मागताना दिसला. अर्जुनाला त्याची दया आली आणि त्यांनी त्याला सुवर्णमुद्रांनी भरलेले एक पोते दिले.
या अचानक धनलाभाने तो माणूस अतिशय प्रसन्न झाला. मनात आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला. पण त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. वाटेत चोरांनी त्याला अडवले आणि सुवर्णमुद्रांनी भरलेले ते पोते चोरून घेऊन गेले.
तो माणूस दुःखी मनाने आपल्या चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.
अर्जुनाला जेव्हा तो भीक मागताना दिसला तेव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.
सर्व हकिकत ऐकल्यानंतर अर्जुनाला त्याची दया आली. आणि त्याला एक मौल्यवान माणिक दिले. ते घेवून तो घरी पोहोचला. त्याच्या घरात एक जुने मडके होते. त्याचा वापर गेल्या कित्येक दिवसात झाला नव्हता. चोरीच्या भीतीने त्याने ते माणिक त्या मडक्यात लपवून ठेवले.
अजूनही त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. दमल्यामुळे त्याला गाढ झोप लागली. त्याच वेळी त्याची पत्नी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. वाटेत धक्का लागून तिचे मडके पडून फुटले.
तिने विचार करुन घरी असलेले जुने मडके घेऊन पाणी भरायला नदीवर गेली. मडके स्वच्छ धुऊन चांगले पाणी भरून घरी आली. माणिक पाण्यात पडले.
माणसाला जेव्हा हे कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला.
चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.
अर्जुन आणि श्री कृष्णाला जेव्हा तो भीक मागतांना दिसला तेंव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.
सर्व हकिकत ऐकल्यानंतर त्यांना वाटले की यांच्या नशिबात सुख नाही आहे. आपण काही तरी करुया की जेणे करुन हा यातून बाहेर पडेल.
आता यापुढे देवाची कृपा सुरु झाली. श्रीकृष्णाने त्या माणसाला दानात फक्त दोन रुपये दिले.
अर्जुन म्हणाला "प्रभू मी दिलेल्या सुवर्णमुद्रा आणि माणिक या माणसाचे दारिद्रय घालवू शकले नाही तर या दोन रुपयांनी काय होणार?"
हे ऐकून श्रीकृष्ण फक्त हसले आणि अर्जुनाला त्या माणसाच्या मागावर जायला सांगितले.
तो माणूस चालता चालता विचार करू लागला की दोन रुपयात धड एका माणसाचे जेवण पण होत नाही आणि देवाने असे कसे केले? ही देवाची कसली कृपा?
चालत असतांना त्याची नजर एका मासेमा-यावर गेली. त्याच्या जाळ्यात एक
छोटा मासा तडफडत होता. माणसाने विचार केला की दोन रूपयात आपले पोट भरणार नाही पण या माश्याचा जीव वाचू शकतो.
सौदा करुन त्याने दोन रूपयांना तो मासा विकत घेतला. त्याला आपल्या कमंडलूत घेतले. त्यात पाणी भरले आणि त्याला नदीत सोडायला निघाला.
प्रभूची लीला पाहा.... माश्याच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडले. निर्धन माणसाने ते पाहिले तर काय आश्चर्य, माश्याने गिळलेला तोच माणिक होता तो की जो त्याने मडक्यात ठेवला होता.
तो माणूस अत्यानंदाने ओरडू लागला "सापडला, सापडला"
नेमका त्याबाजूने तो चोर चालला होता ज्याने याच्या सुवर्णमुद्रा लुटल्या होत्या.
त्याने माणसाला "सापडला सापडला" असे ओरडताना पाहिले. चोर घाबरला. चोराने विचार केला की याने मला ओळखले आहे आणि आता हा राजाकडे माझी तक्रार करील. घाबरुन त्याने चोरलेल्या सर्व सुवर्ण मुद्रा त्याला परत आणून दिल्या आणि क्षमा मागू लागला.
हे पाहाताच अर्जुनाने श्रीकृष्णाला नमस्कार केला. अर्जुन म्हणाला "जे काम पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक करू शकले नाही ते आपल्या दोन रुपयांनी करुन दाखवले"
श्रीकृष्ण म्हणाले “अर्जुना हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. जेंव्हा तू पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक त्याला दिलेस तेंव्हा त्याने फक्त स्वतःचा विचार केला पण दोन रुपये दिल्यानंतर त्याने दुस-याचा विचार केला. म्हणून जेंव्हा आपण दुस-याच्या दुःखाचा विचार करतो, दुस-याचे भले करतो तेंव्हा आपण देवाचे काम करतो. आणि तेंव्हा देव आपल्या सोबत असतो".⁠⁠⁠⁠

कडू डोस:

कडू डोस 14

कुणावाचून कुणाचे अडत नाही


'जो चोच देतो ,तो दाणे पण देतो.' अशी एक म्हण आहे.ही म्हण ज्याने सर्वात अगोदर म्हटली असेल त्याला शतशः प्रणाम.

म्हणी तयार होतात त्या खूप निरीक्षण करून होत असतात.आणि ही सुद्धा म्हण निर्मात्याने निरीक्षण करूनच लिहिली किंवा बोलली असेल.
आता बघा ना .लहान लहान पशु पक्षी असतात.त्यांना सुद्धा निर्माता जगवतोच ना.इतकेसे जीव किती किती मोठा प्रवास करून आपले पोट भरतात. कुठे ना कुठे तरी त्याच्या पोटाची व्यवस्था केलेलीच असते.जर कोणी आणून दिले तर चांगलेच पण नसेलच कोणी आणून दिले तर ते स्वतःचे पोट भरण्यासाठी वणवण भटकतात, आणि आपले अन्न मिळवतात.
मानवजातीचे पण तसेच नाही का,सुरुवातीचे दिवस त्याचे आईवडील नातेवाईक त्याच्यासाठी खूप काही करतात.त्याला चालायला शिकवतात.जगायला शिकवतात.समाजात कसे वावरायचे हे शिकवतात, समाजाची बरोबरी करण्याची ताकद देतात. समाजातील तो एक प्रतिष्ठित नागरिक होतो. मग तो इतरांना शिकवायला लागतो.हे रहाट असेच चालू असते.कधी कधी त्याच्या डोक्यात हवा जाते, आणि 'मी आज जो काही आहे तो स्वतःच्या ताकदीवर आहे,मला कोणीही मदत केली नाही, मी माझे विश्व स्वतः तयार केले, अशा वलग्ना करतो.आई बाप आणि त्याला घडवणारा समाज याना विसरतो.स्वतःसाठी जगतो.
 या जगात प्रत्येकासाठी घर, अन्न विधात्याने बनवून ठेवले आहे. फक्त ते त्याला त्याचे शोधावे लागते.काहींना चटकन मिळते काहींना खूप मेहनत करूनही मिळत नाही. शेवटी त्याचा अंत होतो पण त्यांच्यासाठीचे घर त्याला।मिळत नाही.
त्याचे प्रयत्न अपुरे पडतात. कधीकधी साथ देणारे अर्धवट रस्त्यात सोडून जातात.
पण तो धीराचा असला तर स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढतो.इतरांवर अवलंबून राहत नाही.
जो इतरांवर अवलंबून असतो त्याचे काही खरे नसते.तुम्हाला काही मिळवायचे असेल तर स्व कर्तृत्व अतिशय महत्वाचे. सोबत करणारे शेवटपर्यंत साथ देतीलच असे नाही.एखादे कार्य करण्यास ते सोबत येतील पण शेवटपर्यंत  टिकतीलच असे नाही.ते तुम्हाला मध्यावर सोडून जातील.त्यावेळेस तुमच्यात धमक असली पाहिजे.घेतलेले कार्य शिद्दीस नेण्याची जिद्द पाहिजे. तुम्ही कोणाच्या भरवश्यावर एखादे कार्य हाती घ्याल तर तुमचे काही खरे नाही.ते तुम्हाला कार्य पूर्ण होण्याआधीच सोडून जाऊ शकतात. किंवा तुमच्या कार्यात अडथळे सुद्धा आणू शकतात.
तुमच्या सोबत असणारे कधी कधी तुमच्या पासून अलगद दूर जाऊन तुमची गम्मत पाहू शकतात. तुमच्यावर कोट्या करू शकतात.तुमची कशी फजिती होते हे दूरवरून बघू शकतात.पण तुम्ही धीराचे असाल तर त्यांच्यावर मात करू शकता.त्यांचे दात त्यांच्याच घश्यात घालू शकता. 
तुम्हाला ध्येय साधण्यासाठी एखाद्या प्रवासाला जावे लागते.तो प्रवास असाध्य असतो पण अश्यक्य नसतो.तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही तो शक्य करू शकता.पण कधी कधी सोबत असलेले ,आणि ज्यांच्यावर तुमचा भरोसा आहे तेच तुम्हाला संकटात टाकून मागे फिरतात.आणि तुमचे हसू कसे होईल याची योजना आखतात.पण तुमचा प्रवास प्रामाणिक असेल तर तुम्हाला वाटेत नवीन साथीदार भेटतात ते तुम्हाला हवी ती मदत करतात. तुमच्या अगोदरच्या सोबत्यांपेक्षा जास्त जीव लावतात.हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते.फक्त जिद्दीने जगता आले पाहिजे.कारण जो चोच देतो तो दाणे पण देतो.
कुठलेही कार्य हातात घेण्या अगोदर तुम्ही ते पूर्ण करू शकत असाल तरच हातात घ्या.दुसऱ्याच्या भरवश्यावर कधीही घेऊ नका.
समजा एखाद्या ठिकाणी काही वाद होत असेल ,आणि तुमच्या सोबत चार साथी असतील.तर त्यांच्या भरवश्यावर समोरच्याशी वाद कधीच करू नका, कारण त्याची ताकद तुम्हाला माहित नसते.त्याने तुमच्या एक ठेऊन दिली की तुमच्या मागे असणारे चार कधी गायब होतील कळणार नाही.कारण इथे कोणाला कोणाची पडलेली नसते.जो तो स्वतःसाठी जगत असतो.त्या माकडीनीची गोष्ट माहित आहे ना?
बिरबलाने एक प्रयोग करून  अकबराला शिद्द करून दाखवले की कोणीही स्वतःसाठीच जगत असतो.त्याने एका हौदात माकडीन आणि तिचे अत्यंत लाडके पिल्लू जे की ती कधीच त्याला एकट्याला सोडत नाही.त्याच्यावर तिचा खूप जीव असतो.त्या दोघांना एका हौदात टाकले जाते.आणि हौदात पाणी सोडले जाते.जेव्हा हौदातले पाणी वाढायला लागते तेंव्हा माकडीन पिल्लाला उचलून कमरेवर घेते.पाणी कमरेपर्यंत येते माकडींन पिल्लाला खांद्यावर घेते ,पाणी खांद्यापर्यंत येते,माकडीन पिल्लाला डोक्यावर ठेवते,पण गळ्यापर्यंत ,पाणी नाकातोंडात जायला लागते  ती पिल्लाला आणखी वर करते, टाचा वर करते तरी ही पाणी   तोंडात जाते, ती गुदमरायला लागते , तिला श्वास घेता येत नाही. आता काहीच पर्याय राहत नाही.तिला तर जगायचे असते, ती पिल्लाला पायाखाली टाकते आणि त्याच्यावर उभे राहून स्वतःचा जीव वाचवते..असेच असते.ती आई असून आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या पिल्लाचा जीव घेण्यास कमी करत नाही.मग तुमचे सोबती तर वेगळे असतात.काही कारणाने काही हेतूने एकत्र आलेले असतात.त्यांच्या वर काय भरोसा ठेवायचा?
जे काही करायचे असेल ते स्वतःच्या हिमतीवर करा.यश तुमचेच आहे कारण ज्याने चोच दिली त्याने दाणे सुद्धा दिले आहेत ते फक्त आपल्याला शोधायचे आहेत.

कडू डोस:


कुठलेही कार्य करताना कुणाच्याही भरोश्यावर करू नका.कारण कोण कधी दगा देईल सांगतां येत नाही.

कार्य स्वतःच ओढून नेण्याची ताकद असेल तर ते कार्य हातात घ्या.अन्यथा त्या वाटेला जाऊच नका

Friday, 21 April 2017

श्रीमंत

श्रीमंत

मला नेहमी असं वाटायचं की च्यायला जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो...

नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये...

श्रीमंत या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी "श्री" नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे...

श्री या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्युत आहेत...

फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरिक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरंच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत...

गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता...

अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची "फिकीर नाही"...

अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथेलोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही...

बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला...

सगळीकडे झगमगाट होता पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता...

"मी किती महागाची स्कॉच पितो बघ" हे सांगण्यामागे ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यु होती...

ही खरेदी आणि बेफिकीरी घरातल्या इंटॆरिअरपासुन लहानशा खरेदीपर्यंत जिथेतिथे दिसते...

सुसंस्कृतपणा खुप कमी पैशेवाल्यांकडे आहे. 
मुलं काय शिकतायत? यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचंच वारेमाप कौतुक...

वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथेतिथे अभाव दिसत होता...

पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खुपच निराळी आहेत. 

कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक इंटेरिअर (अजिबात झकपक नाही), 
कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करुन त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला Antic मूर्त्या आणि चित्रं जमवायचा छंद...

कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस. 
आणि गंमत म्हणजे सर्व श्रीमंत हे अतिशय Down to earth आणि सुसंस्कृत विचारांचे आहेत...

प्रत्येकाने संपत्तीचं उत्तम,
 Long Term नियोजन केलेलं आहे. 
रितसर कागदपत्रे, 
त्यांच्या फायली तयार आहेत. सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो. 
कुठेही कसलाही Show Off नाही आणि बडेजाव तर त्याहून नाही...

स्वत: केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबात नाही.

कोट्याधीशाकडच्या पार्ट्यांसोबत गरीबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जुन जातात..
कुठेही कसलाही भेदभाव नाही, Attitude तर औषधालाही नाही...

उत्तम मोजकं आणि छान खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं, वागणं... म्हणजे वेदातल्या "श्री" या संकल्पनेला अनुरुप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो...

आणि मग माझ्या लक्षात आलं की एकतर भरपूर मेहनत करुन, कष्ट करुन, उद्योग करुन किंवा मग लांड्यालबाड्या करुन, जमिनी विकून "पैसेवाला" होता येणं कुणालाही सहज शक्य आहे पण "श्रीमंत" होणं हे एक कष्टसाध्य पण छान व सुंदर "मिशन" आहे...

पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. 

तो एक प्रवास आहे, विचारपुर्वक करण्याचा...
तो करायलाच हवा.
तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे हे लक्षात घ्या...

आपण खुप श्रीमंत  व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना...!!!⁠⁠⁠⁠

*आपसी विश्वास*

*आपसी विश्वास* 

संत कबीर रोज सत्संग किया करते थे। दूर-दूर से लोग उनकी बात सुनने आते थे। एक दिन सत्संग खत्म होने पर भी एक आदमी बैठा ही रहा। कबीर ने इसका कारण पूछा तो वह बोला, ‘मुझे आपसे कुछ पूछना है। मैं गृहस्थ हूं, घर में सभी लोगों से मेरा झगड़ा होता रहता है। मैं जानना चाहता हूं कि मेरे यहां गृह क्लेश क्यों होता है और वह कैसे दूर हो सकता है?’ 

कबीर थोड़ी देर चुप रहे, फिर उन्होंने अपनी पत्नी से कहा, ‘लालटेन जलाकर लाओ’। कबीर की पत्नी लालटेन जलाकर ले आई। वह आदमी भौंचक देखता रहा। सोचने लगा इतनी दोपहर में कबीर ने लालटेन क्यों मंगाई। थोड़ी देर बाद कबीर बोले, ‘कुछ मीठा दे जाना।’ इस बार उनकी पत्नी मीठे के बजाय नमकीन देकर चली गई। उस आदमी ने सोचा कि यह तो शायद पागलों का घर है। मीठा के बदले नमकीन, दिन में लालटेन। वह बोला, ‘कबीर जी मैं चलता हूं।’ 

कबीर ने पूछा, ‘आपको अपनी समस्या का समाधान मिला या अभी कुछ संशय बाकी है?’ वह व्यक्ति बोला, ‘मेरी समझ में कुछ नहीं आया।’ कबीर ने कहा, ‘जैसे मैंने लालटेन मंगवाई तो मेरी घरवाली कह सकती थी कि तुम क्या सठिया गए हो। इतनी दोपहर में लालटेन की क्या जरूरत। लेकिन नहीं, उसने सोचा कि जरूर किसी काम के लिए लालटेन मंगवाई होगी। मीठा मंगवाया तो नमकीन देकर चली गई। हो सकता है घर में कोई मीठी वस्तु न हो। यह सोचकर मैं चुप रहा। इसमें तकरार क्या? आपसी विश्वास बढ़ाने और तकरार में न फंसने से विषम परिस्थिति अपने आप दूर हो गई।’ उस आदमी को हैरानी हुई। वह समझ गया कि कबीर ने यह सब उसे बताने के लिए किया था। कबीर ने फिर कहा,’ गृहस्थी में आपसी विश्वास से ही तालमेल बनता है। आदमी से गलती हो तो औरत संभाल ले और औरत से कोई त्रुटि हो जाए तो पति उसे नजरअंदाज कर दे। यही गृहस्थी का मूल मंत्र है।’ 

"परिवार" से बड़ा कोई "धन" नहीं! 
"पिता" से बड़ा कोई "सलाहकार" नहीं! 
"माँ" की छाव से बड़ी कोई "दुनिया" नहीं! 
"भाई" से अच्छा कोई "भागीदार" नहीं! 
"बहन" से बड़ा कोई "शुभचिंतक" नहीं! 
"पत्नी" से बड़ा कोई "दोस्त" नहीं 
इसलिए 
"परिवार" के बिना "जीवन" नहीं!!!!! 

पालकांसाठी थोडं महत्वाचं

पालकांसाठी थोडं महत्वाचं.👨👩👧👦👨👩👧 

एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर. 
घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती. 
एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती. 
इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले. 
त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे. 
आजोबा म्हणाले "इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत." 

आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते. 

पॉवर ऑफ चॉइस

पॉवर ऑफ चॉइस 
सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत याने सांगितलेला हा किस्सा आहे. 
--------------------------------------------------- 
मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालून माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’ 

‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षितपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’ 
मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती. 

वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ’ कॉफी आहे!’ 
मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’ 
‘काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’ 

‘मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्य काही लपत नव्हते. 
माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’ 
माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’ 

मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टॅक्सी सुरु करताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’ 
वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगितले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहिती दिली. 

‘आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही’ वासु म्हणाला. 

‘मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’ 
वासुच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासूनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस’ बद्दल कळले!’ 

‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले 

‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक’ करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले’ वासु म्हणाला 

‘आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजूबाजूला निरीक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता. 

‘मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले. 
‘झाला तर!’ वासु उत्साहाने सांगू लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले. या वर्षी कदाचित माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’ 

गरुड व्हा, बगळा होऊ नका! 
वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले. 
बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हा चॉइस देवाने प्रत्येकालाच दिलेला आहे, अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत! 

आता आपण बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का? 
#PowerOfChoice